दुरून एखाद्या बागेसारखी वाटणारी स्मशानभूमी. तिथं आंडी, त्याची बायको आणि त्यांचं लहान मूल राहतं. तमिळ भाषेत आंडी म्हणजे दरिद्री. प्रेत गाडण्यासाठी खड्डे खोदणं हे आंडीचं काम. पालिकेने त्याला तिथे राहण्यासाठी जागा दिली आहे. दरमहा काही ठरावीक वेतन निश्चित केलं आहे. आपल्याच नादात गुंगून आंडी हे खड्डा खोदण्याचं काम करत राहतो. त्याच्यासाठी हे रोजचंच काम. खोदताना एक गाणं तो सतत गुणगुणतो. त्या गाण्याचा आशय नेमका असा आहे, खूप विनंती करून बागेतल्या एका भिकाऱ्याने कुंभाराकडून एक मडकं मागून आणलं. नाचत- गात त्यानं एक दिवस ते फोडून टाकलं. प्रेतासाठी खड्डा खोदण्याचं हे काम ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तो काही झाडं लावत असे, झाडांना पाणी घालत असे आणि आपल्या खड्या आवाजात ते गाणं कायम म्हणत असे. लग्नानंतर पंधरा वर्षांनी त्याला मूल झालं आहे. कित्येक प्रेतं या स्मशानभूमीत आजवर गाडली गेली. जणू इतकी माणसं या जागेनं खाऊन टाकल्यानंतर आंडीच्या मुलाच्या रूपाने या जागेवर एक जीव जन्माला आला. या स्मशानभूमीत लहान मुलांची प्रेतंही यायची. बालकाचा मृतदेह जवळ ठेवलेला असायचा, ज्याचं ते मूल आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या कायम धारा वाहत असायच्या आणि आंडी मात्र वेगाने कुदळ मारत खड्डा खोदण्याचं काम गाणं म्हणत करायचा. दफनविधी झाला की तो लगेचच आपल्या घराकडे धावत सुटायचा, आपल्या बाळाचे पापे घ्यायचा. एक दिवस असा उजाडतो की आंडीसाठी भर दिवसा अंधारून आल्यासारखं होतं. त्याचा हा लाडका मुलगा दगावतो. त्याचा निष्प्राण देह पाहून आंडी जणू दु:खाच्या सागरात लोटला जातो. रडून रडून त्याच्या डोळ्यातलं पाणी सरलं आहे. एका क्षणी तो उठतो. कोपऱ्यातली कुदळ घेतो. खड्डा खोदतो. कोवळ्या इरुलनचा मृतदेह छातीशी कवटाळतो. खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह ठेवतो. त्याचे ओठ थरथरू लागतात. एरवी जे गाणं गुणगुणत खड्डा खोदण्याचं काम तो करायचा, आता त्याच्या ओठातून शब्दही फुटत नाहीत. आजपर्यंत इथं आलेली असंख्य प्रेतं त्यानं पाहिली होती, त्या सर्वांसाठी खड्डे खोदले होते पण या प्रत्येक प्रेताच्या मागे एवढं अफाट दु:ख असेल याची त्याने कल्पनाही केलेली नव्हती. …खड्डे खोदताना एरवी तो जे गाणं गुणगुणायचा त्याच गाण्याचा बारीकसा आवाज त्याला येऊ लागला. मग या आवाजात आणखी आवाज मिसळू लागले. एका बालकाच्या आवाजात सहस्रापट आवाज मिसळल्यानंतर जो आवाज घुमेल तो आता घुमू लागला. यातला आपल्या लेकराचा आवाज नेमका कोणता आहे हे त्याला उमजेना. तो सैरावैरा तिथल्या तिथे धावत राहिला पण त्याला इरुलन- त्याचा मुलगा- काही दिसला नाही… आंडी अजूनही स्मशानातल्या एका कोपऱ्यात असलेल्या घरातच राहतो पण आता जेव्हा एखादं प्रेत दफनविधीसाठी येतं तेव्हा तो व्याकूळ होऊन रडायला लागतो. तमिळ लेखक डी. जयकांतन यांची ‘नंदनवनत्तिल ओर आंडी’ ही कथा १९५६ या वर्षी सरस्वती या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. ही त्यांची पहिली कथा. म्हटलं तर ही कथा एकूणच मानवी जीवनाबद्दल काही सांगू पाहते. यातलं मडकं हे कदाचित आयुष्याचंही प्रतीक असेल. गाण्यात असलेली बाग म्हणजे हे जग असेल. स्वत:ला होणाऱ्या दु:खानंतर जगाकडे पाहण्याची बदललेली दृष्टी हा या कथेचा गाभा आहे. डी. जयकांतन अर्थात दण्डपाणि जयकांतन हे तमिळ भाषेतील मोठे कथा- कादंबरीकार. तब्बल चाळीस कादंबऱ्या आणि दोनशेहून अधिक कथा त्यांनी लिहिल्या.

कुठलंही औपचारिक असं शालेय शिक्षण नाही. वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडलं. त्यानंतर आडवंतिडवं आयुष्य जगत, असंख्य बरेवाईट अनुभव घेत, चळवळींमध्ये काम करत जयकांतन लिहीत राहिले. लिहिताना अनेक चमत्कारिक अनुभव येत गेले. सुरुवातीच्या काळात ते कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. पुढे ते काँग्रेस पक्षाशीही संलग्न होते. ‘अग्नी प्रवेशम्’ ही कथा त्यांनी १९६६ या वर्षी ‘आनंद विकटन’ या लोकप्रिय तमिळ साप्ताहिकात लिहिली. अनेकांना या गोष्टीचं कथानक हे क्रांतिकारी वाटलं. जयकांतन यांना मात्र असं काही वाटलं नाही. त्यांच्या याच कथेचा शेवट बदलून आणि त्यातल्या प्रमुख पात्राला आत्महत्या करायला लावून आणखी एकानं याच शीर्षकाची गोष्ट लिहिली. ती छापूनही आली. जयकांतन मोठ्या संयमानं या सगळ्या प्रकाराकडे पाहत राहिले. या घटनेनंतर मात्र त्यांनी या कथेला आणखी वाढवून आणि तिच्या मूळ गाभ्यावर भर देऊन एक कादंबरी लिहिली. ‘सिल नेरंगलिल सिल मनीतरगळ’ या त्या कादंबरीला १९७२ या वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तमिळ भाषेतील योगदानासाठी त्यांना २००२ या वर्षी ज्ञानपीठ पारितोषिक देण्यात आलं.

डी. जयकांतन हे तमिळमधले अत्यंत लोकप्रिय असे लेखक आहेत. १९६०- ७० च्या दशकात लोक त्यांच्या कथांसाठी नियतकालिकांची वाट बघत असत. दक्षिणेतले अनेक लेखक हे साहित्यकृती आणि सिनेमा या दोन्ही बाबतींतही मातब्बरी असणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्यकृती केवळ साक्षर वाचकांपुरत्याच मर्यादित राहतात असं नाही तर या साहित्यकृतींमधला आशय हा लाखो रसिकांपर्यंत पडद्यावरून पोहोचत असतो. विषयातलं वैविध्य आणि रचनेचं सौष्ठव या दोन्ही अंगांनी जयकांतन यांची कथा महत्त्वाची ठरते. त्यांच्या दहा साहित्यकृतींवर सिनेमे निघाले आहेत. त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या कथांचे जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. १९५६ ते १९७२ या कालखंडात त्यांनी लिहिलेल्या काही निवडक कथांचा अनुवाद ‘जयकांतनच्या कथा’ या नावाने मराठीतही उपलब्ध आहे. एखादी रचना केवळ त्याच भाषेत वाचली गेली, नावाजली गेली तर ती काही फार मोठी नसते पण भाषा, प्रदेश या सर्व गोष्टींच्या सीमा ओलांडून माणसातली आपुलकी वाढवणारी जर ही रचना असेल तर ती एका अर्थानं संस्कृतीलाही विकसित करत असते अशी धारणा असलेले हे लेखक आहेत. सतत संघर्षशील आणि प्रवाहाविरुद्ध पोहणारा लेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

जयकांतन हे मानवी जीवन व्यवहारातल्या अत्यंत सूक्ष्म अशा छटांचं चित्रण करतात आणि त्यातल्या जटिलतेसह विलक्षण अशा शब्दसामर्थ्यानं अनुभवांना वाचकांच्या समोर ठेवतात. ‘मी केवळ प्रश्न मांडत नाही, प्रश्नांच्या मागे असणाऱ्या अदृश्य व्यवस्थेचा शोध घेतो’ असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. त्यांच्या साहित्यकृतींनी तमिळ भाषेत अनेक वाद जन्माला घातले आणि अनेक वादळंही उठवून दिली. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधील स्त्री व्यक्तिरेखा या आत्मस्वर जपणाऱ्या आणि त्यासाठी किंमत चुकवणाऱ्या आहेत. ‘सुंदर कांडम्’ या त्यांच्या कादंबरीची नायिका ही पारंपरिक रूढी आणि अमानुष प्रथांचे पाश तोडून टाकते. असेच त्यांच्या अन्यही कथांबाबत म्हणता येईल. त्यांच्या साहित्याची सातत्याने पुनर्मुद्रणे होत असतात यावरून हा लेखक आजही वाचकप्रिय असल्याची साक्ष पटते.

‘ओरु मनिथन ओरु वीडु ओरु उलगाम’ या त्यांच्या एका कादंबरीच्या भूमिकेत त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘केवळ एखादा सागर अथवा नदीलाच पूर्णत्व असतं असं नाही. पाण्याचा एखादा थेंबही त्याच्या अस्तित्वापुरता का होईना पण परिपूर्णच असतो. असंच एखाद्या व्यक्तीबाबतही मानता येईल. एक व्यक्ती म्हणजेसुद्धा एक जग असू शकतं. त्या व्यक्तीचीही एक स्वतंत्र अशी दुनिया असू शकते.’ जयकांतन यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये आलेल्या व्यक्तिरेखा पाहिल्या तर त्यांची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात येतं. जीवनाच्या विविध स्तरांवरील व्यक्तींचा यात समावेश आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, ‘अनुभव, संवेदनशीलता, सहानुभूती आणि निष्ठा अथवा इमान या बाबी परस्परपूरक आहेत, एक दुसरीशी निगडित आहे. लेखक शून्यात काही रचत नाही. सामाजिक परिवेशाशी जोडूनच त्याला सर्व काही रचावं लागतं . तो आपल्या अनुभवातूनच आकार शोधत असतो. जीवनाचं चित्रण केवळ काळ्या, पांढऱ्या रंगात करता येत नाही. एक संवेदनशील लेखक या सापळ्यात अडकून पडणार नाही. तसं झालं तर लिहिणं खूपच सपाट होऊन जाईल. आयुष्य खूप गुंतागुंतीचं असतं.’ एका टप्प्यावर त्यांचं लेखन थांबलं पण त्यांची कथा आजही तितकीच लोकप्रिय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aasaramlomte@gmail.com