राजेश बोबडे

आपल्या भजनांच्या प्रभावातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पं. नेहरूंच्या अलाहाबाद जिल्ह्यासह देशभरातील जमीनदारांकडून ‘भूदान’ मिळविले. महाराज म्हणतात : प्रत्येकाने परिश्रम करून राष्ट्राच्या संपत्तीत भर टाकली पाहिजे आणि सर्वांनीच न्यायाने वाटा घेऊन सुखी झाले पाहिजे, हा मानवधर्माचा कायदा आहे! अमुक गोष्ट गांधीजींची, अमुक कार्य विनोबांचे, असे समजणे चुकीचे आहे. अनेक महापुरुषांनी विविध अनुभव घेऊन काढलेले सार सर्वांसाठीच असते हे लक्षात घेऊन, त्या मार्गाने सामुदायिक शक्तीतून नवे जग आकारास आणले पाहिजे.

हेही वाचा >>> चिंतनधारा : ‘भूमि विश्वस्त योजना’ व ‘भूदान’ चळवळ

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या ‘भूमि विश्वस्त योजने’द्वारा मध्य प्रांतात जमीन फेरवाटपाचे काम अलग न ठेवता, भूदान चळवळीत सामील होण्याचे वचन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विनोबा भावेंना दिले. महाराज भूदानाविषयी म्हणतात : भूमिदानयज्ञ ही अगदी नवी बाब आहे असे नाही. मूळचेच तत्त्व थोडय़ा वेगळय़ा पद्धतीने आचरणात आणण्याचा हा प्रयोग आहे. मनुष्यामनुष्यात आत्मीयता-मानवता निर्माण व्हावी, सुखशांती निर्माण व्हावी म्हणूनच साऱ्या विचारी जगाची धडपड चालू आहे. प्रेमाच्या मार्गानेच टिकाऊ शांती निर्माण होऊ शकते असा सनातन सिद्धांत आहे आणि भूमिदानयज्ञ त्यावरच आधारलेला आहे. आजच्या जगात धनिकांत रजोगुण आणि निर्धनांत तमोगुण प्रमाणाबाहेर वाढलेला आहे आणि त्यातूनच आजच्या जगातील दु:खे भरमसाट वाढीस लागली आहेत. सर्वांच्या हृदयात सत्त्वगुणाची वाढ करणे, त्यांचे हृदयपरिवर्तन सात्त्विक मार्गाने करणे हे आजचे महत्त्वाचे कार्य आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा : भूमिहीनांसाठी ‘भूमि विश्वस्त योजना’

भूदानयज्ञात नेमकी हीच गोष्ट दृष्टीपुढे ठेवण्यात आली आहे. म्हणूनच भूदानात जमीन किती मिळाली या प्रश्नाहूनही समाजात सत्त्वगुणाचा विकास किती झाला ही गोष्ट अधिक महत्त्वाची समजण्यात येते. ज्याप्रमाणे गौतम बुद्धाला बुद्धगयेला साक्षात्कार झाला त्याचप्रमाणे विनोबाजींनासुद्धा भूमिदानाचा साक्षात्कार झाला व आपणाला त्याचे सहकारी बनण्याचे सद्भाग्य लाभले. शक्य आहे की, विनोबा नसते तर आणखी कोणाद्वारे हे कार्य झाले असते. निसर्ग कोणाची वाट पाहात बसत नाही. परंतु विनोबांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच भूमिदानाची कल्पना साकार होऊ शकली, अशी जर कोणाची समजूत होत असेल तर ती धोक्याची सूचना होय असे मी मानतो. तुमच्या अंत:करणात जोपर्यंत भूमिदानाची भावना मूळ धरत नाही तोपर्यंत विनोबाचा आधार ठीक आहे. परंतु ही भावना समजल्यावर मात्र प्रत्येक गावात जाऊन तुम्ही धडाडीने हे सांगितले पाहिजे की मीच विनोबा आहे. तेव्हाच घराघरांतून विनोबा निर्माण होतील! एकेकाळी ज्या संप्रदायांची नितांत आवश्यकता भासत होती त्याची दुसऱ्या वेळी मुळीच आवश्यकता वाटत नाही. म्हणून व्यक्तीने जुन्या संप्रदायाला जुन्या कपडय़ाप्रमाणे फेकून दिले पाहिजे. भूमिदानाचे हे कार्य कोटय़वधी जनतेला माणूस बनविण्याचे महान कार्य आहे. ग्रामगीतेत विनोबाजींबद्दल महाराज लिहितात :

अस्थिपंजर फकीर तो आज।

भूमिदानयज्ञाचा उठवी आवाज।

तरि तीच लाट उसळली, सहज गावोगावी।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com