ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर गेले, त्यांच्या आधी तीन दिवस विज्ञान चळवळीतील आणखी एका अग्रणीचे निधन झाले. त्यांचे नाव डॉ. सरोज घोष. विज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणासाठी संग्रहालये उभारण्याची जी चळवळ भारतात रुजली, तिचे हे डॉ. घोष प्रणेते मानले जातात. साठच्या दशकात विज्ञानातील अनेक दीपस्तंभ भारतात उभे राहत होते, त्याच दशकात या ध्येयवेड्याने लाखो भारतीयांपर्यंत विज्ञान पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून कामाला सुरुवात केली, हे त्यांचे मोठेपण. त्यासाठी विज्ञान संग्रहालये आणि विज्ञान केंद्रांच्या उभारणीच्या संकल्पनेची पायाभरणी करणारा हा सच्चा विज्ञाननिष्ठ होता. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेची (एनसीएसएम) स्थापना करण्यात डॉ. घोष यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे याच परिषदेच्या प्रयत्नांतून भारतभरात विज्ञान केंद्रे उभी राहिली. अनौपचारिक पद्धती वापरून आणि सामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन विज्ञान पोहोचवण्याचा ध्यास या केंद्रांनी घेतला आणि डॉ. घोष हे त्यासाठीची प्रेरणा ठरले.
जादवपूर विद्यापीठातून विद्याुत आणि तंत्र-दळणवळण अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी मिळवून ते कोलकात्यातील बिर्ला औद्याोगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय अर्थात ‘बीआयटीएम’मध्ये संस्थेच्या औपचारिक स्थापनेआधीच, १९५८ मध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे ‘बीआयटीएम’चे प्रमुख झाल्यावर १९६५ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली फिरते विज्ञान संग्रहालय (आताचे फिरते वैज्ञानिक प्रदर्शन) स्थापन झाले. कोलकात्याजवळील नरेंद्रपुरातील रामकृष्ण आश्रम शाळेत सुरू झालेले हे संग्रहालय ‘आपल्या परिचयाची वीज’ या संकल्पनेवर आधारित होते. या विषयाशी संबंधित ३० वस्तू एका बसमधून गावोगावी नेऊन, मुलांना या प्रयोगवस्तूंतून विजेसंबंधींचे विज्ञान समजावून सांगितले जाई. ‘एनसीएसएम’ने या संकल्पनेचा पुढे विस्तार केला. सध्या देशभरात ४८ फिरती विज्ञान प्रदर्शने कार्यरत आहेत.
डॉ. घोष सत्तरच्या दशकात उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे नियंत्रण अभियांत्रिकीत पदव्युत्तर शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ संशोधनात घालवला, जादवपूर विद्यापीठातून पीएचडी मिळवली. मात्र, विज्ञानातील मूलभूत तत्त्वे संवादी विज्ञान वस्तूंतून मुले शिकतात, हे त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथील विज्ञानशोधिकेत पाहिले होते. ही संकल्पना त्यांनी भारतात रुजवली आणि त्यातून मुंबईचे नेहरू विज्ञान केंद्र सुरू झाले. पुढे १९९२ मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान केंद्रही उभे राहिले. याच वर्षी त्यांनी ‘विज्ञाननगरी’ची कल्पना मांडली. कृतीतून विज्ञान शिकविणारी उपकरणे असलेले मोठे केंद्र कोलकात्यात उभारण्याचे हे स्वप्न १९९७ मध्ये साकारले. या विज्ञाननगरीला दरवर्षी १५ लाख आबालवृद्ध भेट देतात. १९९७ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही कोलकाता म्युझियम सोसायटी, संसद संग्रहालय, राष्ट्रपती भवन संग्रहालय अशा प्रकल्पांवर ते काम करत राहिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्माश्री’ (१९८९)आणि ‘पद्माविभूषण’ने (२००७) गौरविले. विज्ञानातीलही अनेक पारितोषिके त्यांना मिळाली. मृत्यूसमयी ते अमेरिकेत होते. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचे पार्थिव विज्ञान संशोधनासाठी वॉशिंग्टन विद्यापीठाला दान करण्यात आले. ‘मुले विज्ञान संग्रहालयांपर्यंत पोहोचू शकत नसतील, तर विज्ञान संग्रहालयांनी त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे,’ असे मानणारा हा विज्ञानप्रसारक मृत्यूनंतरही विज्ञानालाच समर्पित राहिला.