देशभरातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांसाठी आयोजित राष्ट्रीय परिषदेसंदर्भात प्रकाशित व प्रसारित होत असलेली वृत्ते केवळ आम्हा आयोजकांचीच नाही तर राज्याची बदनामी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहेत. अंदाज समित्यांचे कामच सरकारी खर्चात काटकसर सुचवणे असल्याने हे आयोजन करतानासुद्धा आम्ही काटकसरीचा मंत्र तंतोतंत पाळला हे आधीच नमूद करतो. यात सहभागी झालेल्या सर्वांची निवासव्यवस्था करताना पंचतारांकित हॉटेलांशी बरीच घासाघीस करून भाड्यात सवलत मिळवण्यात आली. ज्या चांदीच्या ताटाचा उल्लेख वारंवार केला जात आहे त्याचे बाजारातील भाडे अकराशे रुपये आहे.
वाटाघाटीनंतर ते निम्म्या दरात मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. केळीच्या पानावरच जेवण वाढायचे असे आम्ही ठरवले होते. जळगावच्या पुरवठादाराशी संपर्कही साधला पण नेमके तिथे वादळ व पाऊस आल्याने फाटलेली पाने मिळतील असे त्याने सांगितले. मग आम्ही बंगळूरुशी संपर्क साधला पण पानाच्या किमतीपेक्षा वाहतूक खर्चच जास्त होत असल्याने तो बेत रद्द करावा लागला. शिवाय जेवताना एखाद्या सदस्याकडून पान फाटले तर त्यांचा अपमान होईल अशी भीती होतीच. शेवटी आमदारांच्या खाण्याकडे (पैसे नाही) सर्वोच्च लक्ष देणे हे आयोजक या नात्याने आमचे कर्तव्य होते. म्हणून चांदीचे ताट निवडले.
माणसाच्या आयुष्यात चांदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो जन्माला आला की त्याला चांदीच्या चमच्यानेच पाणी पाजले जाते. यात सहभागी झालेल्या सर्वांची भरभराट आधीच झालेली आहे. एका अर्थाने ही ‘चांदी’च! म्हणून हे ताट निवडले. काटकसर करणे म्हणजे पोटाला चिमटा काढणे असा वाक्प्रचार प्रचलित असला तरी या समितीच्या कामकाजाशी त्याचा संबंध जोडणे बादरायण ठरेल. भरल्या पोटानेच माणूस काटकसरीचे उत्तम उपाय सुचवू शकतो. मेन्यू ठरवताना चार हजारांचा दर निश्चित करण्यात आला. बाजारात हाच मेन्यू दहा हजारांना आहे. तो कमी करताना पुरवठादाराला तुझे देयक ‘विनासायास’ मंजूर केले जाईल असे लेखी आश्वासन आम्हाला द्यावे लागले.
देशभरातून आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत महाराष्ट्र मागे नाही हे आम्हाला दाखवून द्यायचे होते. आतिथ्यशीलता हा नेहमीच या राज्याचा स्थायीभाव राहिला आहे. त्याला अनुसरूनच या मेजवानीचे आयोजन करण्यात आले. कृपया आमच्या या आतिथ्यशीलतेचा धुळ्याच्या घटनेशी संबंध जोडू नये. अशा घटना भविष्यात ‘समोर’ येऊ नयेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यात सहभागी झालेले सारे सदस्य हे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान करणे हे आमचे कर्तव्य होते. तेच आम्ही पार पाडले. काहीजण याला सरकारी उधळपट्टी असे म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. अशा परिषदांमध्ये ‘असा’ मेन्यू ही नित्याचीच बाब असल्याचे आम्ही जनतेच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
सर्वच सदस्यांनी तृप्तीचा ढेकर देत या सामिष भोजनाची तारीफ केली. सदस्यांनी तर अधिवेशनकाळात उपाहारगृहात असाच बेत रोज ठेवा अशी विनंती केली. त्यावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. या जेवणाची किंमत दहा हजार रुपये आहे असेच आम्ही सर्व सदस्यांना जाणीवपूर्वक सांगितले. प्रत्यक्षात ती कमी होती हे वृत्त वाचून समजल्याने अनेक सदस्य नाराज झाले. पुढच्या परिषदेत खरीखरी किंमत सांगून ही नाराजी दूर करू, असे आश्वासन आयोजक या नात्याने शेवटी देत आहोत. या स्पष्टीकरणाने वादावर पडदा पडेल अशी आशा आम्हाला आहे. धन्यवाद!