कार्ल मार्क्सने १८४८ साली कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. १९४८-४९ ला या जाहीरनाम्याची शताब्दी जगभर साजरी होत होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे औचित्य साधून अनेक लेख लिहिले. पैकी ‘मार्क्स व मानसिक संस्कृतीची चिरंतन मूल्ये’ या शीर्षकाचा लेख त्यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या ऑक्टोबर, १९४९ च्या अंकासाठी लिहिला. त्यात तर्कतीर्थांनी नारायण सुर्वेंच्या ‘रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे’ विचाराशी सहमत होत संस्कृती, कला, मूल्ये इत्यादींच्या अनुषंगाने मार्क्सवादी विचारांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

कार्ल मार्क्सचे विचार भौतिकतेचे महत्त्व अधोरेखित करतात. तर्कतीर्थांच्या म्हणण्यानुसार, हा विचार दुसरा -तिसरा काही नसून तो केवळ ‘अर्थाद्वैतवाद’ आहे. माणसाच्या जगण्यास अर्थतत्त्व लागते हे खरे; पण केवळ त्याने माणसाचे जीवन पूर्ण नि समृद्ध होत नाही. मार्क्सवादानुसार नैतिक, कलात्मक, वाङ्मयासंबंधी, कायदाविषयक, राजकीय वा तत्त्वज्ञानरूप सर्व मानवी व्यवहारांना आर्थिक जीवनाशिवाय इतिहास नाही. आर्थिक शक्तीचा इतिहास हाच खरा मानवी इतिहास आहे. नीती, धर्म, तत्त्वज्ञान, कला, वाङ्मय या मानसिक विश्वातील मूलभूत सत्य आर्थिक जीवनच आहे. याव्यतिरिक्त अन्य तत्त्वे बाह्य देखावा होय. यासच अर्थाद्वैतवाद असे तर्कतीर्थांनी संबोधले आहे. यामुळे मानवास मानवी इतिहासाचे रहस्य प्राप्त झाल्याचा आनंद स्वाभाविक म्हणावा लागेल. फ्राइडनेही सर्व मानवी वृत्ती मनोविश्लेषण पद्धतीने स्पष्ट केल्या, तेव्हा मानवास असाच आनंद झाला. अर्थ आणि काम हे जीवन सर्वस्व नव्हे, ते दैहिक होय. आत्मिक तत्त्व मानवास अधिक आनंद देते, असे मत या लेखात तर्कतीर्थांनी व्यक्त केले आहे. क्रमबद्धता हे इतिहासाचे वैशिष्ट्य होय. क्रमबद्धतेत कार्यकारणभाव दडलेला असतो. कार्यकारणभाव सिद्ध करणे हे अवघड काम असते. ते इतिहासशास्त्र करते. यामुळे मार्क्स आणि फ्राइड यांची भुरळ आधुनिक जगावर पडली हे खरे आहे; पण ती भुरळ मद्याधुंदीसारखी सामायिक, क्षणिक असते. मूल्यप्रभाव हा जीवनभर कार्य करत असतो. शिवाय तो चरित्र घडवितो. मूल्यांचे महत्त्व व अर्थ किंमत यात फरक असतो.

इतिहासकाळामध्ये शंकराचार्यांच्या मायावादाने आणि बुद्धाच्या क्षणवादाने अशीच भुरळ घातली होती. ती दीर्घकाळ जनमानसावर प्रभाव टाकू शकली नाही. इंद्रिय भ्रम हे क्षणिक असतात. मूल्यप्रभाव आजीवन परिणामकारक व सक्रिय असतात. जी जी मार्क्सवाद, मायावाद, क्षणवादसारखी विचारसरणी सामान्य जनमानसावर गारूड करते, ती वस्तुस्थिती प्रधान असल्याने मानवास क्षणभर प्रचार प्रभावामुळे विस्मयजनक वाटते. अशा प्रचारी विचारधारांचा विजय प्रभाव ओसरला की लुप्त होतो, हे इतिहासाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. आर्थिक इतिहास आणि मानसिक इतिहास एकमेकांत गुंतलेले असतात हे खरे; पण त्यांचे पृथकत्व मान्य करावेच लागेल.

जीवनमूल्ये दोन प्रकारची असतात- १) कालमर्यादित, २) चिरंतन. जाणीव आणि जीवन वेगळे करून दाखविता येत नाही. नीती, धर्म, कायदा, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान या जाणीवस्वरूप तत्त्वांना आर्थिक व्यवहाराच्या फायद्याच्या तुलनेत दुय्यम ठरविण्याचे कार्य कार्ल मार्क्सने केले; पण इंद्रिय निग्रह, चित्तशुद्धी, सर्वभूत अनुकंपा, समत्वबुद्धी इत्यादी धार्मिक, नैतिक चिरंतन मूल्ये अर्थतत्त्वासारखी मर्यादित कालप्रभावी न ठरता कल्पान्तापर्यंत अबाधित आहेत, राहतील असे आपण आज अनुभवत आहोत. कलेचा कच्चा माल कालमर्यादित असतो; पण कला मात्र कालजयी, मृत्युंजयी असते हे कोण नाकारेल? कलेची सर्वानुभूत चिरंतनता मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या विनाश कल्पनेशी मेळ राखू शकत नाही.

‘रामायण’, ‘महाभारत’सदृश महाकाव्ये आज निष्ठा, तत्त्वदुय्यम झाल्याच्या काळात मानवास अधिक सद्गदित करत राहातत. ‘बायबल’मधील सृष्टीरचना कल्पना आज मिथ्या वाटते. मायकेल एंजेलोची फ्लॉरेन्समधील पूजा मंदिर शिल्पे जी आदममध्ये अंगुली स्पर्शमात्राने शरीरात ईश्वरीय संचाराची अनुभूती देतात. शकुंतलेचा गटेवरचा प्रभाव, अशा अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होणारी गोष्ट एकच आहे, ती ही की, मार्क्सनिर्मित वर्गअहंकार बाधा, फ्राइडनिर्मित मनोगंड पीडा आणि मानसिक संस्कृतीतील चिरंतन मूल्ये यात कल्पांतापर्यंत काय टिकते हे दाखवून तर्कतीर्थांनी मूल्य महत्त्व रेखांकित केले आहे. तेच तर्कतीर्थांचे वैचारिक योगदान आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com