प्रत्यक्ष संघर्षादरम्यान असो वा संघर्षानंतर, ‘कथानकां’च्या किंवा ‘नॅरेटिव्ह’च्या युद्धात कोणीही कधीच खरोखर जिंकत नाही. प्रत्येक बाजू स्वतःची वास्तविक किंवा काल्पनिक कहाणी सांगत राहाते, ही प्रत्येक बाजूची कहाणी कथित विजयांवरच भर देणारी असते. दुसरी बाजू काय दावा करते याची कोणालाही पर्वा नसतेच. अर्थात, जोपर्यंत एका बाजूचा थेट आणि दृश्यमानपणे भौतिक लढाईत पराभव झाला तर गोष्ट निराळी, पण हल्ली जगभरच्या कुठल्याही युद्धात असे क्वचितच घडते!

अलीकडचाच एक नमुना यासंदर्भात पाहाता येईल… ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानने दावा केला की त्यांनी ‘सहा भारतीय विमाने पाडली’ आहेत. भारताने ते नाकारले. खरे तर, गेल्या आठवड्यापर्यंत नवी दिल्लीने नुकसानीबद्दलच्या कोणत्याही प्रश्नांना स्पष्ट उत्तर देणे नाकारले. अखेर सिंगापूरमध्ये भारताच्या संयुक्त सेनादल प्रमुखांनी सांगितले की आपल्या हवाई दलाचेही नुकसान झाले आहे, परंतु ‘रणनीतिक चूक दुरुस्त करण्यात आली आणि योजना पुन्हा अंमलात आणण्यात आली’ यावर त्यांचा भर होता. या म्हणण्याचा एक गर्भितार्थ असा की, ‘आपण शेवटी जिंकलो असल्यामुळे आपण काय गमावले हे महत्त्वाचे नाही’. परंतु कोणत्याही पारंपारिक अर्थाने भारत ‘जिंकला’ आहे असे जगाला दिसलेले नाही. संघर्ष युद्धबंदीत संपला, याचा अर्थ दोन्ही बाजूंना असे करण्यात आपलाच फायदा आहे याची खात्री पटली. भारताचा असा विश्वास आहे की त्याने पाकिस्तानी अण्वस्त्रसज्जतेच्या भूलथापांचे पितळ उघडे पाडले.

दुसरीकडे, पाकिस्ताननेही प्रतिकाराचा दावा सोडलेला नसला तरी, भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने त्यांच्या हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानातले कुणीच वरिष्ठ काही फारसे बाेलत नाहीत. पाकिस्तानी लष्करी आस्थापनेने त्यांच्या कथित निधडेपणाचे कथानक पुढे रेटण्यासाठी आणखी एक खेळी केली- अलीकडेच त्यांच्या लष्करप्रमुखांनी फील्ड मार्शलचा दर्जा स्वीकारला! हे सन्माननीय पद असते; पण आता त्याचा संबंध युद्धभूमीतील वास्तवापेक्षा, कथानके रचण्याच्या गरजेशी अधिक आहे, हे यातून उााड होते. पण पाकिस्तानला नमवले अशी भारताची खात्री असूनसुद्धा ‘आम्ही भारताच्या श्रेष्ठत्वाच्या भ्रमाला मोडून काढले आहे,’ आणि ‘नवी दिल्लीला त्याच्या शेजाऱ्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचा धडा शिकवण्यात आला’ – अशी विधाने पाकिस्तानी पंतप्रधानांमार्फत केली जात आहेत.

ट्रम्प यांचीही कथानकबाजी?

भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानचा घटनाक्रम कसाही असो, अमेरिकी राजधानीतून- वॉशिंग्टनमधून तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्याकडे स्वत:च्याच दृष्टीने पाहात होते. मग त्यांनी दावा केला की मीच दोन्ही देशांना माघार घेण्यास राजी केले- हे एखाद्या ट्वीटपुरते न ठेवता नंतरही ‘मी त्यांच्याशी व्यापाराबद्दल बोललो,’ असे ते म्हणाले. भारताने ट्रम्प यांचे हे म्हणणे ‘कोणीही मध्यस्थी केलेली नाही’ अशा स्पष्ट शब्दांत नाकारलेले आहे. पण पाकिस्तान ट्रम्प यांच्याशी सहमत आहे. खरे कोण बोलत आहे, हे सांगणे कठीण आहे. कदाचित त्यामुळे या तिघांपैकी कोणालाही काहीच फरक पडणार नाही, प्रत्येकजण आपापल्या मताशी चिकटून राहणार हे उघड आहे.

भारताच्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांनी दिल्लीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेल्या आठवड्यात जगभरच्या अनेक राजधान्यांकडे प्रयाण केले. सीमापार दहशतवादाबद्दलची भारताची चिंता सातत्यपूर्ण आहे; त्यामुळेच पश्चिमेकडील अनेक देश भारताच्या या भूमिकेबद्दल सहानुभूती दर्शवतात. याउलट, अतिरेकी गटांशी व्यवहार करताना पाकिस्तानचा दुटप्पीपणाच दिसतो, हे त्या देशांनाही माहीत आहे. प्रतिकार करण्यासाठी भारतावर सार्वजनिक दबाव वाढतो आहे, हेही या देशांना माहीत आहे. तरीसुद्धा यापैकी काही देश भारताच्या भूमिकेला थेट पाठिंबा देताना दिसत नाहीत. असे होण्यामागे काही कारणे असावीत किंवा आपण आजवर अनुत्तरित ठेवलेली प्रश्नही असावेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता – पण भारताने खऱ्या गुन्हेगारांचा पाठलाग का केला नाही? गुप्तचर विभागाकडील माहितीचे आदानप्रदान या बाबतीत का केले नाही? समाजमाध्यमांवर या घटनेची चर्चा खुलेपणाने करण्यावर निर्बंध, नुकसात स्वीकारण्यास टाळाटाळ आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांशी संवाद साधण्यास अनिच्छा- असे भारताकडून का दिसते आहे? अर्थातच, हे प्रश्न भारतात राहाणाऱ्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. बहुतेक भारतीय हे, त्यांना जे काही सांगितले गेले, त्यावर समाधानी आहेत. कदाचित हेच आपल्या कथानकाचे यश, असेही म्हणता येईल… प्रश्नांना जागाच ठेवायची नाही, जेणेकरून प्रचलित कथानक स्वीकारले जाईल, पुन्हापुन्हा तेच सांगितले जाईल आणि तेच दीर्घकाळात आपल्या राष्ट्रीय अभिमानाचा भाग होईल. पण आपल्या कथानकाच्या इतक्या यशावरच आपण समाधान मानावे का?

अखेर कोणतेही, कोणत्याही देशाचे कथानक हे स्वभावत:च दिशाभूल करणारे असते. ते तथ्य, अर्धसत्य आणि सोयीस्कर काल्पनिक मजकूर यांचे मिश्रण करून अनुकूल चित्र निर्माण करणे, हेच तर कथानकाचे ‘कार्य’ असते. पण जगातल्या द्विपक्षीय संघर्षांचा अनुभव पाहिला असता बहुतेकदा असे होते की, कथानक फक्त सांगणाऱ्यालाच पटत असते.मम्ही जरब बसवली’ असे एखादा सांगत असेल, पण जरब ज्याच्यावर बसवली गेल्याचे सांगितले जाते आहे- त्याला ही जरब मान्य आहे का? इथे आपण लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, पाकिस्तानच्या सैन्याचा विचार ‘नंतर कधीतरी पाहून घेऊ’ असा जरी सध्या असेल, तरीही आपण आज त्यांना ‘पाहून घेतलेले’ आहे, हे वास्तव उरतेच! पण तरीदेखील पाकिस्तानी कांगावे सुरू राहातात, यामागचे कारणही आता आपण ओळखले पाहिजे. पाकिस्तानी सामरिक मनोविकार नेमका काय आहे, हे आपण जाणले पाहिजे. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी यादृष्टीने आधीच पावले उचललेली आहेत. जॉर्जटाउन विद्यापीठातील प्राध्यापक आणि पाकिस्तानच्या एक निरीक्षक क्रिस्टीन फेअर यांनी युक्तिवाद केला आहे की, पाकिस्तानी सैन्य बंडखोर मानसिकतेने काम करते. ते ‘फक्त न हरता जिंकते’- पाकिस्तानी लष्कर हे मुळात संघर्ष आणि राजकीय संधीसाधूपणा यांवरच भरभराटीला येत असल्यामुळे, त्यांना जरब बसल्याचे ते कधी मान्यच करत नाहीत.

भारतानेही हे निरीक्षण लक्षात ठेवले पाहिजे. कदाचित पाकिस्तानकडून पुन्हादेखील चिथावणी दिली जाईल – तेव्हा नवी दिल्लीने निव्वळ ‘धडा शिकवण्या’ची राजकीय इच्छाशक्ती द्यायची की संयम बाळगायचा, या प्रश्नामधून बाहेरच पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे… तो हुशार मार्ग म्हणजे आग रोखणे, सतर्क राहणे आणि प्रतिसाद कसा असावा हे आपणच ठरवून प्रतिपक्षाला धक्का देणे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने दावा केला की त्यांना भारतीय हल्ल्याची अपेक्षा होती आणि ते वाटच पाहत होते. यानंतर पाकिस्तानाने बराच अपप्रचार सुरू केला. यातून निघणारा व्यापक मुद्दा असा आहे : राजकीय संदेश म्हणून ओळखली जाणारी लष्करी कारवाई ही एक धोकादायक उपक्रम आहे. दीर्घकालीन परिणामाऐवजी तात्पुरता विजय मिळवून दाखवणारी लढाई ही व्यापक अर्थाने यशस्वी नसते.

मे महिन्यात होणाऱ्या चार दिवसांच्या कार्यक्रमासारख्या संघर्षांमध्ये, कथनात्मक वर्चस्व हा एक भ्रम आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. खरी स्पर्धा ही कोण जास्त बोलतो याची नाही – तर कोण परिस्थिती नेमकी ओळखतो, कोण प्रतिस्पर्ध्याला सर्वात जास्त हवे असलेले नाकारतो यात खरे यश लपलेले असू शकते. त्यामुळेच, निव्वळ कथानकांच्या स्पर्धेत आपण किती काळ ओढले जाणार याचा विचार आता व्हायला हवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखक नौदलातील माजी अधिकारी असून सध्या दिल्लीस्थित युद्धविश्लेषक आहेत.)