Verus philosophus est amator Dei – अर्थात खरा तत्त्वज्ञ हा ईश्वरप्रेमी असतो… ऑगस्टिनच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार ईश्वरप्रेम मानवी जीवनाचं एकमेव नियामक तत्त्व आणि प्रयोजन असलं पाहिजे. ईश्वरप्रेमापासून विचलित करणारी भावना आणि कृती पदभ्रष्ट करणारी ठरू लागली. ईश्वराप्रेमाविषयीचं तत्त्वज्ञान धर्मग्रंथांतच असल्यानं धर्मगुरूच खरे तत्त्वज्ञ, मार्गदर्शक आणि चर्चच्या भाषेत मेंढपाळ (पॅस्टर) ठरू लागले. मिशेल फुको नमूद करतो की, मध्ययुगात या पॅस्टोरल तर्काचा अवलंब करून समाजमनाच्या एकजिनसीकरणाचा प्रयोग झाला. एकूणच मध्ययुगाच्या परात्मवादी वातावरणामुळे आलँ द लिबेरा म्हणतो की, मध्ययुगीन कॅथोलिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना आधुनिक वाचकाला एखाद्या उजाड, उद्ध्वस्त प्रांतातून प्रवास करण्यासारखा अनुभव येतो. एकदा का आधुनिक जीवनाभिमुख तत्त्वज्ञानाचा आस्वाद घेतला की मग मध्ययुगीन तत्त्वज्ञानाशी मैत्री अशक्यप्राय होते. फ्रेंच विचारवंत फ्रॉन्स्वा ब्यूरो दलॉन्द मध्ययुगाचं वर्णन ‘अंधकार, उदासीनता, नीरसता (ennui)’ या तीन शब्दांत करतो. बर्ट्रांड रसेल मध्ययुगाला तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं नापीक ठरवतो. मात्र १९व्या शतकात विशेषत: जर्मनी आणि फ्रान्समध्ये मध्ययुगाविषयी नव्यानं मांडणी करण्यात आली. आधुनिक अन्वेषण पद्धतीच्या मदतीनं मध्ययुगीन लोकसाहित्यावरची धार्मिक पुटं बाजूला करून जिवंत, बंडखोर समाजवास्तव अधोरेखित करण्यात आलं. त्यातून, ‘मध्ययुगीन धार्मिक चौकट म्हणजेच तत्कालीन समाजवास्तव’ या समीकरणाच्या उणिवा स्पष्ट झाल्या. पॉल व्हिन्योच्या मते- ऑगस्टिनची चौकट आणि तत्कालीन ‘विद्रोही विविधता’ ( diversité rebelle) यात निरंतर द्वंद्व चालत होतं.
‘धर्मरक्षक’ ते ‘जेंटलमॅन’
विशेषकरून, १२व्या शतकापासून पाश्चात्त्य जगात मूलभूत स्थित्यंतरं घडतात. धर्मयुद्धांच्या मोहिमांनंतर उच्चभ्रू सामंतवादी वर्गाचा भ्रमनिरास होतो. पोपची घोषित उद्दिष्टं आणि त्यामागचं शुद्ध राजकारण यांत तफावत आढळून येते. शिवाय, धर्मयुद्धांदरम्यान केलेला हजारो मैलांचा प्रवास त्यांना बरंच शिकवून जातो. बायझंटाइन साम्राज्य पाश्चात्त्य जगापेक्षा तेव्हा समृद्ध असल्यानं कथित उच्चकुलीन उमराव वर्गाला स्वत:च्या मागासलेपणाची जाणीव होऊन, या उमराव वर्गाच्या जीवनदृष्टीत मूलभूत बदल होतो. ११ व्या शतकातल्या ‘रोलॅन्डच्या शौर्यगीता’त ईश्वरप्रेमापोटी मृत्यू कवटाळणाऱ्या धर्मरक्षकांच्या जागी १२व्या शतकात, ऐहिक जगण्यावर शतदा प्रेम करणारा सर्वगुणसंपन्न, सभ्य, शालीन असा उमराव वर्ग उदयास येतो. स्त्रीदाक्षिण्य (chivalry) अंगी असलेल्या या मध्ययुगीन उच्चभ्रू वर्गातूनच युरोपीय समाजातली जेंटलमॅन ही संकल्पना आकार घेते. याच काळात ग्रामीण आणि नागरी समाजांत गुणात्मक भेद निर्माण होतो. कोर्टली लिटरेचर (littérarure courtoise) म्हणजे उच्चकुलीन नागरी लोकांच्या सूक्ष्म भावनांना व्यक्त करणारं अभिजात साहित्य १२व्या शतकात उदयाला येतं. रोलॅन्डच्या शौर्यगीतातला धर्मरक्षक हा ईश्वरप्रेमापोटी सर्वस्व त्यागणारा होता. मात्र १२व्या शतकातला नागरी नायक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आदेशांना न जुमानता हृदयाच्या आदेशांना अंतिम आदेश मानतो! उमराव वर्गात १२ शतकातच प्रसिद्धीस आलेली ‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ याच सामाजिक स्थित्यंतराचं द्याोतक आहे.
‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ ही मुळात सेल्टिक परंपरेशी जुळलेल्या मध्ययुगीन (कर्टिअस) साहित्याचा उत्तम नमुना आहे. या कथेत ईश्वरप्रेमाची जागा मानवी प्रेम घेतं. खरंतर प्रेयसी घेते! परलोकाभिमुख माणूस इहवादाकडे झुकताना दिसतो. आजच्या लेखात या कथेच्या मदतीनं १२व्या शतकातल्या मनुष्यप्रेमाच्या आशयद्रव्यात झालेल्या स्थित्यंतराचा परामर्श घेऊ; त्यासाठी ‘ट्रिस्टन आणि इझल्ट’ कथेच्या आशयसूत्राची संक्षिप्त चर्चा आवश्यक आहे.
कॉर्नवेल या सेल्टिक राज्याचा राजा मार्क याच्या राज्यावर आक्रमण होतं तेव्हा त्याचा निष्ठावंत सरदार रिव्हालेन मदतीला धावून येतो. स्वत:चा प्राण धोक्यात घालून रिव्हालेन आक्रमण परतावून लावतो. त्या बदल्यात मार्क रिव्हालेनला त्याच्या बहिणाचा हात देतो. ही बहीण- रिव्हालेनची पत्नी- गरोदर असताना पुन्हा आक्रमण होतं, रिव्हालेन मारला जातो. त्या शोकाकुल अवस्थेतच ट्रिस्टनचा जन्म होतो. ट्रिस्टनला शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रिव्हालेनचा निष्ठावंत सेवक त्याला स्वत:चा मुलगा म्हणून ओळख देतो. मार्कलाही वाटतं की ट्रिस्टन मारला गेला. त्यामुळे राजपुत्र म्हणून जन्माला आलेला ट्रिस्टन सूतपुत्र म्हणून लहानाचा मोठा होतो.
ट्रिस्टनचं एके दिवशी अपहरण होतं. मात्र विस्मयकारकरीत्या तो स्वत:ची सुटका करून मार्कच्या राज्यात निर्वासित म्हणून दाखल होतो. युद्धकला, शिकार, संभाषणकौशल्य, नीतीशास्त्र आणि इतर कलांत निपुण असल्यानं त्याला मार्कच्या दरबारात प्रवेश मिळतो. हा सूतपुत्र वास्तवात आपल्या बहिणीचा मुलगाच, हे मार्कला माहीत नसूनही विलक्षण प्रतिभेच्या जोरावर ट्रिस्टन मार्कचं मन जिंकतो. एके दिवशी ट्रिस्टन त्याच्या मधुर, हृदयस्पर्शी आवाजात गात असताना मार्कचे अश्रू अनावर होतात. त्याला कुठेतरी वाटून जातं की या असामान्य तरुणाशी काहीतरी नातं असावं. शेवटी मार्कला रक्ताचं नातं कळतं! ही बातमी दरबारात पसरल्यावर मात्र ट्रिस्टनला शत्रू निर्माण होतात. मार्कला मूलबाळ नसल्यानं सेल्टिकच्या मातृसत्ताक प्रथेप्रमाणे ट्रिस्टनच मार्कचा वारसदार ठरणार असतो. त्यादरम्यान मार्कच्या राज्यावर संकट कोसळतं. दरवर्षी खंडणी घेणारा आयर्लंडचा राजा त्याच्या मोहरोल्ट नावाच्या बलाढ्य योद्धाला पाठवून खंडणीचं स्वरूप बदलतो. एकतर मोहरोल्टला पराभूत करून दाखवा नाहीतर शेकडो तरुण तरुणींना गुलाम म्हणून पाठवा. हे आव्हान स्वीकारून ट्रिस्टन मोहरोल्टचा वध करतो. मात्र ट्रिस्टनलाही प्राणघातक जखमा होतात. निश्चेष्ट ट्रिस्टनला एका बोटीत सोडून दिलं जातं. त्याची बोट आयर्लंडच्या म्हणजे शत्रुराज्याच्याच किनाऱ्याला लागते. तिथं उपचार घेताना त्याच्या नजरेस सोनेरी केसांची एक अतिशय सुंदर मुलगी पडते. तिच्याविषयी त्याच्या हृदयात अनामिक भावना निर्माण होतात. पण उपचार घेऊन कर्तव्यदक्ष ट्रिस्टन तातडीनं कॉर्नवेलला परततो. मृत्यूच्या दाढेतून ट्रिस्टन सुखरूप कसा परतला याविषयी दरबारात कुजबुज सुरू होते. ट्रिस्टनकडे राजसत्ता नको, म्हणून त्याचे हितशत्रू मार्कच्या दुसऱ्या लग्नासाठी आग्रह धरतात. राज्याची सूत्रं ट्रिस्टनलाच द्यावीत ही मार्कची मनापासून इच्छा असते. मात्र ट्रिस्टन मार्कला कळवतो की त्याला वारसदार होण्यात रस नाही. तोही मार्कच्या लग्नाचा आग्रह धरतो. मार्क होकार देतो. मात्र एक त्याची शर्त असते. एकदा मार्कच्या खिडकीत एक पक्षी सोनेरी केस सोडून गेला होता. मार्क म्हणतो की तो त्या सोनेरी केसांच्या स्त्रीशीच लग्न करेल. दरबारात ट्रिस्टनशिवाय त्या स्त्रीविषयी कुणालाही माहिती नसतं. ट्रिस्टन मार्कला वचन देतो की तो त्या सोनेरी केसांच्या स्त्रीला शोधून काढेल. ट्रिस्टन सोनेरी केसांच्या सुंदरीच्या शोधात आयर्लंडकडे रवाना होतो. ती सुंदरी म्हणजे इझल्ट! आणि इझल्ट ही आयर्लंडची राजकन्या- मोहरोल्टची भाची- असते.
त्यादरम्यान इझल्टचं स्वयंवर असतं- त्यातला ‘पण’ असतो, ड्रॅगनचा नायनाट करण्याचा. ट्रिस्टन इझल्टला स्वयंवरात जिंकतो. इझल्ट ट्रिस्टनकडे पहिल्यांदा पाहते तेव्हा तिला पहिल्या नजरेतच प्रेम होतं. मात्र ट्रिस्टन कळवतो की त्यानं इझल्टला स्वत:साठी नव्हे तर त्याचा राजा मार्कसाठी जिंकलं आहे.
इझल्ट या भावनिक धक्क्यानं प्रचंड अपमानित होते. नंतर तिच्या लक्षात येतं की ट्रिस्टन मोहरोल्टचा (तिच्या मामाचा) मारेकरी आहे. त्यामुळे तिच्या मनात ट्रिस्टनविषयी एकाचवेळी अतोनात प्रेम, अपमानाची भावना आणि द्वेष निर्माण होतो. पण या परस्परविरोधी भावनांत प्रेमाची भावना प्रबळ ठरते.
आयर्लंडहून कॉर्नवेलला परतताना त्या दोघांत एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. पण हे प्रेम धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या निषिद्ध असतं. कारण ट्रिस्टनने दिलेल्या वचनानुसार इझल्ट मार्कची पत्नी असते अर्थात त्याची मामी असते. विवाहित आणि नातेसंबंधांतील स्त्रीविषयी प्रेम असणं हे पाप समजलं जातं. थोडक्यात, एका बाजूला धर्म, समाज, कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला निषिद्ध, अशक्यप्राय तीव्र प्रेमाची भावना यांत ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेम कहाणी आकार घेते. आणि ही कथा तत्कालीन बंडखोर समाजवास्तव आणि ऑगस्टिनची चौकट यांमधलं द्वंद्व प्रतिबिंबित करते.
‘कोड ऑफ शिव्हल्री’
ट्रिस्टन आणि इझल्टच्या प्रेम कथेच्या विविध संस्करणांचा अभ्यास जोझेफ बेदिए यांनी १९व्या शतकात केला आणि मध्ययुगीन वास्तव प्रकाशझोतात आणलं. सेल्टिक परंपरेतील ख्रिास्तेतर अवशेष जपणाऱ्या या प्रेमकथेत चर्चच्या चौकटीला छेद देणाऱ्या अनेक बाबी आहेत. उदा. परलोकवादी ईश्वरप्रेमाचं अवडंबर कमी होऊन स्त्रीपुरुष प्रेमाला प्राधान्य देण्यात आलं आहे. सेल्टिक परंपरेतली मातृसत्ताक व्यवस्था आणि ख्रिास्ती पितृसत्ताक व्यवस्था यांतल्या द्वंद्वातून निर्माण झालेला ‘कोड ऑफ शिव्हल्री’ हा या प्रेमकथेच्या मुळाशी आहे. हा कोड- संकेत- म्हणजे मध्ययुगीन उमराव वर्गातील स्त्री-पुरुष संबंधांचं व्याकरण.
सामाजिकदृष्ट्या मध्ययुगात स्त्री देवाणघेवाणीची वस्तूच असते (ट्रिस्टन इझल्टला एखाद्या वस्तूसारखं जिंकतो आणि मार्कला देतो) पण भावविश्वात स्त्रीला मध्यवर्ती स्थान प्राप्त होतं. पुरुष आधीसारखा रानटी, युद्धखोर, धर्मांध, अज्ञानी राहात नसून स्वत:च्या बौद्धिक, सौंदर्यात्मक, नैतिक क्षमतांचा वापर करून सूक्ष्म मानवी भावनांच्या छटा नेमकेपणानं व्यक्त करणारा प्रियकर बनतो.
खरंतर, प्रेमविवाह ही अगदी अलीकडील संकल्पना आहे. मध्ययुगात सामाजिक कर्तव्य, गरज आणि उपयुक्तता म्हणून विवाह होत असत. विवाहानंतर एकमेकांविषयी फुटणारा पाझर त्याअर्थी प्रेम ठरत नसे. तत्कालीन कॅथोलिक चर्चच्या दृष्टीनं तर विवाहात ‘सुख’ शोधणं पाप मानलं जाई.
शिव्हल्रिक प्रेम आणि विवाह या दोन गोष्टींचा तसा संबंध नाही. विवाह ही समाजोपयोगी संस्था आहे. प्रेम ही अव्यवहारी, ‘useless’, ‘hopeless’ गोष्ट! धार्मिक, सामाजिक, नैतिक चौकटीअंतर्गत जगताना प्रेम नावाची घटना घडते तेव्हा हे शक्य नाही/ उचित नाही/ सुरक्षित नाही, हा अपराध आहे. अशा वाक्यांपाशी येऊन या घटनेचा निरोप घ्यावा लागतो. मध्ययुगीन शिव्हल्रिक प्रेम हे समाजबाह्य, अशक्य, वर्ज्य, एकतर्फी, प्राणघातक मानलं जाई. खरंतर, सामाजिक आणि धार्मिक चौकटीला नावापुरतं मानणारे आणि वास्तवात मात्र निषिद्ध, वर्जित, अशक्यप्राय प्रेमाच्या चोरवाटा चोखळणारे ट्रिस्टन आणि इझल्टही भरपूर सापडतात.
शरद बाविस्कर (फ्रेंच साहित्य – तत्वज्ञानाचे अभ्यासक)