जळी बुडबुडे देखतां देखतां। क्षण न लागता दिसेनाती।। तैसा हा संसार पाहतां पाहतां। अंत:काळी हाता काय नाही।। बुवांनी हा चरण पुन्हा लयीत म्हटला. सर्वाच्या विचारमग्न चेहऱ्यांकडे नजर फिरवत ते बोलू लागले..
बुवा – पाण्यात बुडबुडे उत्पन्न होतात आणि त्यांच्या उत्पन्न होण्यातच त्यांचा विलयही असतो.. क्षणोक्षणी बुडबुडे उत्पन्न होणं आणि ते नष्ट होणं सुरूच असतं.. प्रत्यक्षात पाहिलं तर बुडबुडे ही काही स्वतंत्र निर्मिती नव्हे, त्यांना काही स्वतंत्र अस्तित्व नाही! पाण्याचंच क्षणमात्र रूप तरंग आणि बुडबुडे. ते विराम पावताच पाणीच उरतं. दिसायला मात्र त्यांचं अस्तित्व स्वतंत्र भासतं, पण ते भ्रामकच असतं. भ्रामक म्हणजे बुडबुडे हा भ्रम नसतो, पण त्यांचं स्वतंत्र अस्तित्व भासणं, हा भ्रम असतो. तसा हा संसार आहे. नामदेवमहाराज म्हणतात की, हे सर्व क्षणभरासाठीच खरं भासणारं आहे.. आता त्याच क्षणाचा उपयोग जागृतीसाठी करून घ्यायची प्रेरणा ते देतात. म्हणतात, क्षण एक मना बैसोनि एकांती। विचारी विश्रांति कोठे आहे।। ज्याची त्याची धडपड मनाच्या विश्रांतिसाठीच सुरू आहे. पैसा कमावतो, घर बांधतो, बचत करतो या सर्वाचा हेतू निश्चिंती हाच असतो. पण त्यासाठी किती कष्ट, किती धडपड.. म्हणून क्षणभर एकांती बसून खरी विश्रांती नेमकी काय, याची उकल करायला नामदेव महाराज सांगत आहेत..
हृदयेंद्र – हा एकांती शब्दही वेगळाच वाटतो..
बुवा – म्हणजे?
हृदयेंद्र – श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘मी’ या एकाचा अंत हाच खरा एकांत आहे!
बुवा – वा!
हृदयेंद्र – कारण या ‘मी’चा अंत होत नाही, तोवर सर्व विचार या ‘मी’च्याच भिंगातून होतात. ‘मी’लाच चिकटून असतात. मग त्या खऱ्या विश्रांतीची उकल कशी होणार?
बुवा – अगदी बरोबर! हा कोन माझ्या लक्षातच आला नव्हता बघा.. विचार करा.. जन्मापासून मरेपर्यंत क्षणाक्षणांचंच तर आयुष्य आहे! नामदेव महाराजांनीच एका अभंगात म्हटलं आहे की, ‘क्षणक्षणा देही आयुष्य हे काटे। वासना हे वाटे नित्यनवी।।’ क्षणाक्षणानं आयुष्य घटत आहे, पण प्रत्येक क्षणी वासना नित्यनवं रूप घेते आणि गुंतवते.. म्हणून तर ‘क्षण एक मना बैसोनि एकांती। विचारी विश्रांति कोठे आहे।। दुर्लभ आयुष्य मनुष्य देहीचे।। जातसे मोलाचे वायाविण।।’ मनुष्य जन्मासारखी सुवर्णसंधी या वासनांच्या ओढींमागे धावण्यात वाया जात आहे, हे जाणवत नाही.
हृदयेंद्र – या अभंगासारखंच क्षणाचं माहात्म्य सांगणारा तुकाराम महाराजांचाही अभंग आहे.. क्षणक्षणा हाचि करावा विचार..
बुवा – वा! तरावया पार भवसिंधु।। नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान।। संत समागमीं धरूनि आवडी। करावी तांतडी परमार्थी।।..
हृदयेंद्र – तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें। नये डोळे धुरें भरूनि राहों।।
बुवा – तुम्हीही कीर्तन का करीत नाही? पाठांतर आणि स्मरणशक्ती चांगली आहे तुमची! (हृदयेंद्र हसतो) आता अर्थही सांगा..
हृदयेंद्र – मी काय सांगणार? पण ऐका.. तुकाराम महाराजही सांगतात की हा भवसागर पार करायचाच विचार क्षणोक्षणी करा..
बुवा – म्हणजे जीवनाचं ध्येय सदोदित लक्षात ठेवा! हा भवसागर म्हणजे कुठे आहे हो? (हृदयेंद्रही कुतूहलानं विचारतो, खरंच कुठे आहे? बुवा हसून म्हणतात) हा समुद्र डोळ्यांना दिसत नाही.. हा भवसागर अंत:करणात आहे! भवविषयांच्या चिज्जड ग्रंथी.. मुळ्या तिथेच आहेत ना? (हृदयेंद्र आणि इतरांचे चेहरेही नवं काहीतरी गवसल्यागत उजळतात) अंत:करणातला हा भवसागर पार झाला नाही, मध्येच गटांगळ्या खात राहिलो तर पुढचा जन्म त्यातच आहे! तेव्हा तो पार करायचा तर विचार पाहिजे! प्रत्येक क्षण अविचारात सरत आहे म्हणून शुद्ध विचार पाहिजे!! हा देह तर नाशिवंत आहे.. जाणारच.. काळ आपलं आयुष्य खातोय म्हणून आत्ताच सावध व्हा! कवायतीत फर्मावतात ना? सावधान!! तसे तात्काळ आचरणात आणा.. सावध व्हा आणि स्वार्थ सोडून परमार्थाकडे वळा.. इहलोकीच्या व्यवहारांच्या धुरापायी दुसरं काही दिसतच नाही, असं जगू नका!
चैतन्य प्रेम