भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी तीन अंतराळवीरांसह अमेरिकेतील ‘नासा’च्या फ्लोरिडा केंद्रातून बुधवारी यशस्वी उड्डाण केले. त्यांच्या अवकाशकुपीने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी (आयएसएस) संलग्न होण्याची (डॉकिंग) प्रक्रियाही गुरुवारी सायंकाळी यशस्वीरीत्या पार केली. आता जवळपास दोन आठवडे ग्रुप कॅप्टन शुक्ला अवकाश स्थानकात राहतील. तीन सहकाऱ्यांबरोबर विविध प्रयोग करतील. पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी होईल. या मोहिमेचे सारथ्य शुक्ला करत असले, तरी नेतृत्व करत आहेत अमेरिकेच्या पेगी व्हिटमन. उर्वरित दोघांपैकी एक जण पोलंडचा, दुसरा हंगेरीचा.

अॅक्सिअम-फोर असे नामकरण झालेल्या या मोहिमेत वापरले गेलेले फाल्कन रॉकेट बनवले स्पेसएक्स या कंपनीने. ती अमेरिकेतली, पण तिचे मालक इलॉन मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिकेतले. अॅक्सिअम-फोर मोहिमेतील अंतराळवीरांचे पथक जवळपास तीसेक देशांसाठी विविध प्रयोग करणार आहे. या तपशिलातून मोहिमेचे बहुराष्ट्रीयत्वच अधोरेखित होते. एकेकाळी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया अशा दोनच देशांची या क्षेत्रात मक्तेदारी होती. तीव्र स्पर्धा होती.

आज स्पर्धा काही प्रमाणात असली, तरी तिची जागा सहकार्याने घेतली आहे. आणि मक्तेदारी जवळपास संपुष्टात आली आहे. चीनने या क्षेत्रात या दोन देशांच्या तोडीची वाटचाल केलेली असली, तरी इतर देशही मागे नाहीत. यांत युरोपीय समुदाय, जपान आणि भारताचा विशेष उल्लेख करावा लागेल. शिवाय अंतराळ मोहिमा या आता केवळ सरकारी राहिलेल्या नाहीत. खासगी कंपन्याही मानवी आणि मानवरहित अंतराळ मोहिमांमध्ये उतरत आहेत. हे क्षेत्र त्यामुळे अधिक व्यापक बनत आहे, अधिक आकर्षक ठरू लागले आहे हेही खरेच.

शुभांशू शुक्ला हे भारताचे दुसरेच अंतराळवीर. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी ४१ वर्षांपूर्वी सोव्हिएत सोयूझ यानातून अंतराळ भ्रमंती केली होती. त्यामुळे भारताच्या दृष्टीने अशा मोहिमांचे कवित्व अमेरिका-रशियापेक्षा निश्चितच अधिक आहे हे नाकारता येत नाही. भारताचा विद्यामान आणि आगामी अंतराळ कार्यक्रम महत्त्वाकांक्षी आणि भरगच्च आहे. चंद्रयान मोहिमेअंतर्गत आपण चंद्रावर यशस्वीरीत्या यान पाठवलेच आहे. येथून पुढे गगनयान ही मानवी अंतराळ मोहीम आणि मंगलयान ही मंगळावर यान उतरवण्याची मोहीम आहे.

पुढील दशकात संपूर्ण भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे प्रयत्नही आपल्याकडे सुरू झाले आहेत. अॅक्सिअम – फोर मोहीम नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो यांनी संयुक्तपणे राबवली आहे. गगनयान मोहीम २०२७ मध्ये अपेक्षित आहे. त्यासाठी निवडल्या गेलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुभांशू एक आहेत. त्यामुळे विद्यामान अंतराळ सफर ही त्या मोहिमेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गगनयान मोहीम २०२२मध्ये होणार होती. परंतु अनेक अडथळ्यांमुळे ती २०२७पर्यंत पुढे ढकलली गेली.

अंतराळ तंत्रज्ञान हे अत्यंत गुंतागुंतीचे असते आणि त्यात सातत्याने प्रयत्न करूनच यश संपादन करता येते. भारतीय अंतराळ कार्यक्रमाची तुलना अमेरिका आणि सोव्हिएत रशियाशी, तसेच काही प्रमाणात चीनशी करणे अस्थानी ठरते. अंतराळ विकास कार्यक्रम अत्यंत खर्चिक असतो आणि १९६०च्या दशकात ज्या वेळी अमेरिका आणि सोव्हिएत रशिया नवनवीन क्षितिजे पार करत होते, त्यावेळी नवस्वतंत्र भारतासाठी तो प्राधान्यक्रम ठरू शकत नव्हता. पण अणुविकास कार्यक्रमाप्रमाणेच या कार्यक्रमावरही लक्ष केंद्रित करण्याइतका आत्मविश्वास त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाकडे होता.

अतिशय कष्टाने भारताचा हा कार्यक्रम आज अधिक महत्त्वाकांक्षी बनण्याच्या स्थितीस येऊन पोहोचला, याचे श्रेय जसे इस्रोचे, तितकेच ते त्यावेळच्या आणि विद्यामान राजकीय नेतृत्वाचेही. पण दोन महासत्तांनी दाखवली तशी सबुरी भारतालाही दाखवावी लागेल. अंतराळ मोहिमा यशस्वी होतात, तशा त्या फसतात देखील. या क्षेत्रात यश गृहीत धरणे म्हणजे त्यातील गुंतागुंत न कळणे होय. नासाच्या तोडीचे शास्त्रज्ञ इस्रोमध्येही आहेत, पण तितक्या संख्येने नाहीत हे वास्तव.

वैज्ञानिकांची संख्या वाढवावी लागेल, बुद्धिमत्तेची ‘गळती’ थांबवावी लागेल. यासाठी देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था निर्माण कराव्या लागतील. अशा संस्था या अंतराळ कार्यक्रम, अणुविकास कार्यक्रमाच्या आधार होत्या. त्या उभारणीत खंड पडता कामा नये. खासगी क्षेत्रालाही याकडे लक्ष द्यावे लागेल. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने संरक्षण क्षेत्रातील खासगी कंपन्यांच्या वाढत्या सहभागाची चर्चा झाली. असा सहभाग या क्षेत्रातही वाढणे आवश्यक. प्रगतीची व्याप्ती द्विमितीय न राहता, ती अंतरीक्षासही कवेत घेणारी त्रिमितीय प्रगती ठरली पाहिजे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ नंतर ‘अंतरीक्षैव कुटुम्बकम’ हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.