पुणे : ‘निपुण महाराष्ट्र’ कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना पालकांचे व्हॉट्सॲप क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळण्यासाठी याचा उपयोग होईल, असा उद्देश असला, तरी अशा कामांत शिक्षकांचा फार वेळ जाऊ नये, अशीही मागणी होत आहे.शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक, शिक्षकांकडे विविध प्रकारची माहिती मागवली जाते. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यापासून अपार आयडी तयार करण्यापर्यंतची कामे शिक्षक करतात. आता शिक्षण विभागाकडून ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेले ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ हे ॲप शिक्षकांनी डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांना त्यांच्या पाल्यांची विषयनिहाय प्रगती पाहायला मिळावी, यासाठी पालकांशी थेट संपर्क साधता येण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गशिक्षकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सॲप क्रमांक ॲपमध्ये नोंदवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दूरदृश्यप्रणाली बैठकीत या संदर्भातील सूचना देण्यात आल्या.
‘राज्य शासनाने शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण, सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. मात्र, शासनाकडून नवनव्या योजनांसाठी पालक, विद्यार्थ्यांची माहिती मागवली जाते. त्यामुळे शासनासाठी शाळा या विदा संकलन केंद्र झाल्या आहेत का, असा कधीकधी प्रश्न पडतो. खासगी शाळा सरकारला माहिती देण्यास बांधील नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत गुणवान शिक्षक असूनही अशा कामांत त्यांचा वेळ वाया जातो,’ अशी खंत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
‘देशात विदा सुरक्षा कायदा लागू झाला आहे. पालकांनी शाळेला दिलेली माहिती शाळांनी परस्पर शासनाला देणे हा कायद्याचा भंग ठरू शकतो. शिवाय काही पालक त्यांची माहिती देण्यास नकार देतात. स्वत:च्या माहितीची सुरक्षितता हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. शासनाला पडताळणी करायची असल्यास शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी,’ असेही धर्माधिकारी यांनी सांगितले. ‘शिक्षकांकडून सतत वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागवली जाऊ नये. त्या ऐवजी शासनाने एकच ऑनलाइन प्रणाली केल्यास त्यातून थेट माहिती घेणे शासनाला शक्य होईल. मात्र, पालकांना मुलांची प्रगती कळणे हे स्वागतार्ह आहे,’ असे सोमनाथ वाळके या शिक्षकाने नमूद केले.
काय आहे निपुण महाराष्ट्र अभियान?
निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळा, तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू करण्यात आलेला आहे. या अभियानाची अंमलबजावणी ५ मार्च ते ३० जून या कालावधीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येत्या काळात ‘निपुण महाराष्ट्र’ हा शैक्षणिक मंच म्हणून विकसित होणार आहे. या द्वारे विद्यार्थ्यांसाठीचे अभ्यास साहित्य, दृक-श्राव्य चित्रफिती, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रगतीची माहिती होऊ शकेल. पालक पाल्याच्या शिक्षणात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. मात्र, पालकांचा व्हॉट्सॲप क्रमांक किंवा संपर्क क्रमांक घेण्याची सक्ती नाही.सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त