Vaishnavi Hagawane वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघं राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता वैष्णवीच्या आई वडिलांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

वैष्णवीचे वडील काय म्हणाले?

पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक केली, ती योग्यच कारवाई केली आहे. आता मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे. कारण त्यांनी आमच्या मुलीचा अमानुष छळ केला आहे. तिला मारहाण केली, त्यामुळे मकोका कायद्याच्या अंतर्गतच या सगळ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे. नुसतं अटक करुन उपयोग नाही, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे काय घडलं ते समोर आलं पाहिजे. आरोपींना मकोका लागल्यानंतरच माझं समाधान होईल असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

वैष्णवीच्या आईने काय म्हटलं आहे?

“राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना अटक केली. मी माध्यमांचे, अजित पवारांचे, सरकारचे आभार मानते. माझीही हीच मागणी आहे की आता मकोका अंतर्गत आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. वैष्णवीला तिच्या सासूने, नणंदेने आणि नवऱ्याने खूप छळलं.” असं वैष्णवीच्या आई वडिलांनी टीव्ही ९ मराठीला सांगितलं.

१६ मेच्या दिवशी वैष्णवीची आत्महत्या

पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह

वैष्णवी आणि शशांक हगवणे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र सुरुवातीला वैष्णवीच्या वडिलांनी या लग्नाला विरोध दर्शवला. मात्र वैष्णवीने हट्ट सोडला नाही. तिला शशांकशीच लग्न करायचं होतं. त्यानंतर तिचे वडील रुग्णालयातल्या अति दक्षता विभागात होते. त्यावेळी तिने शशांकसह पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मामाने समजूत घातल्यानंतर प्रेमविवाह लावून दिला होता.