तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग तुम्हाला नक्कीच आठवत असतील, जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एकटे सोडून निघून जावे असे वाटले असेल, पण ती व्यक्ती तसे करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अमेरिकेचे विद्यामान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गायब व्हावेत असे वाटत असेल, पण ट्रम्प तसे काही गायब होणाऱ्यातले नाहीत, असे मला वाटते.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेचे हितसंबंध आहेत, असे ट्रम्प यांना वाटते असे दिसते. यासंदर्भात ते काहीतरी बोलतात किंवा लिहितात तेव्हा ते या सगळ्याशी कसे संबंधित आहेत, याचा जाणीवपूर्वक उल्लेख करतात. यासंदर्भातील त्यांच्या संबंधांबाबत आतापर्यंत मोदींनी मौन बाळगले आहे. मला असे वाटते की ट्रम्प यांच्याबाबत काय बोलावे यासंदर्भात सध्या मोदी गोंधळलेले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा ट्रम्प जिंकले आणि आता पुढील साडेतीन वर्षांसाठी व्हाइट हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पण अमेरिकेतील मागील निवडणुकीच्या वेळी तिथे जाऊन ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ (ह्यूस्टन, सप्टेंबर २०१९) ही घोषणा दिल्याचा आता मोदींना पश्चात्ताप होत असेल.
२२ एप्रिल रोजी, इतर नेत्यांप्रमाणे, ट्रम्प यांनीही पहलगाम घटनेचा त्यांना धक्का बसल्याचे सांगितले आणि या घटनेचा निषेध केला. २५ एप्रिल रोजी ते म्हणाले की दोन्ही देश ‘या ना त्या मार्गाने’ हा प्रश्न सोडवतील.’ ७ मे रोजी, भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील निवडक ठिकाणांवर क्षेपणास्त्रांद्वारे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला, पण पूर्ण युद्ध छेडण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले, तेव्हा ट्रम्प म्हणाले, ‘मला आशा आहे की हा संघर्ष खूप लवकर संपेल.’ दुसऱ्या दिवशी, संघर्ष सुरूच असताना, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानला सांगितले की ‘माझी काही मदत होण्यासारखी असेल, तर मी तयार आहे.’ ही सर्व विधाने अपेक्षेप्रमाणेच होती.
मनोरंजक आणि धक्कादायक
पण ८ आणि ९ मेच्या रात्री वेगळेच काहीतरी घडले. चिनी बनावटीची लष्करी विमाने व क्षेपणास्त्रे तसेच तुर्कस्तानात बनवलेले ड्रोन पाकिस्तानने तैनात केल्याचे उघडकीस आले असावे, मला असे वाटते. वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक हल्ल्याचा भारताने यशस्वी प्रतिकार केला. काही दिवसांनी भारताने ‘युद्धामध्ये दोन्ही बाजूंना काही ना काही नुकसान होणे अपरिहार्यच असते’, असे म्हणत आपल्या ‘तोट्यांची’ कबुली दिली असली तरी भारत फारसा अस्वस्थ वाटला नाही. भारतीय जनताही फारशी घाबरलेली नव्हती. खरा गोंधळ सुरू झाला १० मे रोजी, संध्याकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या वैयक्तिक समाजमाध्यम व्यासपीठावर एक ट्वीट केले, त्यानंतर. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री दीर्घ काळ सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख केला आणि ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण व त्वरित शस्त्रसंधी करण्यावर सहमती झाली आहे, याचा मला आनंद होत आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन…’ अशी घोषणा केली. त्यानंतर काहीच मिनिटांनी, अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी ‘एक्स’वरून जाहीर केले की भारत आणि पाकिस्तान ‘तटस्थ स्थळी’ चर्चेसाठी भेटणार आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष वॅन्स यांनी आदल्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या टेलिफोन संभाषणात मोदींना ‘धक्कादायक गुप्त माहिती’ दिली होती, असे वृत्त माध्यमांनी दिले.
थोडक्यात सांगायचे तर, हे ट्वीट मनोरंजक आणि धक्कादायक होते.
१० मे रोजी संध्याकाळी ६ वाजता, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले की त्या दिवशी दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही डीजीएमओंमध्ये (डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) चर्चा झाली आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली आणि लढाई थांबली. त्यामुळे, तथ्यांच्या बाबतीत ट्रम्प यांनी सांगितले ते बरोबर होते. आपल्या संरक्षण दलांनी शौर्याने लढा दिला, वेगवेगळ्या पातळ्यांवर यश मिळवले आणि अखेर लढाई थांबली याचाच मला आनंद आहे.
गाजर आणि काठी
१२ मे रोजी ट्रम्प यांनी असा दावा केला की त्यांनी एक ‘अण्वस्त्र संघर्ष’ थांबवला आहे आणि त्यांनी धोक्याच्या इशारा देत ते पुढे असेही म्हणाले, की ‘चला, हे थांबवूया. तुम्ही थांबवलंत, तर आपण व्यापार करू. तुम्ही थांबवले नाही, तर आपल्यात कोणताही व्यापार होणार नाही.’ (सौदी अरेबिया आणि कतार भेटीदरम्यानही ट्रम्प यांनी या विधानाची पुनरुक्ती केली.) १३ मे रोजी मोदी यांनी ‘न्यू नॉर्मल’ धोरण मांडले आणि स्पष्ट केले की भारत कोणाच्याही, कोणत्याही ‘अण्वस्त्रांच्या धमकी’पुढे झुकणार नाही.
अर्थात, आपण आपल्या संरक्षण दलांवर विश्वास ठेवू आणि सरकारच्या पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही प्रतिबंधात्मक कारवाईला पाठिंबा देऊ, हे तर उघडच आहे. पण तरीही सरकारला प्रश्न विचारले जातील, विचारलेच पाहिजेत. कारण प्रश्न विचारणे हा लोकशाहीत लोकांचा अधिकार आहे.
प्रश्न आणि उत्तरे
● दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल; अण्वस्त्राच्या धमकीबाबत कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही; आणि देशपुरस्कृत दहशतवाद व दहशतवाद्यांचे मास्टरमाइंड यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही, या तीन कलमी सूत्रात ‘नवे’ म्हणावे असे काहीही नाही. मोदी यांनी एक जुनी ठाम भूमिकाच अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे, नाही का?
● अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स आणि परराष्ट्र सचिव रुबिओ यांनी ८ आणि ९ मे रोजी भारताशी शस्त्रसंधीबाबत चर्चा केली का? त्यांनी त्याच दिवशी पाकिस्तानशीही चर्चा केली असेल, तर ती मध्यस्थी ठरणार नाही का?
● व्हान्स यांनी ९ मे २०२५ रोजी मोदी यांना ‘धक्कादायक गुप्त माहिती’ सांगितली का? ती माहिती पाकिस्तानकडून अण्वस्त्र वापरण्याच्या धमकीविषयी होती का? ती तशी नव्हती, तर पंतप्रधान (१२ मे) आणि संरक्षणमंत्री (१५ मे) यांनी ‘अण्वस्त्र धमकी’चा उल्लेख का केला?
● दोन देशांच्या डीजीएमओंमध्ये दुपारी ३.३५ वाजता शस्त्रसंधीची सहमती झाल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांना कसे कळले आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या ५.२५ वाजेच्या ट्वीटमध्ये जाहीर कशी केली?
● ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून टॅरिफ युद्ध सुरू केल्यावर भारताने प्रत्युत्तरादाखल प्रस्ताव सादर केले नाहीत का? उपराष्ट्राध्यक्ष व्हॅॅन्स यांनी भारत दौऱ्यादरम्यान मोदी यांच्यासोबत ‘व्यापार करार’ या विषयावर चर्चा केली नव्हती का? (स्राोत: टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स)
● शस्त्रसंधीत मध्यस्थी केल्याच्या आणि शस्त्रसंधीसाठी व्यापाराचा दबाव आणल्याच्या ट्रम्प यांच्या पुन:पुन्हा केलेल्या दाव्यांविरोधात भारताने अमेरिका सरकारकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे का?
● पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या कर्ज कार्यक्रमाविरोधात भारताने मतदान का केले नाही? भारताने तटस्थ राहणे का पसंत केले?
इतरही अनेक प्रश्न आहेत, पण ते विचारण्याची ही वेळ किंवा जागा नाही. ट्रम्प हे एक अदम्य गृहस्थ आहेत. ते एखादी गोष्ट करून थांबणारे व्यक्तिमत्त्व नाही. त्यात ते आता पुढची साडेतीन वर्षे इथेच आहेत. कुठेच जाणार नाहीत, ते वारंवार अडचणीत टाकणारी विधाने करत राहतील, आणि प्रश्न विचारण्यासाठी भरपूर सामग्री पुरवत राहतील. पण आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? की मौन हेच उत्तर असणार आहे?
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in ट्विटर : @Pchidambaram_IN