मुळात वन खात्यात कार्यरत असलेल्या एखाद्या वनाधिकाऱ्याचे कर्तव्य नेमके काय? जंगलात राहणाऱ्या आणि त्याच वेळी त्यास दुरून न्याहाळणाऱ्यांच्या मनात जंगलाविषयी ममत्व निर्माण करणे. नियमांच्या चौकटीत जगणाऱ्यांस ते करता येत नाही. त्यासाठी लेखनाचा मार्ग निवडणारे मारुती चितमपल्ली हे एकमेव म्हणावे असे. ब्रिटिश काळातील जिम कॉर्बेट हे असा मार्ग स्वीकारणाऱ्यांतले मोठे नाव. ते आजही सर्वत्र आदराने घेतले जाते. नेमका तसाच आदर व प्रेम चितमपल्ली यांना त्यांच्या हयातीतच वाचक, चाहत्यांकडून मिळाले. तेलगू आणि कन्नड अशी संमिश्र भाषा असलेल्या सोलापूरच्या लोकवस्तीत लहानाचा मोठा झालेला हा तरुण उदरनिर्वाहासाठी नोकरी असावी म्हणून वन खात्यात परिक्षेत्राधिकारी म्हणून रुजू झाला तेव्हा अशी काही साहित्यसेवा आपल्या हातून घडेल याचे स्वप्नही त्याने बघितले नव्हते. नोकरीच्या निमित्ताने सुमारे तीन दशके विदर्भात घालवणाऱ्या चितमपल्लींना जंगल वाचायला शिकवले ते नवेगाव बांधच्या माधवराव पाटील डोंगरवारांनी. मराठी सारस्वतांच्या वर्तुळाला निसर्गाची ओळख करून देणाऱ्या व्यंकटेश माडगूळकर, माधवराव व चितमपल्ली या त्रिकुटाने नंतर केवळ निसर्गच नाही तर जंगल, त्यात राहणारे पशुपक्षी, प्राणी, झाडे यांना बोलते करण्याची किमया त्यांच्या लेखनातून साधली. माधवराव तसे गावकुसात रमणारे. लिहिण्याचा छंद नसलेले पण अनुभवाची मोठी पोतडी उराशी बाळगून असलेले. याच अनुभवांना शब्दरूप देत तर अनेकदा स्वत: जंगलात भटकंती करून अनुभूती घेत चितमपल्लींनी जंगलाचे मोहक रूप त्यांच्या लेखनातून प्रत्येकाच्या दिवाणखान्यात आणून ठेवले. त्यांच्या ‘पाखरमाया’ या पुस्तकात एक वाक्य आहे. ‘‘जंगलातल्या देवळासमोरच्या पिंपळाची सळसळ अगदी अंगाई गीतासारखी वाटते. त्या सळसळीतून उमटणारा घोषनाद चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटेसारखा वाटतो’’. इतकी अचूक निरीक्षणे योग्य शब्दांचा वापर करून वाचकांपर्यंत पोहोचवणे हे तसे जिकिरीचे काम, पण चितमपल्लींनी ते लीलया पेलले. नदी, नाले, वृक्ष यांचे नाते थेट संस्कृतीशी जोडलेले असते. ते ओळखायला शिकले की अवघा निसर्गच आपलासा वाटू लागतो असे सतत सांगणारे चितमपल्ली संस्कृतीचे कृतिशील वाहक होते.
नोकरीच्या निमित्ताने ते ज्या ज्या ठिकाणी राहिले तेथील जंगलांची त्यांनी नव्याने ओळख करून दिली. त्यांची ग्रंथसंपदाही भरपूर. तिने वाचकांना वेड लावलेच, पण त्यांचे खरे काम कोशनिर्मितीचे. सरकारी पातळीवर होणारी विश्वकोशाची निर्मिती अनुदान, अभ्यासकांचा गट, सुसज्ज कार्यालये यातून होत असताना चितमपल्ली आयुष्यभर एकटेच वेगवेगळ्या कोशांच्या निर्मितीत मग्न राहिले. ना त्यांनी त्यासाठी कधी सरकारकडे अनुदान मागितले ना कधी लेखन सहाय्यासाठी मनुष्यबळ. सुमारे ४५० प्रजातींच्या पक्ष्यांची माहिती देणारा त्यांचा पक्षीकोश आजही अभ्यासकांना प्रेरणा देतो. त्यांचा प्राणी आणि वृक्षकोशही तयार आहे. पण तो प्रकाशित झाला नाही. ही मराठी साहित्य जगताची शोकांतिकाच म्हणायला हवी. तरीही उमेद न सोडता ते मत्स्यकोशाच्या तयारीला लागले होते. निवृत्तीनंतरचे अख्खे आयुष्य स्वत:ला लेखनात रमवून घेणारा हा एकांडा शिलेदार सारस्वतांच्या वर्तुळात काहीसा उपेक्षित राहिला, हे खेदाने का होईना, पण नमूद करावे लागते. पण सोलापूरला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले, ही त्या उपेक्षेची काहीशी भरपाईच म्हणायची.
मराठी साहित्याला सुमारे एक लाख नवे शब्द देणारा हा अरण्यऋषी चिंतन, मनन, लेखन यात अखेरच्या श्वासापर्यंत रमला. त्यांच्याकडे असलेली १५ हजार ग्रंथांची संपदा पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अथवा भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने न्यावी म्हणून त्यांनी अलीकडे बराच पत्रव्यवहार केला. पण त्यालाही फारशी दाद मिळाली नाही. यातही नवीन असे काहीच नाही. रा. चिं. ढेरे यांच्या निधनानंतर त्यांच्या ग्रंथसंग्रहाबाबतही अशीच उदासीनता दिसून आली होती. सांस्कृतिक पातळीवर आपण किती अक्षरशत्रू आहोत ते कळते ते यातूनच. शासकीय सेवेत असतानाही त्यांच्या वाट्याला अनेकदा उपेक्षा आली. वन खात्यावर वर्चस्व आहे ते भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचे. काहींचा अपवाद वगळला तर कुणीही चितमपल्लींच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. अशा वेळी मराठी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे होते, पण नोकरशाहीच्या प्रेमात असलेल्या राज्यकर्त्यांनीही त्यांच्याकडे कानाडोळाच केला. या खात्यात नव्याने दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना चितमपल्लींच्या तालमीत तयार करावे, चितमपल्लींच्या अनुभवाचा वापर करून घ्यावा, चितमपल्लींना पुढच्या पिढीतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलवावे असेही यापैकी कोणालाही वाटले नाही. असो.
‘पद्माश्री’ हा सन्मान स्वीकारून परतल्यापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्याआधी पत्नीचे अकाली निधन, मुलीचा मृत्यू यामुळे चितमपल्ली एकटे पडले होते. पण विदर्भातील जंगलांवर त्यांचे इतके प्रेम होते की त्यांचा विदर्भातून पाय निघत नव्हता. त्यामुळे तेव्हाचे मनुष्यबळ खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सलग तीन वर्षे त्यांची व्यवस्था वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठात केली. पण जावडेकर पदावरून जाताच चितमपल्लींपुढे कुठे राहायचे हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी वयोमानामुळे त्यांना त्यांचा आवडता विदर्भ, त्यातली जंगले सोडून सोलापूरमधील नातेवाईकांकडे येऊन राहावे लागले. चितमपल्ली यांनीच निर्मिलेल्या पक्षीकोशात पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मजकूर आहे. पक्ष्यांचे स्थलांतर अभ्यासणाऱ्या या चिंतकाच्या वाट्यालासुद्धा जगण्याचा भाग म्हणून विदर्भ ते सोलापूर असे स्थलांतर आले. पक्षीतज्ज्ञ सलीम अलीच्या वाट्याला जे आले, तेच माझ्या असे ते स्वत:च्या एकटेपणाबद्दल म्हणायचे, पण अगदी हसतहसत.
निरीक्षण आणि लेखनातून निसर्ग, जंगलाशी तादात्म्य पावलेला माणूस अधिकाधिक निर्मळ होत जात असावा. षड्रिपूंच्या विकारापासून मुक्ती मिळत असावी. चितमपल्लींकडे पाहून असे वाटायचे. जंगलात राहून त्या अनुभवांवर आधारित पुस्तके लिहिण्याचे प्रयोग नंतर अनेकांनी केले. त्यातल्या बहुतेकांनी वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या पुस्तकांची विक्री करण्याचे कामही वन खात्याच्याच गळ्यात टाकले. प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन करणाऱ्या अनेकांनी अशा पद्धतीने पुस्तके खपवून नाव कमावले, पण ३६ वर्षे सेवेत राहूनसुद्धा चितमपल्लींना असा मोह कधी झाला नाही. इतकी निरपेक्ष वृत्ती अंगी बाळगायला मोठी ताकद लागते. ती त्यांनी कमावली होती. म्हणूनच ते इतरांपेक्षा फार वेगळे ठरतात. शासकीय सेवेत राहून लेखनाचा व्यासंग जोपासणे तसे कठीण. त्यातल्या त्यात ललित अंगाने जाणारे लेखन तर आणखीच कठीण. चितमपल्लींनी मात्र ती किमया साधली. प्रशासकीय चौकटीचा आदर करत त्यांनी निसर्गावर प्रेम कसे करायचे याचा वस्तुपाठच त्यांच्या लिखाणातून असंख्य वाचकांना घालून दिला. जिवंतपणी त्यांची उपेक्षा करणारे सरकार आता किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांनी लिहून ठेवलेल्या अनमोल ठेव्याचे जतन करेल का? अपेक्षा न बाळगलेली बरी.
झाड निरपेक्ष वाढते. त्याच्या अस्तित्वात हिशेब नसतो. झाड मत देत नाही. झाड घोषणेत साथ देत नाही. म्हणून त्याचे मोल नसते. मारोती चितमपल्ली हे असे एक जंगलप्रेमाने झपाटलेले झाड होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ वगैरे गाणाऱ्या संस्कृतीत ते तसे उपेक्षितच राहिले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांस आदरांजली.