जवाहरलाल नेहरू विद्यापीठ! भारतातील सुमारे ११०० विद्यापीठांपैकी एक. मात्र कायम चर्चेत असणारं! विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारतातील क्रमांक एकचे विद्यापीठ ते राष्ट्रविरोधी विचारसरणीसाठी बदनाम अशा अनेक ओळखींनी व्यापलेले ! समाजमाध्यमांवर येथील विद्यार्थी, त्यांची विचारसरणी, राहणीमान, स्वातंत्र्याची संकल्पना, विद्यार्थी-विद्यार्थिनींची सामाजिक-आर्थिक-राजकीय आणि अगदी लैंगिक मते हा सामान्यांसाठी कुतूहलाचा आणि जल्पकांचा खिल्ली उडविण्याचा विषय! कोणत्याही सामाजिक घटकाची सर्वोच्च सार्वजनिक कृतिशीलता ही राजकीय क्षेत्रात दिसते. आणि राजकीय वर्तुळात निवडणूक ही सर्वोच्च गोष्ट मानली जाते. कोणत्याही समाज घटकाचे अथवा देशाचे मूल्यमापन करताना निवडणुकांची गुणवत्ता हा कळीचा मुद्दा ठरतो. त्यांवर त्या घटकाची सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक परिपक्वता यांचे आकलन होण्यास मदत होते. जेएनयू हा सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक-सामाजिक घटक! मात्र एखादी बातमी विद्यापीठाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याआधी देशांतील प्रमुख माध्यमे व्यापतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असा अनुभव येतो की आवारातील एखादी घटना त्यांच्यापर्यंत येण्याआधी दूरवर वसलेल्या त्यांच्या पालकांपर्यंत पोचलेली असते. एकूणच देशाच्या चर्चापटलावर जेएनयूची मागणी जास्त! त्यातच मागच्या आठवड्यात इथे निवडणुका झाल्या. डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या या विद्यापीठात अभाविप या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखालील विद्यार्थी संघटनेने केंद्रीय स्तरावर एक तर विभाग स्तरावर ४२ पैकी २३ जागांवर विजय मिळविला. निवडणुकांमध्ये केवळ जीत वा हार यावर केले जाणारे अवलोकन बऱ्याचदा अपुरे असते. जेएनयू निवडणुकांचे वेगळेपण अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न!
जेएनयूचे वेगळेपण
विद्यार्थी निवडणूक आणि हिंसा हे समीकरण सामान्य असूनदेखील, टोकाची स्पर्धा असताना शांततापूर्ण रीतीने होणारी जेएनयूची निवडणूक वाखाणण्यासारखी आहे. दरवर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकांचा आठवडा सुरू होतो, तेव्हा विद्यार्थी ध्वज, डफली आणि घोषवाक्यांसहित उत्साहपूर्ण मोर्च्यांमध्ये एकत्र येतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सहसचिव या चार मुख्य पदांसाठी तसेच विभागवार सल्लागाराच्या पदांसाठी आक्रमक प्रचार मोहीम राबवली जाते, ज्यामध्ये देशातील मोठ्या राजकीय वादविवादाचे प्रतिबिंब उमटते.
जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुका पूर्णपणे विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या नियमांनुसार चालतात. यासाठी जेएनयूएसयूचे स्वत:चे संविधान आहे, जे विद्यापीठाच्या प्रशासनाने नव्हे, तर विद्यार्थ्यांनीच बनविले आहे. या संविधानानुसार निवडणुका पार पाडण्यासाठी प्रत्येक वेळी विद्यार्थीच एक निर्वाचित निवडणूक समिती गठित करतात आणि तीच मतदानापासून मतमोजणीपर्यंत सर्व टप्पे सांभाळते. प्रत्यक्षात, विद्यापीठ प्रशासन या प्रक्रियेतला एकही टप्पा हाताळत नाही किंवा थेट पर्यवेक्षण करत नाही. वास्तविकत: जेएनयूमध्ये पैसे आणि प्रलोभन यांचा शून्य वापर निवडणुकात होत असतो. बाजूलाच असणाऱ्या दिल्ली विद्यापीठामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावत असताना जेएनयूचे वेगळेपण नजरेत भरते. जेएनयूच्या संविधानाबरोबरच २००६च्या लिंगडोह समितीचा देखील जेएनयू निवडणुकांवर प्रभाव आहे. एके ठिकाणी समितीने म्हटले आहे की जेएनयू निवडणुकांचे प्रारूप देशातील सर्वोत्तम प्रारूप आहे आणि त्यामध्ये अपवाद वगळता बदल करण्याची गरज नाही. परिणामस्वरूप, जेएनयूचे विद्यार्थी संघ प्रारूप बाह्य नियंत्रण आणि बंधनांपासून तुलनेने मुक्त राहिले आहे. मागील चार दशकात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी जास्तीत जास्त वेळेला इथे विजय मिळवला. माकपच्या विद्यार्थी संघटनेतील एसएफआयने २२ वेळा आणि सीपीआय-एमएल (लिबरेशन) च्या एआयएसएने ११ वेळा अध्यक्षपद जिंकले, तर आरएसएसची विद्यार्थी संघटना असलेल्या एबीव्हीपीला एकदा विजय प्राप्त झाला.
वैचारिक अधिष्ठान
गेल्या काही वर्षांत अभाविप विरुद्ध इतर सर्व असा काहीसा संघर्ष आपणास झालेला दिसतो. यावर विचार करता असे दिसून येईल की उजव्या विचारसरणीला इतरांकडून कायम फॅसिस्ट असे संबोधले जाते. जेएनयूचा नवनिर्वाचित अध्यक्ष नितीश कुमार याच्या म्हणण्यानुसार अभाविपचे अस्तित्व नाकारून आम्ही अपरिपक्व राजकारण करीत आहोत असे तुमचे म्हणणे असेल तर खुशाल आम्हाला तसे संबोधा, मात्र जेएनयू हे गेल्या काही दशकांचे दान आहे आणि या शक्तींविरुद्ध लढा हे आम्हा विद्यार्थ्यांचे जेएनयूप्रति देणे आहे. प्रश्न उजवा किंवा डावा हा नाही. मात्र विद्यापीठाच्या आवारात कोणी हिंसा करत असेल, बाहेरून गुंड आणत असेल, आम्ही काय खावे, कुणाशी बोलावे अशा मर्यादा लादत असेल तर अशा शक्तींविरोधात उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या मतानुसार जेएनयू ही विचारसरणीची लढाई आहे आणि कॅम्पसमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये व्यवस्थेविरोधात प्रश्न विचारणारी परंपरा विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या निवडणुकीत यारी नायम या कोणत्याही विचारधारेशी संबंधित नसणाऱ्या उमेदवाराला ११०० पेक्षा जास्त मते हे विचारसरणीची लढाई दुर्बल झाल्याचे द्याोतक आहे का असे विचारताच त्याचे म्हणणे होते की ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यात आम्ही कमी पडलो. मात्र येणाऱ्या काळात आम्ही आमच्या चुकांचे अवलोकन करू. पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर तीव्र आवाज आणि मणिपूरसारख्या देशी मुद्द्यांचा औषधापुरता वापर यावर नितीश कुमार सांगतात की पॅलेस्टाइनमधील हिंसा न भूतो अशी आहे. मात्र ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडताना त्यांनी मान्य केलेले दुर्लक्ष या विरोधाभासाला बळ देतात. यारीचे म्हणणे होते की जेएनयूचे विद्यार्थी डावे-उजवे या दोन ध्रुवांच्या राजकारणाला कंटाळले आहेत आणि आमच्या रूपाने त्यांना नवा आश्वासक चेहरा मिळाला तेव्हा त्यांचा पाठिंबा आपसूकच वाढला.
अभाविपचे अंत:करण
अभाविपची अध्यक्षीय उमेदवार शिखा स्वराजला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तिचे म्हणणे आहे की जेएनयूचे राजकीय कथानक डाव्यांनी आधीच बनविलेले आहे. आम्ही फक्त त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे एखादा प्रचार तुम्हाला विखारी वाटत असेल तर तो आधीच अस्तित्वात असलेल्या विखारी प्रचाराचा परिपाक आहे. अभाविपमध्ये अंतर्गत राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. प्रिझनर्स डायलेमा ही एक प्रसिद्ध संकल्पना आहे. त्यानुसार तुरुंगातील दोन कैदी जेव्हा केवळ एकाच्याच पळून जाण्याची शक्यता जास्त असते तेव्हा एकमेकाला मदत करण्याऐवजी शत्रूला म्हणजेच प्रशासनाला मदत करतात आणि शेवटी दोघांचेही नुकसान होते. त्याचप्रमाणे अभाविपचा उमेदवार विजयी झाला तर त्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळणाऱ्या संभाव्य बक्षिसाच्या शक्यतेने असंतुष्ट लोक आपलाच उमेदवार पाडण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे डावे कार्यकर्ते एका उद्दिष्टासाठी एकत्र येताना दिसतात त्याच्या उलट बरेच अभाविप कार्यकर्ते सत्तेच्या भौतिक फायद्यासाठी भगवा झेंडा उचलताना दिसतात. एक ज्येष्ठ अभाविप कार्यकर्तीने अनौपचारिक गप्पांमध्ये सल बोलून दाखविली की आताची अभाविप ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाही. अभाविपशी जोडलेले अनेक अध्यापक कबूल करतात की आताच्या अभाविपचा दोष म्हणजे अपवाद वगळता हे लोक केवळ हिंसेबद्दल बोलतात आणि वैचारिक बैठक विकसित करीत नाहीत. जेएनयू प्रांगण ही तर्काधिष्ठित युक्तिवादावर चालणारी व्यवस्था आहे आणि उजव्यांनी हिंसेव्यतिरिक्त नावीन्यपूर्ण कल्पनांचा विकास करणे गरजेचे आहे.
विद्यापीठीय निवडणुकीमध्ये वाढत्या महिलाविरोधी भावनेबद्दल बोलताना शिखा म्हणते की आधी विद्यापीठ राष्ट्रीय राजकीय चर्चेला दिशा द्यायचे मात्र सध्या हा प्रवाह दुतर्फा झालेला आहे. वाढता जातीयवादी प्रचार हेदेखील २०२५ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य! बाप्सा किंवा इतर पुरोगामी संघटना जातींचा वापर राजकारणात करून संघर्ष किंवा क्रांतीची भाषा करायचे. आता जातीचे कथानक अस्मितेभोवती पेरले जात आहे. उच्च जातीकेंद्रित एकत्रीकरण ही साधारण बाब बनली आहे. या निवडणुकीत एसएफआय आणि एआयएसए या दोन संघटना वेगवेगळ्या लढल्या तरी बाप्साने सर्वात जास्त फाटाफूट अनुभवली. याचे उत्तर देताना राहुल सोनपिंपळे म्हणतात की दुर्बल घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांचे राजकारण भावनाप्रधान असते. तुम्ही निवडणूक लढवता तेव्हा राजकीय विजय हेच तुमचे ध्येय असते. ही व्यावहारिकता जोपर्यंत बाप्सा अंगीकारत नाही तोपर्यंत कॅम्पसमध्ये यश त्यांच्यासाठी दुर्लभ असेल. विद्यापीठात मतभिन्नतेबद्दल असणारा आदर हे विद्यापीठाचे एक वैशिष्ट्य होते. मात्र फ्रेंच विभागातील प्राध्यापक आशीष अग्निहोत्री यांच्या मते सध्याच्या काळात ते उतरणीला लागले आहे. मुक्त विचारकांची एक संघटना विद्यापीठात अस्तित्वात होती जी आज दिसत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की एका निरीक्षणानुसार सुमारे ७० टक्के विद्यार्थी स्वत:ला मुक्त विचारांचे मानतात. अध्यक्ष नितीशकुमार म्हणतात की मुक्त विचार हा एक शब्दच्छल आणि संधिसाधूपण आहे. मी जेवढे मुक्त विचारक पाहतो ते बरेच आज सत्तावर्तुळाच्या जवळ आहेत. सोनपिंपळेदेखील या गोष्टीवर सहमती दर्शवितात आणि विद्यापीठीय आवारात विचारसरणी हाच राजकारणाचा पाया राहिला पाहिजे, यावर भर देतात.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवडणुका हा लोकशाही तत्त्वज्ञानाचा एक जिवंत पुरावा आहे. महान विचारवंत हॅना अॅरेंड्ट यांच्या मते, राजकीय कृती-म्हणजे सार्वजनिक जीवनातील भाषण व सहभाग, ही मुक्ततेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे, आणि विद्यापीठातील तीव्र वादविवाद आणि विद्यार्थ्यांचे सक्रिय राजकीय जीवन हे या दृष्टिकोनाचे सकारात्मक स्वरूप आहे. जॅक राँसिएर यांच्या मते राजकारण तेव्हाच सुरू होते जेव्हा प्रवाहाबाहेरील लोक समानतेसाठी आवाज उठवतात. जेएनयू या प्रवाहाबाहेरील लोकांना प्रभावशाली बनविण्यात हातभार लावते. जेएनयू एक व्यवस्था आहे सत्तेविरोधात लढणारी! ती व्यवस्था माणसांनीच बनवली आहे आणि त्यात नक्कीच कमतरता आहेत. मात्र या व्यवस्थेला सत्तेत कोण आहे हा प्रश्न नाही पडत. ही प्रश्न विचारणारी ज्योत तेवत ठेवणे हे या निवडणुकांचे काम आहे. आजच्या काळात, जेव्हा लोकशाही जीवन अनेकदा भकास झालेले दिसते, तेव्हा जेएनयू आपल्याला आठवण करून देते की, उत्तम राजकारण म्हणजे मतभेद, बहुलता आणि सामूहिक सृजनाचे नंदनवन होय. हे जतन करण्याची जबाबदारी केवळ विद्यापीठाची अथवा विद्यार्थ्यांची नाही तर शासन आणि नागरिक यांचीदेखील आहे.
लेखक जेएनयूमध्ये पीएच.डी. करत आहेत
phanasepankaj@gmail.com