जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा आज(गुरूवार)पार पडत असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात विसावणार आहेत. त्यानंतर १९ जुलै रोजी एसटी बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
देहू नगरी दरवर्षी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून जाते. मात्र, गेल्यावर्षीपासून करोना महमारीचं संकट निर्माण झालेलं असल्याने, अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले.
देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन विश्वास्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, संपूर्ण देहूनगरीत आज शांतमय वातावरण आहे. दरम्यान, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून १९ जुलै रोजी एसटीमधून पंढरपूरला रवाना होणार आहे.
देहूतील अन्नदान मंडळाची परंपरा याही वर्षी खंडित
संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने आषाढी वारीदरम्यान लाखभर भाविकांसाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अन्नदान सोहळा आयोजित करणाऱ्या देहूगावातील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचा तीन दिवसीय अन्नदान सोहळा यंदा सलग दुसऱ्या वर्षी करोनामुळे खंडित झाला आहे. गेल्या वर्षी करोनाविषयक मदतकार्यात योगदान देणाऱ्या मंडळाच्या वतीने यंदा अन्नदानाऐवजी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.