– डॉ. सुनीलकुमार सरनाईक

संपूर्ण महाराष्ट्रात वळीव आणि मान्सूनपूर्व पावसाने गेले चार दिवस दमदार हजेरी लावली आहे, ग्रामीण भागांत हाहाकार माजवला आहे. यंदा लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी व पेरणीसाठी शेतकऱ्यांना काहीच करता आलेले नाही. बळीराजा चिंताग्रस्त असून हवालदिल झाला आहे. रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या मान्सूनपूर्व तडाखेबाज पावसाने उन्हाळी पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्यमहाराष्ट्र या भागांत वादळी वाऱ्यासह वळीव दमदारपणे बरसत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वळीव तसेच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने संकट उभे केले आहे. 

शेतकऱ्यांसमोर आताच अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. दोन वर्षांपूर्वी राबराब राबून हातात आलेले पीक गारपिटीने व अवकाळी पावसाने बघता बघता गिळंकृत केले होते. यंदादेखील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागत आहे. काही दिवसांत हातात येऊ घातलेल्या संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपिकांचे तर होत्याचे नव्हते झाले आहे. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग या सारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विक्रमी उत्पादन झालेल्या कांदा व लसूण या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे कांदा लसूण उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. 

जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत. आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो. शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. याचे संपूर्ण श्रेय इथल्या कष्टकरी शेतकरी व शेतमजूर यांच्याकडे जाते. मात्र यंदा प्रचंड वादळवारे, मान्सुनपूर्व व अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. खरीपाच्या पिकांची तर शाश्वतीच नाही. पशुधन, पक्षी व मानवी जीवनावरही त्याचा दुष्परिणाम होत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भयंकर नैसर्गिक आपत्तीला बळीराजा तोंड देत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश होऊ लागला आहे. आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. एक दोन दिवस झाले की, शेतकरी आत्महत्यांचे वृत्त कानावर पडते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसून उभे राहिले पाहिजे. 

अनेकांचे पशूधन गतप्राण झाले आहे, काही शेतकऱ्यांच्या घरादारांचे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले की शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे सरकारने वेळीच पावले उचलणे अतिमहत्त्वाचे आहे. 

दरवर्षी याच काळात दुष्काळ आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी तापमानात झालेली प्रचंड वाढ व अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. अशा ओढग्रस्त व आपत्तीग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहायला हवे.

प्रचंड गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे वेळेत पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यांना योग्य ती भरपाईही मिळाली पाहिजे. महसूल विभागाने हे काम तातडीने हाती घेतले पाहिजे. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी, तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करताना कामचुकारपणा व भेदभाव करतात. आर्थिक गैरव्यवहारही होतात. त्यांची मिलीभगत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते,गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. 

प्रांतभेद करू नये

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब व योग्य ते आर्थिक सहाय्य करावे, हे करताना शासनाने प्रांतभेद करू नये. राज्यात ज्या ज्या प्रांतात शेतकऱ्यांच्या पिकांची, फळबागांची, व पशूधनाची नासाडी, दूरावस्था व नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाने आर्थिक साहाय्य व्हावे, अन्यथा राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या भागात तसेच ठराविक शेतकऱ्यांना झुकते माप दिले जाते, असे होऊ नये. 

शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे 

शेतकरी भरडला जात असतानाही भरपाई देण्यासाठी त्याच्याकडे चिरीमिरी मागितली जाते, अशांवर लक्ष ठेवून कडक कारवाई करावी. आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा या अस्मानी संकटातून बाहेर पडून ताठ मनाने उभा राहावा यासाठी सरकारने विशष प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीजबिलात सवलत द्या

भरपाई देताना वीजबिलात सवलत देण्यासारखे मार्गही अवलंबता येतील. इतर महसुली करही माफ करण्यात यावेत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे आपण शेतकरी कुटुंबातील असल्याचा उल्लेख सदैव अभिमानाने करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची जाणीव या दोघांना तरी असणारच, तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.