मुद्देसूद आणि खुमासदार शैलीतील ‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ हा अग्रलेख कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय मनाला वाटेल तशी टीका करण्याचं सार्वभौमत्व स्वत:कडे घेण्याच्या  शिष्ट मनोवृत्तीवर नेमके बोट ठेवतो. परंतु शिवचरित्र लिखाणाव्यतिरिक्त इतर अनेक उल्लेखनीय बाबी बाबासाहेबांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी  योग्यता सिद्ध करताना विचारात घेण्याजोग्या आहेत. एकतर शिवचरित्र कथनाच्या अनेक कार्यक्रमांतून मिळालेली रक्कम बाबासाहेबांनी मुक्तहस्ताने लोकोपयोगी उपक्रमांसाठी खर्च केली. असे करताना त्यांनी  स्वत: मात्र सामान्य माणसाच्या आíथक पातळीवरच रहाणे पसंत केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवचरित्राद्वारा तरुण पिढीत त्यांनी दुर्गप्रेम निर्माण केले ज्याचा उल्लेख आजही अनेक युवक आवर्जून करतात. ह्या प्रेमामुळेच दुर्गाचा ऐतिहासिक ठेवा जतन करायला फार मोठी मदत झाली आहे.
ह्या सगळ्या बाबी नाकारत केवळ जातीयतेच्या चाष्म्यांतून पहाणाऱ्यांच्या नजरेला पुरंदऱ्यांना मिळणारा पुरस्कार खुपला तर नवल वाटायला नको!
राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

‘झोडपण्या’चा उपद्व्याप अकारणच
‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ हे संपादकीय वाचले , आणि अपेक्षित प्रतिक्रिया लोकसत्ताकडून आली याबद्दल धन्य जाहलो!  ‘नाव’ नसलेल्या पुरोगाम्यांना  झोडण्याचा अकारण  उपद्व्याप या संपादकीयाने केला आहे. कारण एका बातमीप्रमाणे पुरोगाम्यांचे शिक्षक असलेले प्रा. नरहर कुरुंदकर , आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे  यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गौरव केला आहे. तेव्हा यात पुरोगामी असणे-नसणे हे महत्त्वाचे नाहीच.
खरे म्हणजे अग्रलेखाने नेमकेपणे या मधील अंतर्वरिोध दाखवून द्यायला पाहिजे होता. म्हणजे काहींचा विरोध मतलबी आहे, काहींचा विरोध जातीय भावनेतून झाला आहे, काहींचा विरोध ‘जेम्स लेन प्रकरणातील’ संशयामुळे झाला आहे आणि काही थोडय़ांचा विरोध मात्र प्रामाणिक असू शकतो. याच कारणांमुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. पुरोगाम्यांना झोडपणे हे तुलनेने सोपे आहे, पण परखड शोध घेणे गरजेचे आहे. साध्वी/ संत यांच्या फूत्कारांपेक्षा, त्यांच्या विविध चाळ्यांपेक्षा कोणत्याही प्रकारचा  पुरोगामी असणे चांगले. कारण त्यातून पाऊल अपेक्षेइतके पुढे पडले नाही तरी  समाज मागे तरी जात नाही !
बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र , म्हणजे त्यांनी स्वतच म्हटल्याप्रमाणे एक ‘कीर्तन’ आहे . त्यामुळे त्यांनी स्वतच आपली मर्यादा आखून घातली आहे.  हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे..  या चौकटीत प्रा. कुरुंदकर, अत्रे , पु.ल. यांची मते लक्षात घ्यायला पाहिजेत.
कोणताही पुरस्कार देताना त्याचे निकष जेथपर्यंत निश्चित होत नाहीत तो पर्यंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धुमश्चक्री  चालूच राहणार.
डॉ. अनिल खांडेकर, डहाणूकर कॉलनी (पुणे)

पुरस्कार देणे, हीदेखील सरकारी लुडबुडच
‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ या अग्रलेखाचे (१८ ऑगस्ट) शीर्षक खरे म्हणजे ‘तकलादू बुद्धिवाद्यांचे मौंजीबंधन’ असे असायला हवे होते. या अशा बुद्धिवंताच्या आशाळभूत कारकीर्दीचा मार्ग हा राजकारण्यांच्या सहयोगानेच उजळत असल्याने त्यांना स्वतच्या प्रज्ञावान स्वाभिमानी तेजाची गरज भासत नसावी. खरा मुद्दा हा आहे की ज्या ज्या वेळी जनतेचे खरे प्रश्न व समस्या ऐरणीवर येऊन सरकारला काही करणे तर दूरच राहिले, साधे समर्पक उत्तर देता येत नाही, त्या त्या वेळी असे मुद्दे ही पक्षातीत राजकीय व्यवस्था बाहेर काढत असते. आताही राज्यातील ज्वलंत प्रश्नांची उग्रता सौम्य होईपर्यंत अशी ही प्रकरणे हेतुपुरस्सर आणली जातील. माध्यमेही सारे काही विसरून जिवाच्या आकांताने ती वाजवत राहतील. पुरस्कार देणे तेही इतिहास, कला, संस्कृती या क्षेत्रात हे सरकार नावाच्या व्यवस्थेला कळणारी वा झेपवणारी गोष्ट नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले असताना देखील ही फोलफटे उधळली जातात ती केवळ पलायनासाठी.
आताची लोकशाहीतील जी सरकारे नेमली जातात ती व्यवस्थापकीय स्वरूपाची असतात. त्यात जाण्यासाठी प्रज्ञा, बुद्धी, साधना, अभ्यास, अनुभव हे सारे असलेच पाहिजे असा परिपाठ अजून तरी आलेला नाही. त्यामुळे या प्रांतात त्यांना केवळ सरकार म्हणून वाव आहे असेही मानण्याचे कारण नाही. त्यांनी सामूहिक जीवनाला आवश्यक असणाऱ्या सेवा वा व्यवस्था यांची योग्य ती सोय करावी असे मूलभूत कार्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे. उगाचच राजा या संकल्पनेतील सर्वागीण कल्याणकाराची भूमिका वठवत आपणास इतरांपेक्षा असलेली िशगे परजत आपल्याला जनतेनेच दिलेल्या अधिकारांचे विक्राळ स्वरूप दाखवत आपल्यात नसलेली ताकद दाखवत राहू नये.
त्यामुळेच, अग्रलेखात सरकार आपल्याकडे नको त्या क्षेत्रात लुडबुड करीत असल्याबाबत दोन बोल सुनावले असते तर कथित बुद्धिवाद्यांबरोबर या प्रकारातील खरे ‘लाभार्थी’असलेल्या सरकारला जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधायला भाग पाडता आले असते.
डॉ. गिरधर पाटील,  नाशिक.

पुरंदरे यांच्या कथनातील प्रश्न वादग्रस्तच
अग्रलेख एकांगी व भावनिक वाटतो. यामध्ये पुरस्कार देण्यात येऊ नये म्हणून जे आक्षेप घेतले आहेत त्यांवर चर्चा न करता त्याला जातीय रंग देण्यात आला आहे. विरोध करणारे नेहमी सांगत आले की पुरंदरे यांना विरोध केवळ ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून नाही, तर  त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील खोटय़ा तपशिलांवर आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखे नसून हा वाद मुद्दाम तयार केला आहे असा आक्षेप त्यांच्यावर आहे. भूतकाळातील संशोधन व इतिहास काळानुरूप बदलत असतोच. सत्य समोर आणण्याचे काम आजचे संशोधक पुरावे देऊन करीत आहेत. अशात पुरंदरेंना पुरस्कार देऊन त्यांच्या लिखाणाला प्रमाणित केल्यासारखे होईल. मुळातच या पुरस्कारासाठी  ‘कुठल्याही वादात न अडकलेल्या व्यक्ती’ची निवड करावी, अशी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपेक्षा.
के. शुद्धोधन, अमरावती</strong>

फुले यांचे श्रेय
‘बाबासाहेब पुरंदरेंनी शिवरायांना घराघरात पोहोचविले’ ते कशावरून? खऱ्या शिवरायांच्या इतिहासाची  पुसलेली ओळख तर म. फुलेंनी करून दिलेली आहे. हे सत्य दुर्लक्षित केले गेले.. का? ते बहुजनांचे होते म्हणून?
अमोल पालकर, जालना</strong>

प्रबोधनकारांचे मत काय होते?
‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ हा अग्रलेख लिहिताना प्रबोधनकार ठाकरेंचे पुरंदरे विषयीचे मतही मांडले असते तर उत्तम झाले असते. यापूर्वी अगदी युती शासनाच्या काळातही अनेक ब्राह्मणांना  ‘महाराष्ट्रभूषण’ ठरविले; तेव्हा कधी तीव्र विरोध झाल्याचे आठवते का? बाळासाहेब ठाकरे यांनी पुरंदरे यांना का विरोध दर्शविला होता, हे वाचकांना  कळले तर बरे होईल. पुरस्कार प्रदान केल्यास पुरस्काराचे अवमूल्यन नक्कीच  होणार आहे. शेवटी मर्जी सरकारची; पण कृपया कुणीही यास जातीयतेतून होतो असे म्हणू नये. जनतेची दिशाभूल करू नये.
गजानन माधवराव देशमुख , परभणी

‘शिवशाहिरां’कडून स्पष्टीकरण आवश्यक
ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण सन्मान जाहीर झाल्यापासून त्याविरोधात जाहीरपणे आक्षेप घेतले जात आहेत. पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण दिला जाऊ नये सांगणारी मंडळी पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील आक्षेपार्ह विधानांवर बोट ठेवून बोलत आहेत. पुरंदरे यांची बाजू मांडणारे मात्र, पुरंदरे यांनी  शिवचरित्रकथन कसे सुरस केले व त्यात रमणारी मंडळी आता विरोध करीत आहेत अशी भावनात्मक आवाहने करत आहेत. या घटनांकडे  त्रयस्थाप्रमाणे पाहत न बसता आता पुरंदरे  यांनी शिवचरित्रातील आपल्या विधानांतून  छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाबाई यांचा अवमान कसा झालेला नाही  हे स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे.
–  मुरली पाठक , विलेपार्ले पूर्व (मुंबई)