महाराष्ट्र राज्य सध्या स्वतंत्र महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेल्या मारोतराव कन्नमवार यांचे तर्कतीर्थांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (२०२५) साजरे करीत आहे. वृत्तपत्र विक्रेता ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास एका निष्ठावान कार्यकर्त्याचा मूल्याधारित जीवनविकास म्हणून पाहावा लागतो. त्यांचे २४ नोव्हेंबर, १९६३ ला अचानक निधन झाले. त्यानंतरच्या ‘नवभारत’ मासिकाच्या जानेवारी, १९६४ च्या अंकात तर्कतीर्थ लक्ष्मणरावशास्त्री जोशी यांनी त्यांच्यावर आदरांजली वाहणारा छोटा लेख लिहिला होता.
मारोतराव कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी, १९०० ला तत्कालीन चांदा जिल्ह्यातील मूल (मरोडा) येथे झाला. घरच्या परिस्थितीमुळे ते शालांत परीक्षेपर्यंतच शिक्षण पूर्ण करू शकले होते. वृत्तपत्र विक्रेता म्हणून त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला. पुढे ते ‘लोकसेवक’ (१९३४), ‘नवसंदेश’ (१९४८), ‘ग्रामसेवक’ (१९५३) यांसारख्या वृत्तपत्रांचे संपादक झाले. त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान व अभ्यास होता. तसे ते बेलदार समाजातील. दगड फोडणे, घडविणे हे या जमातीचे पारंपरिक काम. आज सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाबाईंचे जे स्मारक दिसते, त्याचे पहिले स्वप्न त्यांनी पाहिले होते व तशी योजना केली होती. कन्नमवार विशाल महाराष्ट्रातील मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री होते. पुढे ते विदर्भ समर्थक झाले. विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे नियोजन व विकास कल्पना त्यांची. चिनी आक्रमणानंतर यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाल्यावर पंडित नेहरूंनी कन्नमवार यांना मुख्यमंत्री करण्यामागे विभक्त विदर्भाची धार कमी करणे, हे एक कारण मानले गेले होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळातील एकोपा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहिला नसल्याचे निरीक्षण नोंदवत तर्कतीर्थ खंत व्यक्त करतात. गटबाजीस आळा घालणारे दूरदर्शी व सामर्थ्यशाली नेतृत्व मारोतराव कन्नमवारांच्या रूपात महाराष्ट्रास लाभल्याचा आनंद व्यक्त करण्यास तर्कतीर्थ विसरत नाहीत. मारोतराव कन्नमवार यांनी तरुणपणी असहकार आंदोलनात तुरुंगवास भोगला होता. लोकशाहीत सामान्य माणसात असलेल्या कर्तबगारीस वाव मिळतो, याचे व्यवच्छेदक उदाहरण म्हणजे मारोतराव कन्नमवार होते.
कन्नमवार यांच्या जीवनाचा विचार करीत असताना उपरोक्त लेखापलीकडे प्राप्त संदर्भांतून लक्षात येते की, त्यांनी सावली मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यांचा विवाह हिंगणघाट येथील गोपिकाबाईंशी झाला होता. त्याही मारोतराव यांच्यासारख्या साधेपणाने राहात. पतीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राने गोपिकाबाईंना एसटीत उभे राहून, तिकीट काढून प्रवास केलेले अनुभवले आहे. त्याकाळी लोकप्रतिनिधी एसटीने प्रवास करीत. त्यांची जागा आरक्षित असे. गोपिकाबाई संसार चालविण्यासाठी नोकरी करीत. १९५९ मध्ये नागपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष गोपिकाबाई कन्नमवार होत्या. आज ही आख्यायिका वाटावी असे वर्तमान राजकीय वैभव भूतकाळातील कार्यकर्त्यांचे जीवन राजकीय पक्षनिष्ठा, नैतिकता इत्यादींबद्दल बरेच काही सांगून जाते. अशा या दाम्पत्यावर त्याकाळी बेछूट आरोप करणारे अस्तनीतले निखारेही महाराष्ट्राने अनुभवले आहेत. मारोतराव कन्नमवारांचे साठोत्तर निधन अकाली मानले गेले होते; पण त्याचे कारण हे राजकीय प्रहार होते.
वक्ते म्हणून मारोतराव कन्नमवार मोठे उत्साही होते. बोलत ते व्यासपीठावर पुढे पुढे जात रहायचे. हा गमतीचा भाग सोडला तरी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या रक्तात भिनलेला ध्येयवाद त्यांचे राजकीय विरोधकही अमान्य करणार नाहीत, हे तितकेच खरे! त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिका सफाई कामगार संघटनेने संप केला होता. संपाचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस करीत होते. संप यशस्वी करण्याची त्यांची परंपरा मुख्यमंत्री कन्नमवार यांनी गांधीगिरी करीत हातात झाडू घेऊन मोडीत काढली होती. संरक्षण निधीसाठी २५ लाख रुपयांचा संकल्प सोडलेल्या या मुख्यमंत्र्याने तो प्रत्यक्ष पॅड बांधून पीचवर फलंदाजी करत पूर्ण केला. असे समर्पित मुख्यमंत्री परत महाराष्ट्रास आजवर लाभलेले नाहीत. सामान्य कार्याकर्त्यांतून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याचा करिष्मा त्या वेळच्या राजकारणाचा त्याग व समर्पणावर उभा असलेला पोत, डोलारा सूचित करतो. पूर्वीच्या राजकारणात सामान्य कार्यकर्ता हा पक्ष संघटनेचा कणा असे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com