खासगी शिकवण्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीचा योग्य परिणाम आधीच अभ्यासाच्या, स्पर्धेच्या आणि पालकांच्या इच्छा-आकांक्षांना कंटाळलेल्या मुलामुलींना कितपत होईल, याबद्दल शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. शिक्षणाचे खासगीकरण होऊ लागल्यानंतरच्या काळात शिकवण्याचे औद्योगिकीकरण होऊ लागले. अवाच्या सवा शुल्क, अशक्य वाटणारी पण भुरळ घालणारी आश्वासने यामुळे पालक आपल्या पाल्यांना खुंटीवर अडकवल्यासारखे खासगी शिकवणी वर्गात अडकवून टाकतात. शाळेचा गृहपाठ एकवेळ केला नाही तरी चालेल, पण शिकवणी वर्ग बुडता कामा नये, अशा पालकांच्या हट्टापायी, या मुलांचे बालपण करपू लागले आहे, हे खरे. मात्र शालेय शिक्षणाच्या दर्जाचा विचार केला, तर सध्याच्या स्पर्धेच्या काळात मुलांनी टिकून राहायचे असेल, तर फक्त शाळेतील अभ्यासावर अवलंबून राहता येणार नाही, असे पालकांचे म्हणणे असते. प्रत्यक्षात पोटाला चिमटा घेऊन मुलांना शाळेबरोबरच शिकवण्या लावण्याची खरेच गरज असते का, याचा विचार करण्याची सदसद्विवेकबुद्धी हळूहळू नष्ट होत चालली की काय, असे वाटण्याजोगे सध्याचे वातावरण आहे. शाळेचे सहा तास झाल्यानंतर या शिकवणी वर्गात जाऊन पुन्हा शिकण्याने या मुलांच्या मेंदूवर किती ताण येत असेल, याचा विचार करण्याची आवश्यकता कुणाला वाटत नाही. खासगी शिकवणी वर्ग हा एक स्वतंत्र भरभराटीचा व्यवसाय असल्याने, कमीत कमी जागेत अधिकाधिक मुलांचा भरणा करून त्यांच्याकडून घोकंपट्टी करून घेणे आणि परीक्षा नामक राक्षसाला नामोहरम करण्याची शक्ती मुलांमध्ये निर्माण करणे, एवढेच ध्येय समोर ठेवून हे वर्ग चालवले जातात. मग ना सुटी, ना वेळेचे भान, अशा चक्रात सापडलेल्या पाल्यांची दुर्दशा काय वर्णावी!

शाळेत विषय न समजलेल्या तथाकथित ‘ढ’ मुलांना घरी बोलावून पुन्हा शिकवणारे ‘चितळे मास्तर’ आता दिसत नाहीत. गुणांचा पाऊस हाच धोशा असल्याने, अभ्यासक्रम पुरा करण्याची शिक्षकांची धडपड केविलवाणी असते. शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जे करायला हवे, ते करण्यासाठी सरकारी शिक्षण खाते सक्षम नाही, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. मुळात शिक्षण हा अनुत्पादक विषय असल्याने, त्यावर अधिक खर्च करण्यास केंद्र आणि राज्य सरकार तयार नसते. त्यातूनच शिक्षणव्यवस्थेचे खासगीकरण करून सरकारवरील अनुदानाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी नवनवीन धोरणे आखली जात आहेत. याचा अर्थ असाही नव्हे की, खासगी शिकवणी वर्गातील शिक्षणव्यवस्था आदर्शवत असते. मात्र पुन्हा पुन्हा घोटून घेण्याने गुणांच्या शर्यतीत मुले टिकून राहतील, असा बावळट गैरसमज पसरवण्यात शिकवणी वर्गाचे संचालक तरबेज असतात. त्यामुळेच परीक्षेत सर्वाधिक गुण असलेले विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गात शिकल्याची जाहिरातबाजी सुरू होते. अनेकदा एकच विद्यार्थी एकाहून अधिक शिकवणी वर्गाच्या जाहिरातीतही झळकतो, तेव्हा त्याचे गौडबंगाल समजून घेण्याची आवश्यकता पालकांना वाटत नाही. मुलांचे मित्र ज्या शिकवणीला जातात, तेथेच जाण्याच्या मुलांच्या हट्टालाही पालकांना बळी पडावे लागते. हे सगळे जाहिरातबाजीचे परिणाम असतात. वयाच्या सोळा वर्षांपर्यंत शिकवणी वर्ग घेता येणार नाही, हा सरकारचा नवा नियम व्यवहार्य ठरेल की कागदावरच राहील याबद्दल शंका यावी अशी स्थिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांचा सर्वागीण विकास हे नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे, परंतु तो प्रत्यक्षात यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अन्य विषय शिकण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी. क्रीडा आणि संगीत या विषयातील शिक्षकांच्या भरतीला लाल कंदील दाखवत शाळांनी लोकवर्गणीतून असे शिक्षक नेमावेत, असा बिनडोक विचार करणाऱ्या सरकारी बाबूंना शिक्षण कशाशी खातात, हे समजणे अवघड आहे. खासगी शिकवणी वर्ग ही शालेय शिक्षणासाठी समांतर व्यवस्था असू शकत नाही. असता कामा नये. प्रत्यक्षात मात्र चित्र उलटे आहे. शाळेपेक्षा या वर्गाचेच स्तोम अधिक दिसते. ते कमी करण्यासाठी शालेय शिक्षणाच्या दर्जाची चिंता बाळगणे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच या वर्गाच्या दर्जाबद्दलही कठोर कारवाईचा बडगा उचलण्याची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. सरकार यातले काहीही करू शकत नाही, हे तर खरे दु:ख आहे.