चार-साडेचार वर्षांपूर्वीची गोष्ट… एका शहरात दिवाळी पहाटेला ‘इर्शाद’ या नावाचा काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आता हे दिवस कसे परस्परांना ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची’ वगैरे सारखे ‘एसएमएस’ धाडण्याचे. त्यात हा ‘इर्शाद’ शब्द कुठून आला आणि अशा प्रात:काळी चंदनगंधित वातावरणात तो उच्चारायचा तरी कसा? दिवाळी पहाटेच्या मैफिलीत ‘रेशमी कुर्ता’, ‘अत्तर’ हे चालतंच पण ‘इर्शाद’ शब्द काही पचनी पडेना. आपल्या भाषेत काय कमी शब्द आहेत असे म्हणत संस्कृतीरक्षक भाषाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणाम असा झाला की तो कार्यक्रमच रद्द करावा लागला.

कधी कधी असं चित्र दिसू लागतं. वाक्यातले सगळे शब्द एका रांगेत बसलेले आहेत. त्यात एखादा ऐटदार, पटकन लक्ष वेधून घेणारा असतो पण तो आपला नाही म्हणत त्याला तिथून हाकला अशी मागणी काही लोक करत आहेत. त्याच्यावर नजरा रोखल्या आहेत आणि हा बिचारा त्या नजरांचा सामना करीत अंग चोरून बसल्यासारखा अवघडून गेलाय. खरंतर त्या वाक्यालाच त्याच्यामुळे रंगत आलीय. शब्दसमूहात तो उठून दिसतोय पण भाषाप्रेमाचे दांडके हातात घेतलेल्यांना तो तिथे नको आहे. काय करणार… साऱ्या शब्दांच्या पंगतीत तो बिचारा पडला अल्पसंख्य.

मराठवाड्यावर दीर्घकाळ निजामाची राजवट होती. इथल्या बोलीत अनेक उर्दू शब्द ‘बेमालूम’ मिसळले आहेत. ते वेगळे काढताच येत नाहीत. मराठवाड्यात जमिनीचे खरेदीखत नसते ‘बयनामा’ असतो. एखाद्याला हिणवण्यासाठी त्याची ‘हैसियत’ काढली जाते. संपत्तीसाठी सर्रास ‘राशीद’ असा शब्द वापरला जातो. सगळ्यांनी माझी ‘राशीद’ खाल्ली आणि आता सांभाळायला कोणीच नाही असे एखादा वृद्ध आपल्या वारसांबद्दल म्हणतो. एखाद्याच्या कृपेने कोणाचा आर्थिक उद्धार झाला तर तो ‘निहाल’ झाला असे म्हटले जाते. भांडण मिटले तर तो ‘सुलानामा’ झालेला असतो. एखाद्या प्रकरणाच्या मिटवामिटवीसाठी ‘तसब्या’ हा शब्द सर्रास वापरला जातो. इथे झालेला खून हा निर्घृण नसतो तो ‘बेरहम’ असतो. असे कित्येक शब्द मराठवाड्यात आजही वापरात आहेत. एकेकाळी असे खास उर्दू शब्द मिश्रित मराठी बोलणारी अनेक माणसे आढळायची. आता कालांतराने त्यातले काही शब्द कमी होत आहेत. तरीही मराठवाड्याच्या जीवन व्यवहारात असे असंख्य शब्द आजही आढळतात.

भाषा वाहती असते. तिच्यात कुठले कुठले शब्द येऊन मिसळतात आणि प्रवाहात ते एकजीव होतात. वाहत्या प्रवाहातले घटक वेगळे काढता येत नाहीत. प्रवाहाला मिळणारे ओहळ आणि दोन्ही बाजूचे किनारे यातून सर्व काही पोटात घेऊन प्रवाह पुढे जात राहतो. कुठल्या स्थानावरून प्रवाहात काय मिसळले आहे याचाही अंदाज बांधता येत नाही. कबीरांनीच म्हटलं आहे, ‘भाषा बहता नीर’… भाषेला गाठोड्यासारखे बांधून ठेवता येत नाही. तिच्यातले शब्द कुलूपबंद करता येत नाहीत. भाषेत कोणतेही शब्द शिरू नयेत म्हणून नाकाबंदी करता येत नाही. कुठून कुठून शब्द येतच राहतात आणि भाषा समृद्ध होत जाते. भाषेला जात नसते, धर्म नसतो. ती एखाद्या प्रदेशाची, मुलखाची किंवा समाजाची असते. उर्दू ही तर या मातीतली भाषा आहे.

जुन्या पिढीत मराठवाड्यात अनेक लोक उर्दूचे जाणकार होते. त्यातल्या काहींनी उर्दू, मराठीत मोठं काम करून ठेवलं आहे. द. पं. जोशी यांनी दीर्घकाळ हैदराबादच्या (आताच्या तेलंगणा) मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणून काम केलं. अनेक उर्दू पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. कुर्रतुलऐन हैदर यांच्या कथासंग्रहाचा ‘पानगळीची सळसळ’ या नावाने त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे. मिर्झा गालिबच्या पद्याचे अनुवाद सगळीकडे झाले पण गालिबच्या आणि अली सरदार जाफरी यांच्या निवडक मूळ उर्दू पत्रांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.

हिंदीतले प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांनी सुरुवातीला बरंच लेखन उर्दूत केलं. नवाब राय या नावाने ते उर्दूत लिहायचे. त्यांनी अनेक कथा उर्दूत लिहिल्या. त्यांची सेवासदन ही कादंबरी मूळ रूपात उर्दूत पहिल्यांदा ‘बाजार ए हुस्न’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. पंजाबचे लेखक राजेंद्रसिंह बेदी यांचे उर्दू कथासाहित्यात मोठे नाव आहे. ‘एक चादर मैली सी’ या कादंबरीमुळे ते परिचित आहेत.

फिराक गोरखपुरी हे प्रसिद्ध उर्दू शायर. मीर तकी मीर आणि गालिबनंतरचं एक मोठं नाव.

एक मुद्दत से तेरी याद हमें आई नही

और हम भूल गये, ऐसा भी नही

इसी खंडभर मे कही कुछ दिये टूटे हुए

इन्ही से काम चलाओ बडी उदास है रात

अशी त्यांची प्रसिद्ध शायरी. या ‘फिराक’ यांचं नाव रघुपती सहाय. उर्दू भाषेत ज्ञानपीठ पुरस्काराचे ते पहिले मानकरी.

उर्दूचे प्रख्यात समीक्षक गोपीचंद नारंग यांचा जन्म बलुचिस्तानातला. महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केल्यानंतर आयुष्यातला बहुतेक काळ त्यांनी दिल्लीतच विद्यापीठ अध्यापनात घालवला. ते साहित्य अकादमीचे अध्यक्षही होते. उर्दू साहित्याचा चालता-बोलता संदर्भकोश अशीच त्यांची ख्याती होती. हिंदुस्थानी किस्सों से मखूज उर्दू मसनविया, उर्दू भाषा और साहित्य, उर्दू की नई बस्ती, उर्दू गझल और हिंदुस्तानी जेहन- ओ- तहजीब असे उर्दू साहित्याची समीक्षा करणारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. गालिब, अमीर खुसरो यांच्यावर त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने जगभर होत असत. जगातल्या सर्व महत्त्वाच्या विद्यापीठात त्यांनी उर्दूवर भाषणे दिली. नारंग यांचे वैशिष्ट्य हे की उर्दूचा समाजशास्त्रीय अभ्यास त्यांनी केला. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही त्यांनी या भाषेचा विविध अंगाने वेध घेतला. भारतीय मानस, पुराणकथा यांचे उर्दू साहित्यात जे प्रतिबिंब उमटले त्याचीही त्यांनी समीक्षा केली. अनेक उर्दू लेखकांचा अभ्यास करताना ज्या सांस्कृतिक अवकाशातून ही साहित्यनिर्मिती झाली त्या पार्श्वभूमीचा धांडोळा त्यांनी घेतला.

अन्य कुठल्याही भाषेला एवढे अस्तित्वासाठी झगडावे लागत नाही. भारतात मराठी, कन्नड किंवा गुजराती अशा कुठल्याही भाषेला ती हिंदूंची आहे की मुस्लिमांची असा प्रश्न विचारला जात नाही. पण उर्दूबाबत मात्र हे होते. तिच्याशी धर्म जोडला जातो असे निरीक्षण नारंग यांनीच नोंदवून ठेवले आहे. उर्दूची ७० टक्के शब्दसंख्या इथली आहे आणि तिच्यात ३० टक्के अरबी- फारसी शब्द आहेत. उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषांचं अभिन्न नातं आहे, हे नारंग यांनी वारंवार सांगितलं. प्रेमचंद असोत अथवा फिराक गोरखपुरी (रघुपती सहाय), किंवा गोपीचंद नारंग…भाषेला धर्म नसतो आणि ती एखाद्या धर्माला चिकटवता येत नाही हे सांगणारी अशी अनेक उदाहरणे देशभर आहेत. इतकंच काय पाकिस्तानातल्या एखाद्या उर्दू लेखकाच्या लेखनातही कसे भारतीय लोकमानसातले संदर्भ येतात ते ‘ये कैसी सरहदे’ या इंतजार हुसेन यांच्यावरील लेखात इथेच मांडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषा ही जीवन व्यवहारातून आकाराला येते. भाषेला वाहतं ठेवण्यात सर्वसामान्यांचा मोठा वाटा असतो. तेच भाषा घडवत असतात. पण भाषा अनेकदा राजकारणासाठी शस्त्र म्हणूनसुद्धा हाती घेतली जाते. भाषा राजकारणासाठी भांडवल म्हणून वापरली जाते आणि भाषेचंही राजकारण केलं जातं. बोलीभाषासुद्धा काही अंतरावर बदलल्या जातात पण महामार्गावर जसे कोणते शहर किती किलोमीटर अंतरावर आहे ते सांगणारे दगड असतात तसे भाषेच्या बाबतीत नसते. भाषेचा असा कुठला बिंदू नसतो. कारण भाषा अशी कुठल्याही ठिकाणापासून वेगळी काढता येत नाही आणि तिचा अवकाशही मोजता येत नाही. एकवेळ जमिनीची विभागणी केली जाऊ शकते पण भाषेची विभागणी होत नाही. भलेही ती लिपीमध्ये बद्ध असते पण अगणित जिभांवर असलेलं तिचं अस्तित्व असं सहजासहजी पुसता येत नाही.