देवेंद्र गावंडे

आदिवासींसाठी वाघ परका नाही, पण नागर समाजासाठी मात्र आदिवासी माणसेही परकी आणि वाघही परकेच. निसर्ग आणि वन्यजीवांशी असलेले आदिवासींचे नाते समजूनच न घेता ‘मानवरहित’ प्रकल्प राबवणारे लोक निसर्गप्रेमी कसे?

अठराव्या शतकाच्या शेवटी स्टॅनली डब्ल्यू. कॉकसन हे इंग्रज अधिकारी मध्य भारतातील सर्वात मोठय़ा चांदा (आता चंद्रपूर) जिल्ह्यचे डेप्युटी कमिशनर होते. एके दिवशी ते झिंगरू नावाच्या आदिवासी नोकरासोबत गडचिरोलीजवळील कोरची भागात जमीनदारांच्या इस्टेटीसंदर्भातील वाद ऐकण्यासाठी जात असताना जंगलात त्यांना एक आदिवासी भेटला. त्याच्या दोन्ही हातांत वाघाचे दोन बछडे होते. आईपासून दुरावलेली ती पिल्ले तो घरी घेऊन जात होता. सांभाळ करण्यासाठी. झिंगरूने ती दोन्ही पिल्ले विकत घेण्याचा आग्रह स्टॅनलींकडे धरला. वाघ घरी पोसायचे ही कल्पनाच त्यांना रोमांचक वाटली. अखेर सौदा ठरला. प्रत्येकी २५ रुपयांत ही पिल्ले स्टेनलीच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाली. त्यांना दूध पाजता यावे म्हणून खास मुंबईहून बाटली ंमागवण्यात आली. नंतरचे तीन महिने ती पिल्ले बंगल्यात पाळलेल्या माकडांबरोबर मस्त खेळायची. हे दृश्य बघायला लोक रोज स्टॅनलींच्या निवासस्थानी जमायचे. एक दिवस त्यातल्या एकाने खेळता खेळता थेट स्टॅनलीच्या पोटरीचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या या अधिकाऱ्याने ही पिल्ले मुंबईतील एका सर्कशीला विकली. तिथून ती नंतर लंडनच्या प्राणिसंग्रहालयात पोहोचली. निवृत्तीनंतर इंग्लंडला परतलेल्या स्टॅनलींनी ‘अ‍ॅन्ड दॅट रिमाईंड्स मी’ या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिला आहे.  नोकरीच्या निमित्ताने मध्य भारतात दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या स्टॅनलींनी आदिवासी व वाघ यांच्यातील सहजीवनावर अगदी मोकळेपणाने लिहिले आहे. त्याचा उल्लेख सुदीप ठाकूर यांच्या लालशाम शाह यांच्यावरील  पुस्तकात आहे.

इंग्रज गेले, देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आदिवासी व वाघांच्या सहजीवनात खंड पडला नाही. रायपूरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात आदिवासींनी जवाहरलाल नेहरूंना वाघाचे पिल्लू भेट दिल्याचा इतिहास आहे. याच रायपूरजवळच्या नारायणपूरमध्ये राहणाऱ्या चंद्रूची कथा तर जगप्रसिद्ध. भारताचा पहिला ‘मोगली’ असे बिरुद मिरवणाऱ्या या चंद्रूने घरीच वाघ पाळला. त्याच्या या अनोख्या दोस्तीची कथा जगभरात चर्चिली गेली; ती स्वीडनचे चित्रपट निर्माते अर्ने सक्सफोर्ड यांनी त्यावर तयार केलेल्या ‘द फ्ल्यूट अ‍ॅन्ड द अ‍ॅरो’ या चित्रपटामुळे. भारतात हा चित्रपट ‘इन द जंगल सागा’ या नावाने प्रदर्शित झाला.

ही १९५७ ची गोष्ट. जगभर गाजलेल्या या सिनेमामुळे सक्सफोर्ड यांना पैसा व प्रसिद्धी मिळाली. पण त्यात काम करण्यासाठी स्वीडनला गेलेल्या चंद्रूला मानधन मिळाले केवळ दोन रुपये प्रतिदिवस. भारतात परतल्यावर चंद्रू नेहरूंना भेटला. त्यांनी त्याला शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पण घर कसे चालवायचे, या विवंचनेत असलेल्या चंद्रूने थेट गाव गाठले. अखेर २०१३ ला तो विपन्नावस्थेतच जग सोडून गेला. त्यानंतर सरकारला जाग आली व त्याचे स्मारक रायपूरला उभारले गेले.

हा इतिहास आठवण्याचे कारण आताच्या परिस्थितीत दडलेले. स्वातंत्र्यानंतर व्याघ्र संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या सरकारांनी वाघांच्या सुरक्षेला धोका कुणापासून तर आदिवासींपासून अशी भूमिका घेत या जमातीला खलनायक ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. असा प्रयत्न करणारे सारे वन्यजीवप्रेमी नागर समाजातले होते व आहेत. त्यांनी इतिहासाकडे दुर्लक्ष केलेच; शिवाय त्यात नमूद असलेल्या सहजीवनाच्या वृत्तांतांची पानेही गहाळ करून टाकली. यावर आदिवासींचे म्हणणे काय हेसुद्धा कुणी विचारात घेतले नाही.

मानवरहित व्याघ्रप्रकल्प

या जमातीला ‘आवाज’ नसण्याचा फायदा अगदी क्रूरपणे उठवण्यात आला व ‘मानवरहित व्याघ्रप्रकल्प’ या संकल्पनेचे घोडे पुढे दामटण्यात आले. ही संकल्पना सुद्धा पाश्चात्त्य. जगभरातले आदिवासी ‘हंटर’ व ‘गॅदर्स’ असतात या प्रतिमेतून समोर आलेली. जगातला पहिला नॅशनल पार्क अशी अमेरिकेतील ‘येलोस्टोन’ची ओळख. तो निर्माण करताना आदिवासींना हुसकावण्यात, ठार मारण्यात आले. नंतर युरोपमध्ये हे लोण पसरले. भारतातही त्याचाच कित्ता गिरवला गेला. वाघांच्या नावावर आदिवासींचे विस्थापन हे त्याचेच फळ. हे धोरण राबवताना आदिवासी खरोखर वाघांचा शत्रू आहे की नाही याचा विचारच झाला नाही.

इतिहास चाळला तर तो शत्रू नव्हताच, उलट बाहेरून जे जंगलात आले त्यांनीच मोठय़ा प्रमाणावर वाघ मारले हे दिसून येते. मुगलकाळात ‘चरागा व शिकारगा’ हे दोन उर्दू शब्द देशभर प्रचलित होते. नंतर इंग्रजांच्या राजवटीत ‘गेम रिझव्‍‌र्ह’. या दोन्ही कालखंडात वाघांची सर्वाधिक शिकार केली ती राजांनी व इंग्रज अधिकाऱ्यांनी. प्रत्येक शिकारीच्या वेळी आदिवासी त्यांच्यासोबत होते पण फक्त ओझे वाहायला. शिकारीचे सामान, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे ओझे या आदिवासींच्या खांद्यावर कायम राहिले. बंदूक चालवली ती या उमरावांनी.

सेंट्रल प्रॉव्हिन्स अ‍ॅन्ड बेरार या प्रांताचे मुख्य वनसंरक्षक सी.एम. हालरे यांनी २५ सप्टेंबर १९४० ला केलेल्या नोंदीनुसार आधीच्या तीन वर्षांत मध्यभारतात एकूण ३२० वाघांची शिकार करण्यात आली. हालरेच्या काळात एकूण ४६८ ‘शूटिंग परमिट’ वितरित करण्यात आले. त्यात एकही आदिवासी नव्हता. या शिकारींच्या वेळी आदिवासी हजर होते पण फक्त वाटाडे व भारवाहक म्हणून.

वाघांच्या देवळांत मज्जाव

 स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आली तरी आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण आजही अत्यल्प आहे. मुगल व इंग्रजांच्या राजवटीत तर या जमाती फारच मागास होत्या. शिक्षणाचा गंधही नव्हता. त्यामुळे केवळ काही रुपयांच्या मजुरीसाठी हे उमराव सांगतील तसे करायचे हेच आदिवासींच्या नशिबी आले. आज त्यांनाच अपराधी ठरवून जंगलाबाहेर काढण्याची नीती सर्वमान्य व लोकप्रिय झाली आहे. वाघांविषयी या आदिवासींच्या भावना, परंपरा, श्रद्धा, रूढी काय याचा विचारच केला गेला नाही.

आज जगभरात लोकप्रिय ठरलेल्या ताडोबात तरु नावाचा देव आहे. त्यावरूनच ताडोबा हे नाव पडलेले. हा तरु आदिवासी होता व वाघाने त्याला ठार मारले. त्याची स्मृती कायम राहावी म्हणून आदिवासींनी त्याचे देऊळ उभारले. त्याला मारले म्हणून आपणही वाघांना ठार करू असा अविचार तेव्हा आदिवासींच्या मनाला शिवला नाही. आज त्याच देवळात आदिवासींना जाऊ दिले जात नाही. कारण काय तर ते गाभाक्षेत्र आहे म्हणून.

 केवळ ताडोबाच नाही तर देशातील कोणत्याही व्याघ्रप्रकल्पावर नजर टाका. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे वाघाचे देऊळ दिसतेच. आदिवासी शिकारीसाठी ओळखले जातात. त्यावर त्यांची गुजराण असते हे खरे, पण त्यांनी वाघांची शिकार सातत्याने केली हे साफ खोटे. उलट वाघाला देव म्हणून पुजणाऱ्या अनेक आदिवासी जमाती देशात आहेत. आजही जिथे जिथे व्याघ्रप्रकल्प आहे ती सारी क्षेत्रे आदिवासीबहुल आहेत. वाघांची शिकार करणे हाच त्यांचा छंद असता तर या क्षेत्रात एवढे वाघ टिकलेच नसते. दुर्दैव हे की, या वस्तुस्थितीचा विचार सरकारांनी कधी केला नाही.

‘अनुभवकथन’ नाही; म्हणून अन्याय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील वन्यजीव व जंगलाच्या इतिहासावर नजर टाकली तर ज्या इंग्रजांनी आधी शिकारीचा शौक भागवून घेतला तेच नंतर निसर्गप्रेमी, वन्यजीवरक्षक म्हणून उदयाला आले. या साऱ्यांचा भूतकाळ विसरून त्यांच्या वन्यजीवप्रेमाचा उदोउदो करण्यात नंतरच्या देशी वनसंवर्धकांनी धन्यता मानली. वाघांचा शिकारी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या व नंतर केवळ नरभक्षक वाघालाच ठार करू अशी भूमिका घेऊन जगलेल्या जिम कार्बेटचे नाव व्याघ्रप्रकल्पाला दिले गेले पण सहजीवनाची समृद्ध परंपरा जतन करणाऱ्या आदिवासी समूहांच्या नावाने एखादा व्याघ्रप्रकल्प असावा असेही सरकारला कधी वाटले नाही. आधी शिकारी व नंतर वन्यजीवप्रेमी झालेल्या अनेकांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवले. अशिक्षित असलेल्या आदिवासींना असा सहजीवनाचा इतिहास लिहिता आला नाही. त्यामुळे त्यांची जंगल व वन्यजीव वाचवण्याची कामगिरी समोरच येऊ शकली नाही. त्यातून निर्माण झालेल्या एकसुरी विचारातून आदिवासी हेच वन्यजीव व वाघांचे शत्रू अशी धारणा देशात तयार झाली. त्याचा मोठा फटका या ‘मूक’ जमातीला बसला.