आषाढातील पहिलादिवस. झिम्माड असा पाऊस. सगळीकडे दाटून आलेले काळेभोर मेघ अखंड बरसत आहेत. सर्वांग भिजून घरी आलेली मल्लिका आपल्या आईला- अंबिकेला- कोरडी वस्त्रे मागत आहे. आज पाऊस कोसळणार हे माहीत होतं तरीही मी डोंगराच्या पायथ्यापर्यंत खाली उतरत गेले. मला भिजल्याचा खेद नाही. भिजले नसते तर मी या पावसापासून वंचित राहिले असते. आज हा क्षण मी कधीच विसरणार नाही. सौंदर्याचा असा साक्षात्कार मी कधी अनुभवलाच नाही. तरीच मला वाटलं की असं काय आहे की जे भावनेला कवितेत रूपांतरित करतं. पहिल्यांदा मला जाणवलं की पर्वत शिखरावरून विहरणाऱ्या ढगांमध्ये आणि त्याच्या नाना आकारांमध्ये इतकं कसं कुणी हरवून जाऊ शकतं. आषाढातल्या पहिल्या दिवसाच्या या रोमांचित अनुभवाने मल्लिका विलक्षण भावविभोर झाली आहे. कालिदासावर तिचं अतोनात प्रेम आहे. कालिदासाच्या काव्याची महती सर्वदूर पोहोचली आहे. त्याला उज्जयिनीच्या राजाचं बोलावणं येतं. त्याची जायची इच्छा नसते. तो द्विधा मन:स्थितीत असतो पण मल्लिकाच त्याला जाण्याचा आग्रह करते. मल्लिकेवर जीव जडलेली विलोम या नावाची एक व्यक्तिरेखा आहे. हा विलोम स्वत:ला अयशस्वी कालिदासच समजत असतो. अखेर कालिदास उज्जयिनीला जातो.

दरम्यान तिकडे गेल्यानंतर कालिदास स्वत: राजपुरुष झालेला आहे. प्रियंगुमंजिरी या राजकन्येशी त्याने विवाह केला आहे. मातृगुप्त या नावाने एक शासक अशी त्याची ओळख झालेली आहे. काळ निघून जातो. इकडे कालिदासाच्या प्रतीक्षेत असलेली मल्लिका विपन्नावस्थेत आयुष्य कंठत असते. अधूनमधून त्याची खबरबात तिला कळत असते. तिच्या आईचा- अंबिकेचा- मृत्यू झालेला आहे. कालिदासाच्या सहवासातले प्रेमाचे लोभस दिवस संपून आता तिचे आयुष्य रंगहीन झाले आहे. तरीही कालिदासाविषयी तिच्या मनात आकर्षण आणि प्रेमाचा एक कोपरा तिने अजूनही जपून ठेवला आहे. त्याचवेळी मातृगुप्ताने ‘राजसंन्यास’ घेतल्याच्या बातम्या गावी येतात. सत्तेच्या सावलीत कालिदासाचे मन लागत नाही. पूर्वीचं जे सर्जन आहे, निर्मिती आहे त्यालाच ही सत्ता नष्ट करून टाकत असल्याचा अनुभव त्याला येतो. आपल्यातल्या कलावंताच्या संवेदनशीलतेवर काजळी चढत असल्याची त्याची भावना होते. या सत्तेने माझ्यातल्या कलावंताला संपवलंय. मला मातृगुप्ताच्या कलेवरापासून मुक्त होऊन पुन्हा कालिदास म्हणून जगायचंय, असं त्याला वाटतं आणि तो परत गावी येतो. पद, प्रतिष्ठा, मोह यामुळे मी त्या जगतात प्रवेश केला पण मी तिथं राहून काहीच नवं लिहू शकलो नाही. जे लिहिलं ते इथल्या जीवनाचंच संचित होतं. माझ्या कलाकृतींमधून आपल्या दोघांचंच आयुष्य मी पुन्हा पुन्हा लिहीत गेलो. तिथल्या राजप्रासादी वातावरणात मला काही सुख वाटलं नाही. उलट एका विशाल आणि मुक्त अशा माझ्या आधीच्या जगण्यापासूनच मी तुटला गेलोय, असं तो मल्लिकेला सांगतो. या कालिदासाच्या भावनेत सत्ता विरुद्ध सर्जन असं द्वंद्व आहे.

आताही आषाढातले ढग गरजत आहेत. विजा चमकत आहेत. अनिवार पाऊस कोसळतोय. असाच तेव्हा तो कोसळत होता आणि कालिदास एका जखमी हरणाच्या पाडसाला घेऊन आलेला असतो. तेव्हा मल्लिकानेच त्या पाडसाचे प्राण वाचवले होते, हे कालिदासाला आठवत राहतं. मध्ये खूप काळ वाहून गेला आहे. मल्लिकेला एक बाळ झालं आहे. एका क्षणी त्याच्या रडण्याचा आवाज येतो. कालिदास त्या आवाजाने चपापतो. काळ कोणाची प्रतीक्षा करत नाही. हे त्याला उमगतं. इथे कालिदास ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही सर्जनशक्तीचे ते प्रतीक आहे.

‘आषाढ का एक दिन’ हे भारतीय रंगभूमीवरचं मोहन राकेश यांचं अत्यंत चर्चित असं नाटक आहे. भारतातच नव्हे तर विदेशात त्याचे प्रयोग झाले आहेत. अमृतसरमध्ये जन्मलेल्या या लेखकाची जडणघडण कोणत्या पार्श्वभूमीवर झाली हे जाणून घेण्यासाठी त्यांनीच लिहिलेला एक प्रसंग अधोरेखित करण्यासारखा आहे.

अशीच एक रात्र. तिच्या अलीकडे आणि पलीकडे दोन जगं विभागली आहेत. ही दोन्हीही जगं माझीच आहेत. त्यांच्या दरम्यानची ती रात्रही माझी स्वत:ची आहे. जी अजूनही सरलेली नाही. त्या रात्री झोप आलीच नव्हती. अंधारात भिंतीवर डोकं टेकून बसलो होतो. खिडकीतून नजर एकटक आकाशाकडे होती आणि त्यानंतर येणाऱ्या अज्ञात उद्याचा अंदाज घेत होतो. काही वेळापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह खाली ठेवलेला होता. सकाळपर्यंत थांबणं भाग होतं. तेवढ्यात अंधारात आलेल्या एका करड्या आवाजाने एक इशारा दिला. रडणारे आवाज एकाएकी थांबले. घरमालकाच्या मोठ्या मुलाचा आवाज होता तो. ‘मी प्रेत उचलू देणार नाही. जोवर घराचं भाडं दिल जाणार नाही तोवर प्रेताला कोणाला हात लावू देणार नाही.’

काही महिन्यांचं घराचं भाडं थकलं होतं. वडिलांच्या आजारपणातच बरेच पैसे खर्च झाले होते. घर मालकाचा मुलगा असं बोलून गेल्यानंतर बराच वेळ त्या अंधारात जणू सन्नाटा पसरल्यासारखं झालं. कोणाचीही कोणालाही काहीही बोलण्याची हिंमतच झाली नाही. अगदी रडण्याची सुद्धा नाही. जमा झालेले सगळे लोक एक एक करत पांगले. पुन्हा सकाळी परतले. अंत्ययात्रेत काही आडकाठी आली नाही कारण आईच्या हातातल्या बांगड्या विकल्या गेल्या होत्या. घराचं भाडंही चुकतं केलं होतं. पण त्या रात्री खिडकीतून दिसणाऱ्या अथांग आकाशाकडे एकटक नजर लावताना केवढं काही पाहिलं जे आजवर घडून गेलं होतं, घडत होतं आणि घडणार होतं. घडून गेलेल्या घटना, प्रसंगांच्या कालपर्यंतच्या सावल्या उगवणाऱ्या उद्याच्या वळणावर विसावल्या होत्या. कडाक्याच्या थंडीची रात्र होती. खिडकीचे लोखंडी गज थंड पडले होते. तरीही काकडणाऱ्या हातांनी त्यांना गच्च धरून ठेवलं होतं.

वडिलांचा मृत्यू, आई, भाऊ-बहीण यांच्या अकाली अंगावर येऊन पडलेल्या जबाबदाऱ्या हे सगळं निस्तरण्यासाठी एका कोवळ्या पोरावर आलेलं दडपण आणि पुढे ते सारं निभावताना त्याच्यात अकाली आलेलं प्रौढत्व… १६ व्या वर्षी आयुष्याने एक मजबूत अशी चौकट आखून दिली की कसेही असो पण स्वत:ला या चौकटीच्या आकारातच ओतावं लागणार होतं… मदन मोहन गुगलानी या नावाच्या एका मुलाच्या मन:स्थितीची ही तेव्हाची गोष्ट. भारतीय नाट्यजगतात मोहन राकेश या नावाची जी नोंद आहे, त्या नोंदीमागचा भूतकाळ हा असा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनीच सांगितल्याप्रमाणे कालचं वास्तव हे आजचं स्वप्न असतं आणि उद्याचं स्वप्न म्हणजे आजचं वास्तव. जीवनातला कोणताच क्षण सुटा आणि स्वायत्त असत नाही. तो मागच्या, पुढच्या क्षणांनी बांधलेला असतो. जे घडून जातं त्यात माणूस आपली मुळं पसरत जातो. या आणि येणाऱ्या क्षणांच्या फांद्या हलत राहतात. जीवनातला प्रत्येक दिवस हा मागच्या दिवसातून उगवून येतो. तोच येणाऱ्या दिवसाला जन्म देण्यासाठी व्याकुळ असतो. ही व्याकुळता, अस्थिरता हे मोहन राकेश यांच्या लेखनाचे सूत्र आहे. त्यात एक अधुरेपण, अशाश्वती आणि एक प्रकारची अपूर्णता आहे. ती खंडित असली तरी त्यांच्या नाटकातून, कथेतून येते तेव्हा ती कलाकृती म्हणून वाचकाला, रसिकाला परिपूर्णतेचाच अनुभव देते. स्वातंत्र्यानंतर नव्या जाणिवेने साहित्य निर्मिती व्हायला लागली, त्यात मोहन राकेश हे देखील एक महत्त्वाचे शिलेदार होते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, डायरी, निबंध अशा अनेक वाङ्मय प्रकारात त्यांनी लेखन केलं. ‘नई कहानी’ या नावाने हिंदीत जी नवकथा लिहिली गेली त्यात राजेंद्र यादव, कमलेश्वर यांच्यासोबत जे नाव जोडलं गेलं ते होतं मोहन राकेश. १९४४ ते १९७२ या काळात त्यांनी साठहून अधिक कथा लिहिल्या. स्त्री- पुरुष संबंधातलं प्रेम, नात्यातलं विघटन, संबंधातले ताणतणाव, परंपरागत नीतिनियम आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य या दोन्ही दरम्यान होणारा संघर्ष अशी आशयसूत्रे त्यांच्या कथालेखनाची आहेत. त्यांच्या ‘आधे अधुरे’ या गाजलेल्या नाटकाची नायिका आजही समकालीन वाटते. मध्यमवर्गीय जीवनातील कौटुंबिक ताण या नाटकात आहेत. त्यांच्या कथांमध्येही खंडित अशा प्रकारचे मनोविश्व येते, ज्यात कुरतडलेपणाची भावना आहे. परिपूर्तीपेक्षा असमाधानाची टोचणी आहे… सत्तेने आपल्यातील कलावंताच्या सर्जनाला नख लावलं असं असमाधान वाटून शेवटी एकाकी भासणारा ‘आषाढ का एक दिन’मधला कालिदास. शोकान्त आयुष्य जगणारी मल्लिका यांच्याही आयुष्यात टोचणी आहेच. एवढं सगळं लिहिणाऱ्या मोहन राकेश यांना आयुष्य लाभलं ते केवळ ४७ वर्षांचं. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं. आयुष्य अधुरं लाभलं तरी त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृती या परिपूर्ण असा अनुभव देणाऱ्याच आहेत.