पिंपरी : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीची भाद्रपद पालखी यात्रा उद्या (रविवार २४ ऑगस्ट) पासून सुरू होणार आहे. दोन सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.

चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे दरमहा श्री मयूरेश्वराच्या दर्शनास मोरगाव येथे जात असत. त्यांनी सन १५६१ साली चिंचवड येथे पवना नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली. श्रीमोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये श्रीमयूरेश्वराची तांदळामूर्ती श्री क्षेत्र मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रात, गणेशकुंडात प्राप्त झाली. ती प्रसादमूर्ती भाद्रपद महिन्यात श्रीमंगलमूर्ती पालखीतून मोरगाव येथे नेण्याची ही परंपरा सुमारे गेली ५२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अविरत चालू आहे. पालखी प्रस्थानाच्या निमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल पथक सहभागी होणार आहे.

रविवारी दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान करणार आहे. श्री मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, पावर हाउस चौक (पिंपरी-चिंचवड लिंकरोड) मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. सोमवारी (२५ ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान करेल. कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. बुधवारी ( २६ ऑगस्ट) सकाळी मंदिरातून शिवरी, रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. त्यानंतर गुरुवार (२७ ऑगस्ट) आणि शुक्रवार (२८ ऑगस्ट) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. २९ ऑगस्टपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री कन्हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम-वडकी या ठिकाणी मुक्काम करीत दोन सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल.