मूलत: जी माणसे प्रज्ञावंत असतात, त्यांना ज्ञान-विज्ञान विद्याशाखांच्या मर्यादा नसतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मूलत: वेदांती असले, तरी त्यांचे ग्रंथ, लेख, भाषण, मुलाखती, प्रस्तावना, समीक्षा यांना विषय सीमा नसत. ‘भारतीयधर्मेतिहासतत्त्वम्’ हा १९३३ मध्ये लिहिलेला संस्कृत प्रबंध आहे. यात इतिहास लेखन पद्धतीसंबंधी प्रचलित पौर्वात्य व पाश्चिमात्य शैलींचा ऊहापोह आहे. हा संस्कृत प्रबंध तर्कतीर्थांनी प्राच्यविद्या परिषद, बडोदा येथे झालेल्या एका अधिवेशनात वाचला होता.

भारतीय इतिहास लेखनाच्या दोन पद्धती आहेत – १) मीमांसा पद्धत, २) इतिहास पद्धत. भारतीय प्राचीन इतिहास लेखनात मेधातिथी, विश्वरूप, विज्ञानेश्वर इ.चे लेखन मीमांसा पद्धतीचे आहे, तर आधुनिक इतिहासकार डॉ. पां. वा. काणे, डॉ. के. ल. दप्तरी इतिहास पद्धत वापरतात. तर्कतीर्थांचे या प्रबंधात असे म्हणणे आहे की, भारतीय धार्मिक इतिहास लेखनात एकमताचा अभाव आहे. त्यामुळे वाचकाची स्थिती दोलायमान होते. या मतभिन्नतेची सोदाहरण चर्चा या प्रबंधाचे वैशिष्ट्य होय. प्रस्तुत प्रबंधात उपरोक्त विसंगती टाळण्याचा व निर्दोष इतिहास लेखन पद्धती रूढ करण्याचा प्रयत्न आहे. कर्मयोग सांगणारी ‘उपनिषदे’ आणि कर्मसंन्यासाचे समर्थन करणारी ‘बृहदकारण्यश्रुति’ यांचा मेळ कसा बसवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. ‘छांदोग्य उपनिषद’ सृष्टी निर्मितीची तीन तत्त्वे- तेज, आप, अन्न विशद करते, तर ‘तैत्तरीय उपनिषद’मध्ये हीच पाच तत्त्वे करून वर्णिली आहेत- पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. यात समन्वय कसा घडवून आणायचा अशी समस्या आहे. मीमांसक समन्वयवादी दिसून येतात, तर इतिहासकार उलट भूमिका घेतात.

सर्व भारतीय धर्मेतिहास समन्वयवादी आहे; पण तो ऐतिहासिक लेखन पद्धतीच्या कसोटीवर वस्तुनिष्ठ ठरत नाही. याबाबतच्या अनेक जिज्ञासा तर्कतीर्थांनी या प्रबंधात उपस्थित केल्या आहेत. शिवाय विसंगती टाळून एकवाक्यता आणण्याचे उपायही सुचविले आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर एकाच विचारांतर्गत अनेक पंथ, संप्रदाय असतात. त्यातील एकत्वाचा शोध वैविध्य कमी करणारा ठरेल. सौर, शाक्त, पाशुपत, पांचरात्र, वैष्णव, शैवागम हे सर्व संप्रदाय परस्परांचे पक्के विरोधक असून ग्रंथकार त्यांना एक मानतात. या प्रबंधाचा उपसंहार करीत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, ‘‘सगळ्या जगाला व्याकूळ करून टाकणारी मतभिन्नता ही वस्तुस्थितीसंगत (योग्य) नव्हे. मूळ तत्त्व लक्षात घेऊन वरवर दिसणारे, बाह्य उपाधींमुळे आलेले वैचित्र्य, भिन्नता लक्षात घेऊनच धर्मनिष्ठांनी प्राचीनांचा सनातन समन्वय अनुसरणे गरजेचे आहे.’’

याच विषयाच्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणेच्या ४३व्या वर्धापनदिनी भाषण केले होते (१९५३). ‘भारताचा इतिहास आणि इतिहास तत्त्व’ हाच त्या भाषणाचा विषय होता. त्यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते की, भारताच्या इतिहास लेखनात पश्चिमी मानसिकता दिसते. युरोपीय इतिहास प्राचीन, मध्य आणि आधुनिक अशा तीन युगांवर आधारित आहेत. हे युग आणि काल विभाजन भारताचा इतिहास काळ लक्षात घेता लागू होत नाहीत. तर्कतीर्थ धारणेनुसार दोन्ही प्रवाहांचे कालखंड, घटना, प्रसंग, परिस्थिती भिन्न आहेत. चुकीच्या आधारावर भारताचा इतिहास लिहिला गेल्याने मूळ इतिहास घटना व विकासक्रम उपेक्षिला गेला आहे. ही विसंगती दूर करायची तर भारताचा घडलेला इतिहास लक्षात घेऊन गमके, युग इ.ची निश्चिती आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. भारतीय इतिहास विचार अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, संस्कृती इ. तत्त्वे नि अंगे लक्षात घेऊन लिहिला गेला पाहिजे.’ भारतीय इतिहासाची युगांतरसूचक लक्षणे निर्धारित करून लेखन झाले पाहिजे. आपल्याकडे इतिहास घटनांची कालक्रमिक जंत्री आहे; पण तत्त्वचिंतनात्मक प्रक्रियेतून प्रगल्भ इतिहास लिहिला गेला नाही.

भारताचा धार्मिक इतिहास लिहिणे असिधाराव्रत आहे. त्याला काळ, विचारधारा, संप्रदाय, संस्कृती अशी विविध परिमाणे आहेत. साहित्य, वंश, जाती, परंपरा, आराधना पद्धती, देवस्वरूप भिन्नता, कर्मकांड वैचित्र्य यांचा विचार करून इतिहास लिहायचा झाला, तर त्याची तत्त्वे, गमके, कसोट्या परिमाणे इ. भारतीय असणे आवश्यक आहे; पण असा प्रयत्न म्हणजे कवेत न येणाऱ्या आकाशाला गवसणी घालण्यासारखे असून, ते साहसी व संयमी कार्य होय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com