विदर्भातील चिमूर व आष्टी येथे इंग्रजांचा युनियन जॅक खाली उरतवून तेथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तिरंगा फडकविला. इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण शहीद झाले. महाराजांना तुरुगांत टाकले. १४ ते १६ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस का होईना चिमूर व आष्टी १९४७ पूर्वीच स्वतंत्र झाले होते! महाराजांच्या या क्रांतिलढयाची माहिती आझाद हिंदू सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीत सुरू केलेल्या ‘बर्लिन रेडिओ’वरून जगाला मिळाली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करून भारतीय गणराज्य सप्ताहाचे स्वागत आपण करतो आहोत.

नेताजी आणि आजचा भारत

 महाराज राज्यकर्त्यांना सजगतेचा संदेश देताना म्हणतात, भारताला स्वराज्य मिळाले आता सुराज्याची गरज आहे.. तेही मिळेल, परंतु पुढे सुराज्याचे सिंहासन ढासळू पाडणाऱ्या काही बाबी असतील तर त्या  धर्माचे मर्म न समजता स्वत:च्याच धर्माची बढाई मारणे व ती फक्त द्वेषाने दाखविणे. स्पृश्यास्पृश्यतेची भावना जातीवर ठेवून मानवता नष्ट करणे.  जनतेच्या स्वावलंबी वृत्तीला आळा घालणे, विनाश्रम कमावलेल्या वैभवाच्या जोरावर दुसऱ्याला तुच्छ लेखून त्याला कायमचे गुलामीत जखडण्याचा प्रयत्न करणे. राष्ट्राकरिता कोणताही प्रसंग पडल्यास धावून न जाणे.. अशा गोष्टी सुराज्याला खाली खेचणाऱ्या आहेत. भारताच्या सुपुत्रांनो, तुम्हाला तुमचा देश घोर आपत्तीतूनही वर आणावयाचा असेल तर ताबडतोब या सर्व बाबींचे उच्चाटन करावे लागेल. स्वराज्याचा पाया सुराज्याने मजबूत केल्याशिवाय स्वराज्य कोणीही आजवर कायमचे टिकवू शकले नाही. सुराज्याच्या अभावीच हातात असलेले भारताचे स्वराज्य दुसऱ्यांच्या ताब्यात गेले. समाजाची नैतिक उन्नती आणि समानतेने वागण्याची व वागविण्याची प्रवृत्ती यातच सुराज्याचे बीज आहे.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

 स्वावलंबी पद्धतीने व सहकारी वृत्तीने वागून आत्मसन्मानपूर्वक आपणासहित सर्वाना जगवणे यालाच मी सुराज्याची सक्रियता समजतो. राष्ट्रात स्वराज्य प्रस्थापित करण्याचे मार्ग अनेक प्रकारचे असू शकतात; पण त्या सर्व मार्गाचे मुख्य केंद्र मानवता अर्थात विश्वधर्माची स्थापना करणे हे असेल तरच ते सुराज्य ठरू शकेल. आपल्या सुखासाठी दुसऱ्यांकडे द्वेषभावनेने पाहण्याची वा अन्यायाने दुसऱ्यांवर कुरघोडी करण्याची रीती सुराज्यास कधीच टिकवू शकत नाही. सुराज्याचे सिंहासन समयोचित धार्मिकता, न्यायनिष्ठ राजकीयता, सामाजिक व आर्थिक समता आणि सेवापरायण जीवनाची श्रेष्ठता या चार पायांवर उभारलेले असते. सामुदायिक वृत्तीने आपण सर्वानी मिळून त्याच्या उभारणीस हातभार लावावा, यातच खरे राष्ट्राचे कल्याण आहे. महाराज आपल्या भजनात स्वराज्याविषयी म्हणतात :

स्वराज्य लाभलं हे, सुराज्य हाती घे हे।

सेवा कर सेवका। हात उभारोनी पाहे ।

तुकडयाची हाक घेण्याला ।

तूच खरा मित्र होण्याला ।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाल पुढं सूर्य निघाला रे ।