पुणे : दत्तवाडीच्या वार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावताना झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांकडून याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून, १० ते १२ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तवाडीतील ग्रामदैवतेचा उत्सव नुकताच पार पडला. गुरुवारी मध्यरात्री दत्तवाडी परिसरातून पालखी काढण्यात आली. पालखी जात असताना दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत सविता रोहिदास चोरगे (वय ४३, रा. दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवदास थोरात, निर्मला थोरात, सुनीता सोनवणे, संतोष थोरात, बक्की सोनवणे (सर्व रा. दत्तवाडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी चोरगे यांच्या दिराने घरासमोर फटाक्याची माळ लावली. त्या वेळी आरोपींशी वादावादी झाली. वादावादीतून आरोपींनी फिर्यादी, त्यांची मुलगी, पुतणी, तसेच जावेला मारहाण केल्याचे चोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत निर्मला शिवदास थोरात (वय ५९, रा. दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय चोरगे, विलास चाेरगे, आयुष चोरगे, प्रकाश चोरगे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखीसमोर फटाक्यांची माळ लावल्याने फिर्यादी चोरगे यांच्या दंडाला चटका बसला. या कारणावरून आरोपींनी थोरात यांच्या मुलाला मारहाण केली, तसेच घराच्या परिसरात राहणाऱ्या पाच महिलांना धक्काबु्क्की केली.