काँग्रेस सोडणारे गौरव वल्लभ हेही आता शहजाद पूनावाला, प्रियंका चतुर्वेदी, गौरव भाटिया, जतीन प्रसाद, शाजिया इल्मी या चेहऱ्यांच्या रांगेत आले..

राजकीय पक्षाचे प्रवक्तेपद मिळणे म्हणजे पक्षाची ध्येयधोरणे मुखोद्गत असल्याची पावती आणि पक्षनिष्ठेला दाद ही समजूत अलीकडे खोटी ठरते की काय अशी शंका वारंवार येऊ लागली आहे. याला कारण पक्षाच्या प्रवक्त्यांचेच होणारे पक्षांतर. ताजा संदर्भ आहे तो गौरव वल्लभ यांचा. आजवर अनेक व्यासपीठांवरून काँग्रेसची बाजू हिरिरीने मांडणारे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक रातोरात भाजपमध्ये प्रवेश करते झाले. ही कृती करताना त्यांनी केलेले वक्तव्यही मोठे मजेशीर. काँग्रेसशी आघाडी केलेल्या डीएमकेच्या एका नेत्याने सनातन धर्माविषयी केलेले वक्तव्य. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून त्याची केली गेलेली पाठराखण, राम मंदिराच्या मुद्द्यावर पक्षाने घेतलेली अलिप्ततावादी भूमिका, हे सारे दोन-तीन महिन्यांपूर्वीचे मुद्दे, पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडून उद्योगपतींना केले जाणारे लक्ष्य या कारणांनी या महाशयांची रात्रीची झोप उडाली होती म्हणे! शेवटी किती काळ रात्री जागून काढायच्या असा विचार करत त्यांनी कमळ हाती घेतले. आता काही जण म्हणतात की त्यांना लोकसभेसाठी जयपूरमधून उमेदवारी हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी बदलाची वाट धरली. काहीच महिन्यांपूर्वी राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी नशीब अजमावून बघितले. मात्र ते सतत करत असलेली आर्थिक आकडेमोड जनतेला काही भावली नाही व त्यांच्या पदरी पराभव आला. पराभव हा डोळे उघडणारा असतो असे म्हणतात. चर्चेसाठी सतत स्टुडिओतील दिव्यांच्या झगमगाटात राहिल्याने त्यांचे दिपलेले डोळे या पराभवानंतरही उघडले नसावेत… त्यामुळेच कदाचित त्यांनी लोकसभेसाठी धारिष्ट्य दाखवले असावे. हे करताना ते एक गोष्ट मात्र विसरले. कन्येला चांगला वर मिळावा अशी जी वधुपित्याची भूमिका असते तीच प्रत्येक पक्षाची उमेदवारांच्या बाबतीत असते. त्या कसोटीवर आपण खरे उतरलेलो नाही हेच वल्लभांना मान्य नसावे. मात्र त्यामुळे ते पक्षांतर करणाऱ्या अनेक सुमार प्रवक्त्यांच्या रांगेत जाऊन बसले.

Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!

ही रांग बरीच मोठी आहे. शहजाद पूनावाला, प्रियंका चतुर्वेदी, गौरव भाटिया, जितीन प्रसाद, शाजिया इल्मी ही त्यातली काही नावे. लोकप्रियतेची साथ लाभलेल्या या साऱ्यांना सुमार म्हणणे कदाचित अनेकांना आवडणारे नसेल, पण बुद्धिमत्तेचा विचार केला तर वल्लभ यांचे स्थान या सर्वांपेक्षा वरचे. अगदी काही वर्षांपूर्वी देशातील आर्थिक अनागोंदीविरुद्ध बिगर-राजकीय व्यासपीठांवरून सडेतोड विचार मांडणारे वल्लभ काँग्रेसच्या नजरेत भरले, मग लगेच त्यांना पक्षात मानाचे स्थान मिळाले. फार कमी काळ राज्यस्तरावर काम करून राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची चमक दाखवणारे ते कदाचित एकमेव असावेत. त्यांच्या पक्षांतराने आणखी एक अधोरेखित झालेला मुद्दा म्हणजे पक्षाने प्रवक्त्यांचा सन्मान किती राखावा? त्यांना लाभाची पदे द्यावीत की देऊ नयेत? त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला हवे की नाही? याची उत्तरे शोधू गेल्यास न्याय व अन्याय झालेली अनेक नावे आठवतील. पुण्याचे विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेसचे नेते उत्तम प्रवक्ते म्हणून ओळखले जात. त्यांना दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर पद मिळाले व काही काळ ते मंत्रीही होते. तरीही त्यांनी कुरकुर केल्याचे स्मरत नाही. उलट त्यांचे सुपुत्र अनंतरावांनी मात्र पद मिळाले नाही म्हणून अनेकदा खदखद व्यक्त केली व त्याच व्यथेतून मुख्य प्रवाहातून बाजूला झाले. भाजपच्या धरमचंद चोरडियांनी अनेक वर्षे अगदी निष्ठेने पक्षाचा किल्ला लढवला, पण पदाची आस बाळगली नाही. ते हयात होते तोवर पक्षाला मोठा जनाधार नव्हता. त्या तुलनेत प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज, संबित पात्रा, सुधांशू त्रिवेदी हे नशीबवान म्हणायचे. डाव्यांमधील सीताराम येचुरी, प्रकाश करात हेही मूळचे प्रवक्तेच. क्रमानुसार संधी या पोथीनिष्ठ नियमांचा बळी ठरत त्यांना बाजूलासुद्धा व्हावे लागले. पण वल्लभ यांची कृ़ती आणखी एका नव्या मुद्द्याला स्पर्श करते.

तो म्हणजे उत्कृष्ट प्रवक्तेपण हे पक्षाचा जनाधार वाढवण्यालाही कारणीभूत ठरते की त्या पक्षाच्या नेतृत्वामुळे तो वाढतो. याचे निर्विवाद उत्तर नेतृत्व हेच असले तरी प्रवक्त्यांना मात्र आपल्यामुळेच पक्ष वाढला असे वाटू शकते. त्यांच्या पक्षांतराचा वाढलेला वेग हेच दर्शवतो. देशात वृत्तवाहिन्या व समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाल्यापासून प्रवक्ते चोवीस तास जनतेसमोर असतात. बुद्धिचातुर्याचा वापर करत वादविवादात सरशी गाठणे, अडचणीच्या प्रश्नांना बगल द्यायची असेल तर उत्तर भरकटवण्याची कला साधणे, समोरचा प्रभावी ठरतो असे लक्षात येताच मध्येमध्ये बोलून त्याच्या एकाग्रतेत खंड पाडणे, म्हणी/ वाक्प्रचारांचा योग्य ठिकाणी वापर करत स्वत:चे उजवेपण सिद्ध करणे, पक्षाच्या चुकलेल्या निर्णयाचीही योग्य शब्दात भलामण करणे, अशा अनेक कारणांनी हे प्रवक्ते लोकांच्या मनात घर करत जातात. पण या हजरजबाबीपणाला भाळून लोक पक्षाच्या बाजूचे होतात का हा यातला कळीचा प्रश्न. प्रत्येक प्रवक्त्याला याचे उत्तर होय असेच वाटत असते. वस्तुस्थिती मात्र तशी नसते. पक्ष सत्तेत असेल तर सरकारची कामगिरी कशी, त्यात नेतृत्वाचा वाटा किती, पक्ष विरोधात असेल तर नेतृत्वाने सरकारविरुद्ध दिलेला लढा प्रभावी किती, हे नेतृत्व सरकारचे वाभाडे काढण्यात यशस्वी ठरले की नाही यावर जनमानस ठरत असते. यात नेत्यांसोबत प्रवक्त्यांचा वाटा असतोच, पण केवळ प्रवक्त्यांमुळे जनमत पक्षाकडे झुकले असा निष्कर्ष ठामपणे काढता येत नाही. प्रवक्त्यांची फसगत होते ती नेमकी इथे. पक्ष नेतृत्वाला मात्र कोण, किती पाण्यात हे पुरते ठाऊक असते. त्यावर सारासार विचार न करता पावले उचलण्याचे धाडस केले की अनेकांची फसगत होते. वल्लभ यांनी या साऱ्या गोष्टी ध्यानात घेतल्या की नाही हे अद्याप कळायचे आहे; पण हा मुद्दा महत्त्वाचा.

कारण लोकप्रियता आणि जनाधार या दोन्ही वेगवेगळ्या बाबी असतात. त्यातल्या पहिलीवर स्वार झाले म्हणजे दुसरी आपसूक आश्रयाला येते असा समज करून घेणे चूकच. तसे असते तर लोकप्रियता लाभलेले सारेच निवडून आले असते. जावडेकर हे उत्तम प्रवक्ते असूनही पुण्यातून निवडून येऊ शकले नाहीत हा इतिहास फारसा जुना नाही. पक्षाला मात्र या दोन्ही बाबींमधील फरक चांगला कळत असतो. म्हणून पक्ष अनेकदा प्रवक्त्यांना सुरक्षित अशा राज्यसभेवर पाठवत असतो. तशी सोय करण्याची संधी काँग्रेसजवळ उपलब्ध नाही हे ध्यानात आल्यामुळे नेत्यांसोबत प्रवक्तेसुद्धा पक्षत्यागाची भूमिका घेत असावेत.

मग प्रश्न उरतो तो वैचारिक भूमिकेचे काय? आजवर जोरकसपणे काँग्रेसची बाजू मांडणारे, आर्थिक आघाडीवरचे अपयश दाखवून देणारे वल्लभ आधीचे कसे चूक होते व आता जे सांगतो ते बरोबर आहे असे जेव्हा म्हणतील तेव्हा तो वैचारिक व्यभिचार ठरेल त्याचे काय? ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर प्रवक्ते निष्ठा अथवा बांधिलकीतून पक्षाची बाजू मांडत नाहीत तर दिलेले काम करायचे या समजातून व्यासपीठे गाजवत असतात. मग याकडे कारागिरी म्हणून बघायला काय हरकत आहे? एखाद्या कंपनीची बाजू मांडणारा प्रवक्ता आणि पक्षाचा प्रवक्ता यात काही फरकच उरला नाही हेच या प्रवक्त्यांच्या पक्षांतरांनी दाखवून दिले आहे.