ज्या ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारां’ची घोषणा गेली दोन वर्षे केंद्र सरकारने रोखून ठेवली आहे, तो पंचेचाळिशीच्या आतल्या शास्त्रज्ञांना मिळणारा पुरस्कार १९८० साली व्ही. एस. अरुणाचलम् यांना मिळाला होता. त्या पुरस्काराचा उल्लेख अरुणाचलम् हे पुढल्या दशकभरात मिळालेल्या ‘पद्मश्री’ (१९८५) व ‘पद्मविभूषण’ (१९९०) पेक्षाही अधिक सविस्तरपणे, आवर्जून करताहेत, अशा प्रकरणापासून त्यांचे ‘फ्रॉम टेम्पल्स टु टर्बाइन’ हे २०१९ सालचे पुस्तक सुरू होते. ‘डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ) चे प्रमुख आणि १९८२ ते ९२ या काळात संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि पुढे ‘तेजस’ लढाऊ विमान- प्रकल्पाचे उद्गाते असा त्यांचा प्रवास या पुस्तकातून उलगडतो. आजही ते पुस्तक वाचता येईल, पण तंत्रज्ञानाची सांगड राष्ट्रहिताशी घालणाऱ्या अरुणाचलम् यांच्या आयुष्याचा ग्रंथ १६ ऑगस्ट रोजी मिटला आहे.

‘आमच्या कुटुंबात सगळे वैज्ञानिकच होते.. त्यामुळे घरात गप्पा चालत त्या प्रयोगशाळांच्याच. पण त्याही वयात मला जाणीव झाली की तंत्रज्ञान हे विज्ञानापेक्षा निराळे- आणि आवश्यकसुद्धा- आहे,’ असे एका मुलाखतीत ते म्हणाले होते. ‘तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरायचे तर धोरण हवेच’ हे सूत्रमय विधान तर त्यांनी अनेकदा केलेले होते. अगदी पदव्युत्तर शिक्षण घेतानाही, ‘माझी राजकीय मते काहीही असोत, ब्रिटनची औद्योगिक क्रांती तसेच लेनिनने रशियात केलेला विजेचा प्रसार ही त्या देशांना पुढे नेणारी धोरणे होती!’ असा युक्तिवाद ते करत.

बालपण ‘विश्वेश्वरय्यांच्या’ म्हैसुरात गेलेल्या अरुणाचलम् यांच्यावर खरा प्रभाव पडला तो पीएच.डी.नंतरचे त्यांचे मार्गदर्शक व युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समधील प्रख्यात धातुशास्त्रज्ञ रॉबर्ट कान यांचा. धोरण व विज्ञान-तंत्रज्ञान यांची सांगड घालणारे पूर्वसुरी एम. जी. के. मेनन आणि राजा रामण्णा यांची वाट आपल्याला प्रशस्त करायची आहे, याची जाणीव अरुणाचलम् यांना होती. त्यातूनच ‘डीआरडीओ’च्या कामाची व्याप्ती तर वाढलीच, पण फायबर-ऑप्टिक जाळे देशभर पोहोचवायचे, त्याच वेळी निरक्षरता कमी करून शिक्षण-प्रसार वाढवायचा याकामीदेखील एक धोरणकर्ता म्हणून अरुणाचलम् यांनी योगदान दिले. विषयाचे मर्म ओळखण्याची आणि इतरांपर्यंतही नेमके पोहोचवण्याची हातोटी त्यांच्यात होती, याची साक्ष देणारे लिखाण २००९ सालच्या ‘फॉरेन पॉलिसी’ नियतकालिकात सापडते.. इथे सामरिक, व्यूहात्मक वगैरे चर्चेचा आव आणण्याऐवजी त्यांनी भारताच्या तंत्रज्ञान क्षमता कशा मोठय़ाच आहेत यावर लिहिले आणि त्यासाठी उदाहरण म्हणून ‘बेंगळूरुचे माझे जुने घर मी पुन्हा बांधायला काढले’ याची गोष्टच सांगण्याचा पवित्रा घेतला! अमेरिकेतील कार्नेजी-मेलन, तर ब्रिटनमधील वार्विक विद्यापीठात ते तंत्रज्ञान-धोरण हा विषय काही काळ शिकवत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तेजस’ या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाच्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यापासून ते या विमानाचा आराखडा तयार होईपर्यंतच्या प्रवासात ते कार्यरत होते आणि पुढेही त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. त्या ‘तेजस’ला खमकेपणा देऊन वापरात आणणे, हीच अरुणाचलम् यांना खरी आदरांजली ठरेल.