प्रत्येक शहराची एक खाद्यासंस्कृती असते आणि ती जिथे फुलते ती ठिकाणे तिथल्या रहिवाशांसाठी कायमच खास असतात. मुंबईत ताडदेवमध्ये १९६३ साली एक हॉटेल सुरू झाले. महिला अर्थार्जनाच्या प्रवाहात येण्याचा आणि घराबाहेर खादाडी सुरू होण्याचा तो अगदी सुरुवातीचा काळ. तेव्हा एका महिलेने आपल्या घरच्या स्वयंपाक्यासह हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेणे विशेषच होते. साधारण १०० फुटांच्या जागेत सुरू झालेले टपरीवजा हॉटेल आज मुंबईकरांसह देशविदेशांतील मान्यवरांना तृप्त करत आहे. ही किमया साधणाऱ्या, काळाच्या कसोटीवरही अन्नातील साधेपणाच टिकतो हे सिद्ध करणाऱ्या आशा झवेरी यांचे नुकतेच निधन झाले.
‘स्वाती स्नॅक्स’ची स्थापना आशा झवेरी यांच्या आईने- मीनाक्षी यांनी केली. त्या चटण्यांपासून, पाणीपुरीच्या पुऱ्यांपर्यंत सारे काही घरीच तयार करत आणि संध्याकाळी चार वाजता हॉटेल उघडत. तेव्हा केवळ दहाच पदार्थ विकले जात. प्रत्येक गल्ली-बोळात दोन-चार आइस्क्रीम पार्लर्स सुरू होण्यापूर्वीच्या त्या काळात त्यांचे सीताफळ आइस्क्रीम अतिशय लोकप्रिय होते. मीनाक्षी यांच्यामागे हॉटेलची धुरा आशा झवेरींच्या खांद्यावर आली. त्यांनी नवनवे पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. महानगरी मुंबईला अपेक्षित असलेले खाद्यावैविध्य झवेरी यांनी आपल्या हॉटेलात आणले. महाराष्ट्रातल्या मिसळपासून, दक्षिणेतले डोसे, गुजराती पद्धतीची खिचडी, पारसी धनसाक असे विविध प्रांतांचे पदार्थ हॉटेलात एकत्र नांदू लागले. १९९०च्या दशकापासून हॉटेलची कीर्ती मुंबईभर पसरली. आज तेथील सर्वाधिक प्रसिद्ध पदार्थ आहे पानकी.
माधुरी दीक्षितने ‘अॅपल’चे सीईओ टिम कुकबरोबर वडापाव खात असतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते. तिने रेस्टॉरन्टचे नाव लिहिले नव्हते. पण तरीही पार्श्वभूमीवर असलेल्या काळ्या फळ्यामुळे ते कुठे गेले आहेत, हे चाहत्यांना कळलेच. एम. एफ. हुसेन, झाकिर हुसेन यांचेदेखील हे आवडते रेस्टॉरन्ट होते. पण आशा झवेरींनी आपल्या रेस्टॉरन्टची ‘सेलिब्रिटीजचे बडे रेस्टॉरन्ट’ म्हणून ओळख निर्माण करण्याऐवजी साध्या पदार्थांच्या उत्तम चवीचा आनंद देणारे रेस्टॉरन्ट हीच ओळख कायम जपली.
वडापाव, डोशासारखे साधेच आणि प्रत्येक हॉटेलात उपलब्ध असणारे पदार्थ फार काही सजावट वगैरे न करता विकणाऱ्या या हॉटेलचा समावेश २०२१ साली ‘इसेन्स ऑफ एशिया कलेक्शन’मध्ये करण्यात आला. ‘मिशिलीन स्टार’ शेफ असलेले रवींद्र भोगले आणि प्रतीक संधू यांनीही इथल्या वडापावचे कौतुक केले होते.
रेस्टॉरन्ट लोकप्रियतेचे नवनवे टप्पे गाठत असताना आशा झवेरी मात्र नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिल्या. काहीतरी जगावेगळे करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होण्यासाठी धडपडण्याच्या या काळातही त्यांनी भारतीय पारंपरिक पदार्थांतूनच अधिक चांगलं काय देता येईल, यावर भर दिला. ६० वर्षांत मुंबईची खाद्यासंस्कृती, मुंबईकरांचे प्राधान्यक्रम, त्यांचा आर्थिक स्तर, रेस्टॉरन्टमध्ये जाण्याचा उद्देश सारे काही बदलत असतानाही झवेरींच्या रेस्टॉरन्टसमोरचे ‘वेटिंग’ वाढतच राहिले. त्यांच्या जाण्याने मुंबईच्या खाद्यासंस्कृतीतील एक दुवा निखळला आहे.