एम. बालमुरलीकृष्णा हे कर्नाटक संगीतातील भारदस्त नाव. पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यासह केलेल्या सहगायनामुळे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्याही चाहत्यांना ते आठवत असतात. चित्रपटांना त्यांनी संगीत दिले, पार्श्वगायन केले आणि काही चित्रपटांत अभिनयसुद्धा केला, त्यामुळे दक्षिणेच्या चार राज्यांत तर त्यांना ‘ग्लॅमर’देखील होते. या थोर गायकाने स्वित्र्झलडमध्ये ‘अकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्ट्स अॅण्ड रीसर्च’ स्थापन केली होती, संगीतोपचाराचं संशोधन ते करत होते (ते यशस्वीपणे तडीस गेलेले नाही) हे मात्र फार कुणाला माहीत नसते. विजय साई यांनी लिहिलेले ‘द मेनी लाइव्हज ऑफ मंगलमपल्ली बालमुरलीकृष्णा’ हे पुस्तक अशी माहिती फक्त पुरवत नाही, तर या प्रख्यात कलावंताच्या बहुपेडी आयुष्याची चिकित्साही करते. प्राथमिक शिक्षणानंतर शाळाच सोडलेले बालमुरलीकृष्णा बहुभाषाकोविद कसे झाले, त्यांच्या विचारांमध्ये सखोलता कुठून आली, हे प्रश्न लेखकाने हाताळले आहेत. विजय साई हे संगीतसमीक्षक म्हणून विशेषत: तेलुगुभाषक राज्यांत प्रसिद्ध आहेत. पेंग्विन प्रकाशनाच्या ‘व्हिंटेज बुक्स’ विभागाने प्रकाशित केलेल्या या ३२० पानी पुस्तकाची किंमत आहे ५९९ रुपये.
निवृत्त न्यायमूर्ती जस्ती चलमेश्वर यांची आठवण आज कुणाला होत नसेल, पण सामान्य माणसे न्यायपालिकेबद्दल दबक्या आवाजात चिंतावजा चर्चा करत असतात, तेव्हा खरे तर न्या. चलमेश्वर यांचेच म्हणणे खरे ठरत असते. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन सरन्यायाधीशांच्या कारभारावर टीका केली होती- आणि तेव्हापासून न्यायमूर्तीसाठी त्या न्यायालयातील खटले मुक्रर करण्याची ‘रोस्टर’ पद्धत थोडीफार तरी सुधारली- हे मात्र अनेकांना आठवत असेल. याच न्या. चलमेश्वर यांचा सहभाग ‘आधार’ सक्तीचे नसल्याच्या निकालामध्ये होता, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील अत्यंत जाचक ‘६६ अ’ हे कलम रद्दबातल ठरवणारा निर्णय त्यांनी आणि रोहिंटन नरिमन यांनी ‘श्रेया सिंघल वि. भारत सरकार’ या गाजलेल्या प्रकरणात दिला होता आणि महत्त्वाचे म्हणजे, ‘न्यायाधीशांच्याच ‘न्यायवृंदा’मार्फत आलेल्या सूचनांनुसार न्यायमूर्तीच्या नियुक्तीची सध्याची पद्धत अयोग्य असल्याची टीका अन्य एका निकालपत्रात करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. निवृत्तीनंतरही, न्यायालयांच्या कारभारावर टीका केल्यामुळे दिल्लीच्या वकील संघटनेने त्यांच्यावर संताप व्यक्त केला होता. अशा न्या. चलमेश्वर यांनी एका पुस्तकास लिहिलेली प्रस्तावना आतापासूनच कुतूहलाचा विषय ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि न्यायालयीन पद्धतींमधील सुधारणांचे खंदे पुरस्कर्ते कालीश्वरम राज यांचे ‘कॉन्टय़ूशनल कन्सर्न्स’ हे पुस्तक सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दिल्लीच्या ‘तूलिका बुक्स’तर्फे प्रकाशित होते आहे. १६० पानांच्या या पुस्तकाची किंमत ५०० रुपयांच्या आसपास आहे, पण निवृत्तीनंतर ठरवून एकही पद न स्वीकारणारे न्या. चलमेश्वर काय भूमिका घेतात, ती ‘विधि सेंटर’मध्ये त्यांनी दिलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या ‘फ्रॉम डार्कनेस टु लाइट’ या व्याख्यानापेक्षा किती निराळी असेल, याचे कुतूहल मोठेच आहे.
‘इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया – हिस्टरी अॅण्ड प्रॉस्पेक्ट’ या नावाचं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं २०१० मध्ये प्रकाशित केलं होतं. लेखक होते पी. बालकृष्णन. ते पुस्तक आलं, त्या वेळी ‘गुजरात मॉडेल’चा प्रचार नुकता कुठे सुरू होत होता. आता याच पुलापरे बालकृष्णन यांनी साधारण याच विषयावर लिहिलेलं दुसरं पुस्तक सप्टेंबरात येतं आहे.. ‘इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टु मोदी’ या नावाचं हे पुस्तक ‘पर्मनंट ब्लॅक’ या प्रकाशनगृहातर्फे प्रकाशित होईल. पुलापरे बालकृष्णन हे २०१४ मध्ये स्थापन झालेल्या अशोका विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवतात. पण त्यांचं हे पुस्तक प्राध्यापकी वळणाचं किंवा निव्वळ पाठय़पुस्तकासारखं नसेल. आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्याची नेहरूकालीन गती आणि नंतरच्या काळातली गती, किंवा अन्नसुरक्षेचा पेच, त्याची जाणीव आणि नंतरचे सजग प्रयत्न यासारख्या विषयांवर यापूर्वी बालकृष्णन यांनी लिहिलं आहे, त्याचं प्रतिबिंब कदाचित पुस्तकातही असेल. ‘इकॉनॉमिक अॅण्ड पोलिटिकल वीकली’मध्ये बालकृष्णन अनेकदा लिहितात. त्यांच्या लिखाणात मतप्रदर्शनाला सज्जड अभ्यासाची जोड असते. त्यामुळे या पुस्तकाबद्दल कुतूहल आहे. २७२ पानांच्या या पुस्तकाची प्रकाशनपूर्व किंमत ७५० रुपये आहे.