महेश सरलष्कर

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होईल. पक्षांतर्गत मतभेदांवर मात करायची असेल, काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल, भाजपविरोधात लढायचे असेल तर, ही यात्रा यशस्वी करण्याशिवाय राहुल गांधींकडे पर्याय नाही!

सुमारे ४० वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर गुलाम नबी आझाद पक्षामधून बाहेर पडल्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरीचा गड कोसळून पडल्याचे आता जाहीर करायला हरकत नाही. बंडखोर ‘जी-२३’च्या नेतृत्वानेच काँग्रेसअंतर्गत संघर्षांत हार मान्य केली, आता ते नवा पक्ष काढतील, नवा राजकीय डाव टाकतील. आझादांनी काँग्रेस सोडणे हे काँग्रेस बदलू लागल्याचे लक्षण म्हणता येईल. दोन वर्षांपूर्वी जी-२३ गटातील नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचे निष्ठावान आणि इंदिरा-राजीव आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सत्ताकेंद्री राहिलेले जुनेजाणते नेते यांच्यामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष होत राहिला. काही महिन्यांपूर्वी उदयपूरमधील चिंतन शिबिरातही त्याचे पडसाद उमटले होते. पण आझाद यांच्या जाण्याने संघर्षांचा हा टप्पा पूर्ण झाला असे म्हणता येईल. आझादांच्या नेतृत्वाविना ‘जी-२३’ कोसळून पडले आहे. काँग्रेसमधील वाद देशाच्या राजकारणासाठी योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. राहुल गांधींच्या निष्ठावानांनी बंडखोरांचा पराभव केला ही वस्तुस्थिती आहे!

काँग्रेस आता राजकीय पक्ष संघटना म्हणून संक्रमणाच्या पुढील टप्प्यावर जाऊ पाहात आहे. जुन्या-जाणत्या पण, ‘जी-२३’मध्ये सहभागी न झालेल्या अशोक गेहलोत यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवण्याचा गांधी कुटुंबाचा कल काँग्रेसमधील बदलाची जाणीव करून देतो. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारायचे नसेल तर, काँग्रेसला पर्याय शोधावा लागेल. गांधी कुटुंबाने गेहलोत यांचे नाव समोर ठेवलेले आहे. एक प्रकारे गांधी कुटुंबाने पक्षातील नेत्यांना राहुल गांधींचे लांगूलचालन बंद करून गेहलोतांचे नेतृत्व स्वीकारण्यास सांगितले आहे. गांधी कुटुंबाकडे पक्षाध्यक्षपद नसेल तर काँग्रेसमध्ये फूट पडेल, दुफळी माजेल अशी नेहमीच चर्चा होते. पण काँग्रेसमधून अनेक जण निघून गेलेलेच आहेत, बंडखोरी झालेलीच आहे, दुफळी माजलेलीच आहे. गेहलोत यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिले गेले तर आणखी काही जण काँग्रेसमधून बाहेर पडतील. त्यामुळे राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाले नाहीत म्हणून काँग्रेसचे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. वास्तविक, ही बाब स्वत: राहुल गांधी यांनी अनौपचारिक चर्चात काँग्रेसनेत्यांना सातत्याने सांगितलेली आहे.

पक्षाध्यक्षपदी गेहलोत हे नामधारी असतील आणि खरी सत्ता राहुल यांच्या ताब्यात असेल. काँग्रेसला खरे नेतृत्व मिळणार नाही, असा आरोप आझाद यांनी केला आहे. त्यासाठी त्यांना ‘प्रॉक्सी’ असा इंग्रजी शब्द वापरला आहे. पण, भाजपमध्ये तरी वेगळे काय घडत आहे? भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची धुरा जे. पी. नड्डा यांच्याकडे दिली असली तरी, केंद्रात आणि पक्षामध्ये अंतिम निर्णय मोदी-शहा हीच द्वयी घेते हे भाजपमध्ये कोणाला माहिती नाही का? इथेही नेतृत्व प्रॉक्सीच आहे. पण, नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्ष दिल्यामुळे नड्डा पक्ष संघटनेकडे लक्ष देतात, देशभर फिरतात, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात, मोदी-शहांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये लक्ष घालतात, संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘फीडबॅक’ घेतात, पक्ष संघटना कुठेही ढिली पडणार नाही याची दक्षता घेतात. हेच काम गेहलोत (वा अन्य कोणाही नामधारी पक्षाध्यक्षाला) यांना काँग्रेसमध्ये करावे लागेल. भाजपमध्ये प्रत्येकाला मोदी-शहांपर्यंत पोहोचता येत नाही, ते नड्डांपर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडे मन मोकळे करतात. ही संवादाची थांबलेली प्रक्रिया काँग्रेसमध्ये सुरू होऊ शकते. पक्ष संघटनेत संपर्क ठेवण्याचे महत्त्वाचे काम गेहलोत यांच्यासारखा मुरब्बी नेता करू शकतो.

‘जी-२३’ नेत्यांनी काँग्रेस कमकुवत होत असल्याबद्दलच्या पत्रात मांडलेल्या मुद्दय़ांमध्ये तथ्य होतेच; पण राहुल गांधींनी त्यांना वैयक्तिक स्तरावर दुखावले होते, हेही कारण त्यांच्या नाराजीमागे होते. पूर्वीही अनेक नेते काँग्रेसमध्ये सोनियांचे निष्ठावान सापत्नपणाची वागणूक देतात, अशी तक्रार करून बाहेर पडले होते. या नेत्यांनी पुढे स्वत:चा पक्ष काढला, राज्यात सत्ता मिळवली, स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले. आत्ता ‘जी-२३’ नेत्यांमध्ये ही ताकद नाही अन्यथा ते दोन वर्षे काथ्याकूट करत पक्षात थांबले नसते. या नेत्यांना जनाधार नाही. अशोक गेहलोत यांना राजस्थानात जनाधार आहे, ते विधानसभा वा लोकसभेची निवडणूक जिंकू शकतात. गेहलोत वा त्यांच्या तोलामोलाचा नेता काँग्रेसचा पक्षाध्यक्ष होऊ शकला नाही तर मात्र, काँग्रेसला कोणी वाचवू शकणार नाही! राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष होण्यापेक्षा लोकांमध्ये अधिकाधिक वावरणे काँग्रेससाठी अधिक लाभदायी ठरेल. ‘भारत जोडो’ यात्रेत हा हेतू राहुल गांधी यांना साध्य करता आला नाही तर निव्वळ तोंडची वाफ दवडल्यासारखे होईल.

नागरी संघटनांचा सहभाग कितीसा?

काँग्रेस ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढणार असला तरी, नागरी संघटना-राजकीय पक्षांनीही त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ामध्ये काँग्रेसने नागरी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. अरुणा राय, निखिल डे, योगेंद्र यादव आदी समाजवादी/ डाव्या विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये झाली होती. या बैठकीतील अखेरचे भाषण राहुल गांधी यांनी केले होते. एकटा काँग्रेस पक्ष भाजपचा पराभव करू शकत नाही, नागरी संघटनांनी काँग्रेसशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युती करण्याची वा पाठिंबा देण्याची गरज आहे. काळाची पावले आपण ओळखली पाहिजेत, असा सूर राहुल गांधी यांच्या बोलण्यात होता. काँग्रेस कमकुवत झाल्याची ही थेट कबुली होती असे म्हणता येईल. बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना राहुल गांधींची भूमिका आणि त्यांची विनंती प्रामाणिक वाटली तरी, राजकीय पक्ष म्हणून त्यांचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवरही या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. लोक काँग्रेसपासून का लांब जात आहेत, काँग्रेसकडून कोणत्या चुका झाल्या हेही प्रामाणिकपणे काँग्रेसच्या नेतृत्वाने लोकांसमोर मांडले पाहिजे, असे या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावर, तुमच्याशी या सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्याची तयारी आहे, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी या प्रतिनिधींना मनमोकळेपणे सांगितले होते. संघ आणि भाजपकडे लोक आकृष्ट का झाले, याचा या यात्रेत शोध घेणार असल्याचे राहुल गांधींचे म्हणणे होते. असे असेल तर, राहुल यांना आत्मपरीक्षणासाठी आणि काँग्रेसला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा ही मोठी संधी असू शकते. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये नागरी संघटनांचा थेट सहभाग किती असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरही त्यांची काँग्रेसशी कुठल्याही स्वरूपातील ‘युती’ अवलंबून असेल. पण भारत जोडोच्या निमित्ताने नागरी संघटनांशी काँग्रेसचा तुटलेला संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता खुली होऊ शकते.

काँग्रेसचे पक्षाध्यक्षपद गांधी कुटुंबाकडे असो वा नसो, काँग्रेसशी वैचारिक बांधिलकी असणाऱ्या १९-२१ टक्के मतदारांची मते काँग्रेसलाच मिळणार आहेत. गांधी कुटुंबाकडे पक्षाध्यक्षपद असल्याने काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत फार वाढही होण्याची शक्यता नाही. अन्यथा राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले नसते. भाजपचा पराभव करायचा असेल तर ४० टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतील. ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत तिथे काँग्रेसला भाजपविरोधात लढण्याची गरज नाही; पण जिथे भाजपशी थेट संघर्ष करावा लागेल तिथे मात्र काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करावी लागेल आणि थेट संपर्कातून मतदारांना आकर्षित करावे लागेल. पक्ष संघटनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम गेहलोत करू शकतात. भाजपप्रमाणे काँग्रेसमध्ये निर्णयप्रक्रियेत गांधी कुटुंबाचा सहभाग असू शकेल; पण त्यांच्या अंमलबजावणीचे काम गेहलोत वा त्या पदावरील कोणीही नेता करू शकतो. पक्षाबाहेर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम मात्र राहुल गांधी यांना करावे लागेल. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदावर मात करायची असेल, त्यापलीकडे जाऊन काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल आणि भाजपविरोधात लढायचे असेल तर, भारत जोडो यात्रा ही ‘लिटमस टेस्ट’ असेल. ही यात्रा फोल ठरली तर, निव्वळ गेहलोत यांना पक्षाध्यक्ष करून काँग्रेस संक्रमणाच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mahesh.sarlashkar@expressindia.com