भरदिवसा खून, दहशत माजविण्यासाठी गोळीबार, दुचाकीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून गोळीबार, तडीपार असतानाही सराइतांचा राजरोसपणे कोयते, पिस्तुलांसह शहरात वावर, वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकारांनी पिंपरी-चिंचवडकर भयभीत झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सहा वर्षे होत आले तरी गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखायची कशी? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.

शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत १८ पोलीस ठाणे येतात. आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे येथे झपाट्याने शहरीकरण होत आहे. परराज्यातील कामगारांचे वास्तव्य असल्याने संमिश्र लोकसंख्या आहे. औद्योगिक वसाहतीमुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आला. त्यातून वाद निर्माण होत आहेत. जमीन बळकावणे, ताबा ठोकणे आणि आर्थिक लालसेतून भांडणे होऊ लागली आहेत. जागांच्या व्यवहारासाठी गुंडांची मदत, जागा मालकांना धमक्या देणे असे प्रकार घडू लागले आहेत. खंडणी, माथाडी नेत्यांच्या त्रासाने उद्योजक हैराण आहेत. सुरक्षारक्षकांना धमकावून कंपन्यांमधील लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले जाते. यामध्ये भंगार व्यावसायिकांचा हात असल्याचे बोलले जाते. अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी, अतिक्रमण, समाज माध्यमावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण, संघटित गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश! अखेर पुणे विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी

पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला. मात्र, पोलिसांच्या कारवाया होत असल्या तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. तडीपार गुन्हेगार राजरोसपणे शहरात फिरतात. त्यांच्याकडे कोयते, पिस्तूल आढळून येतात. कोयता गँग सक्रिय आहे. पिस्तूल बाळगतानाचे ‘रिल्स’ समाज माध्यमावर ठेवण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते. वर्चस्व वादातून लोकांमध्ये दहशत माजविली जाते. तळेगाव दाभाडे येथे तर गुन्हेगारांनी एका ठिकाणी नव्हे तर चार ठिकाणी हवेत गोळीबार करत प्रचंड दहशत माजविली. यामागे दहशत निर्माण करण्याचा की इतर कोणता कट होता हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चाकण येथील मोहितेवाडीत दुचाकीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाने जागा न देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. गेल्या तीन वर्षांत गोळीबाराच्या ६९ घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलिसांनाच मारहाण केली जाते. गुन्हेगार पोलिसांनाही जुमानत नाहीत. पोलिसांचे वर्चस्व, धाक, भीती राहिल्याचे दिसून येत नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस रोखणार तरी कधी आणि कशी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…पिंपरी- चिंचवड: शरद पवार गटापाठोपाठ ठाकरे गटाने पिंपरीसाठी ठोकला शड्डू; पिंपरीतून शहराध्यक्ष भोसले इच्छुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धगधगते तळेगाव दाभाडे!

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, शांत, निसर्गरम्य आणि पुणे-मुंबईकरांनी दुसरे घर (सेकंड होम) म्हणून पसंती दिलेल्या तळेगाव दाभाडे परिसराला गेल्या काही वर्षातील हत्याकांडांमुळे गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या शहरातील लोकसंख्या सातत्याने वाढत असताना जमिनीला आलेला सोन्याचा भाव आणि राजकीय वर्चस्व वादातून वाढलेल्या गुन्हेगारीमुळे तळेगाव असुरक्षित झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या (२०१०), बंटी वाळूंज यांचा गोळ्या घालून खून (२०१५), आढे गावचे सरपंच बाळासाहेब केदारी यांचा राजकीय वैमनस्यातून खून (२०१५), तळेगाव-दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची हत्या (२०१६), प्रणव मांडेकर यांचा गँगवारमधून खून (२०२२), प्रति शिर्डी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा खून (२०२३), जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून (२०२३) या खूनसत्रांनी तळेगाव दाभाडे हादरले आहे. त्यातच आता मागील दोन महिन्यांत दोनवेळा गोळीबार झाला. मागील गुरुवारी टोळक्याने रात्री आठच्या सुमारास चार ठिकाणी हवेत गोळीबार केला आणि दहशत माजविली.

ganesh.yadav@expressindia.com