‘ताबडतोब भेटायला या’ असा निरोप दिल्लीतील चाणक्यांकडून मिळताच एकनाथराव चमकलेच. बोलावण्यामागचे कारण काय असेल? राज्याचा प्रमुख होण्याचे जे स्वप्न बघितले, त्याची पूर्तता की आणखी काही या प्रश्नासरशी त्यांची छाती धडधडू लागली. यातून कसेबसे सावरत ते चाणक्यांच्या निवासस्थानी पोहचले तर तिथे देवाभाऊ व चंदूभाऊ बसलेलेच. त्यांना बघून त्यांचा हिरमोड झाला पण चेहऱ्यावर तो दिसू न देता ते स्थिरावले. शांततेचा भंग करत चाणक्य म्हणाले. ‘ये देखो एकनाथरावजी, युतीतील सहकारी पक्षाचे प्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला मान देतोच. त्यात हयगय होणार नाही याची काळजी घ्या अशा ‘सख्त’ सूचना मी दिलेल्या. मात्र एखादे राष्ट्रीय संकट असेल किंवा राज्यातले आंदोलन, त्यावर मात करण्याचे श्रेय निर्विवादपणे सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या आमच्याच पक्षाला मिळायला हवे. अशा प्रसंगात मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो हे अनुभवावरून तुम्हाला ठाऊक आहेच. त्यात तुमच्याकडून आततायीपणा अपेक्षित नाही.’ हे ऐकताच एकनाथरावांच्या लक्षात सारा प्रकार आला. तरी राष्ट्रीय संकटात आपण कुठे मध्ये कडमडलो हे त्यांना आठवेना.

मनातले विचार ओळखण्याची सवय जडलेले चाणक्य म्हणाले. ‘त्या पहेलगामला तुम्हाला यायची काहीच गरज नव्हती. मी गेलो होतो ना तिथे. अशावेळी तुम्ही तिघांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे. म्हणजे श्रेयाचे सुद्धा समान वाटप होईल की! संकट आले की धावून जायची तुमची सवय मान्य पण तुम्ही थेट घटनास्थळी न जाता सीएमओच्या वॉररूममध्ये जायला हवे. त्या बच्चू कडूच्या प्रकरणात चंदूभाऊ आदल्या दिवशी जाऊन आले. सकाळी निर्णय घेतो असे त्याने जाहीर केल्यावर उदय सामंतला पाठवायची काय गरज होती? त्यांनीही चंदूभाऊंचेच पत्र वाचून दाखवले. तिकडे तुम्ही मीच उपोषण सोडवले असे जाहीर करून टाकले. हे यापुढे चालणार नाही. घटक पक्ष म्हणून कुणी कुठे, केव्हा श्रेय घ्यायचे याचा फार्म्युलाच मी देणार. जसे जागावाटप केले तसाच. श्रेय मिळणाऱ्या दहा घटना असतील तर प्रत्येकी दोन तुमच्या वाट्याला येतील व सहा आमच्या. तुम्ही श्रेय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात अथवा नेतृत्वात तोडगा काढला असे म्हणणे बंधनकारक असेल. तुमच्या पक्षाचा प्रभाव असलेल्या मराठवाडा व कोकणात एखादे अधिकचे श्रेय तुमच्या पदरात पडत असेल तर नियमाला अपवाद म्हणून ते मान्य करू त्यापेक्षा जास्त मिळणार नाही.’ हे ऐकून काहीच परिणाम झाला नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करूनही एकनाथरावांचा चेहरा पडलाच. चाणक्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून नागपूरचे दोन्ही भाऊ खूश झाले. ‘निघाले संकटमोचक व्हायला, आता कशी जिरवली. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाशी पंगा घेता काय?’ हेच विचार या दोघांच्या मनात एकाच वेळी तरळून गेले. शेवटी चाणक्य म्हणाले. ‘त्या ट्रम्पच्या श्रेयवादामुळे आम्ही आधीच अडचणीत आलेलो. तो मुद्दा आंतरराष्ट्रीय असल्याने काही बोलता येत नाही पण कोणत्याही स्थितीत हे लोण आम्हाला भारतीय सत्तावर्तुळात पसरू द्यायचे नाही. एवढे लक्षात ठेवा व निघा आता.’ आदेश मिळताच तिघेही उठले व मुंबईकडे रवाना झाले. प्रवासात एकनाथराव विचार करू लागले. आता मराठवाडा व कोकणात जास्तीत जास्त बच्चू कडू शोधून त्यांना आंदोलन करायला लावायचे. या नियमाला एवढे अपवाद उभे करायचे की नियमच बासनात गुंडाळला गेला पाहिजे. मग त्यांना गाढ झोप लागली.