पुण्यात घडलेल्या आणि प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतून बहुचर्चित ठरलेल्या ‘हुंडा बळी’ प्रकरणानंतर (परत एकदा) खडबडून जागे झालेल्या ‘मराठा’ समाजाची लग्नकार्य- विवाह सोहळ्यासाठी आदर्श आचारसंहिता वाचनात आली. आचारसंहिता निश्चितच दखलपात्र आहे आणि ती प्रत्यक्षात उतरली तर समाधानाची बाब आहे. आचारसंहितेचा मसुदा थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
१०० ते २०० लोकांच्याच उपस्थितीत विवाह करावा. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. डीजे, मिरवणूक यास फाटा द्यावा. प्री- वेडिंग प्रथा बंद करावी. नवरा-नवरीस हार घालताना उचलून घेऊ नये. लग्न कार्यासाठी कर्ज काढू नये. लग्नात फक्त वर पिता आणि वधू पिता यांनाचा फेटे बांधावेत. भेट वस्तूंऐवजी पुस्तके, झाडंची रोपे किंवा रोख रक्कम द्यावी. लग्नात ऐश्वर्याचा देखावा करू नये. लग्नात हुंडा देऊ- घेऊ नये. लग्नाच्या जेवणात पाच पेक्षा अधिक पदार्थ नकोत. हळद, साखरपुडा, लग्न एकाच दिवशी करावे.
लग्न समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीची प्रथा बंद करावी. शिवाजी महाराज हे आपले जरी दैवत असले तरी त्यांना ‘देवत्व‘ बहाल करू नये. ‘स्वराज्या’ची स्थापना शिवाजी महाराजांनी स्व-पराक्रमावर केली. हा त्यांचा पराक्रम प्रेरणादायी आहे. पण आरतीमुळे त्यांचा पराक्रम पुसला जाईल आणि त्यांना देवत्व बहाल केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती कुणीही कुठे लावू नये किंवा म्हणू नये.
न्या. रानडे, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह सोहळ्याकडे पाहण्याचा एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात जो दृष्टिकोन होता, त्याला साजेसा हा प्रकार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जी आदर्श आचारसंहिता मराठा समाजातील धुरीणांनी तयार केली आहे, त्यास काही अडसर सुद्धा आहे.
टोकाची विभूतीपूजा ही मराठा समाजाची सार्वत्रिक मानसिकता आहे. विभूतीपूजेला बळी पडलेल्या मराठा समाजात परस्परांच्या हितसंबंधांना छेद देणाऱ्या प्रवृत्ती जोपासल्या गेल्या. आपलेच राजकीय अभिजन आपल्या भल्यासाठी काहीही करत नाहीत, याची खात्री पटलेली असतानादेखील मराठ्यांनी विभूतीपूजेचा त्याग केलेला नाही. मागील सहा दशकांपासून एकाच जातीचे मराठे ‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गांत कायमचे विभागले गेले आहेत. प्रसिद्ध परिवर्तनवादी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे “एकीकडे सत्ताधीश पाटील, देशमुख, नवे सरंजामदार (लोकप्रतिनिधी), तर दुसरीकडे सर्वसामान्य छोटे शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार तरुण अशी सरळ सरळ विभागणी झालेली आहे. त्यामुळे एकसंध समाज म्हणून मराठा अस्तित्वाच नाही. तर ती एक ध्येयहीन गर्दी आहे.” या विधानाला पुढे घेऊन जाताना मराठा समाजातील स्तररचनेवरदेखील मांडणी झाली पाहिजे. सगळेच मराठा उच्चभ्रू आहेत, सरंजामी प्रवृत्तीचे आहेत, असा उथळ युक्तिवाद अन्यायकारक ठरलेला आहे, व ठरत आहे.
सर्वसाधारणपणे मराठा समाजाची विभागणी समाजशास्त्रीय विवेचनानुसार एकूण चार प्रकारांत करता येते.
पहिला, राजकीय अभिजन. यात राजकीय सत्तास्थाने बळकावून असलेल्या मूठभर घराण्यांचा समावेश होतो. आलटूनपालटून सत्ता काही विशिष्ट घराण्यातच राखण्यात यशस्वी झालेला हा अत्यंत छोटा गट आहे. याला कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नाही. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांत तो सत्तेसाठी विखुरलेला आहे. छत्रपतींचे वंशज, तसेच छत्रपतींचे नाव घेऊन सत्तांध वृत्ती बाळगणारे कुणीही याला अपवाद नाहीत.
दुसरा स्तर इतर क्षेत्रांतील मराठा अभिजनांचा आहे. राजकारण्यांसोबत राहून सत्तेतील इतर क्षेत्रांत प्रतिष्ठित झालेला हा वर्ग आहे. यात सहकारसम्राट, शिक्षणसंस्था चालक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेतृत्व, उद्योगक्षेत्र आणि प्रशासकीय अभिजनांचा समावेश होतो. या गटातदेखील शोषक प्रवृत्ती आहे.
तिसरा स्तर सुखासीन जीवन जगणाऱ्या उच्च मराठा मध्यमवर्गाचा आहे. यात मोठे जमीनदार, बागाईतदार यांच्यासोबत प्रशासकीय व इतर शासकीय सेवेत असलेल्या वर्गाचा समावेश होतो. हा घटक अत्यंत स्थितप्रज्ञ आहे. आपल्या खालच्या स्तरावर जीवन जगत असलेल्या बांधवांबाबत काडीमात्रही कळकळ या घटकाला नाही. सामाजिक बांधीलकीपासून पूर्णपणे फटकून असलेला हा समाजघटक आपल्याच वर्तुळात जीवन जगतो. मात्र यांच्याकडूनही सर्वसामान्य मराठा समाजाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणच होते. प्रशासकीय सेवेत उच्चपदावर गेलेला मराठा अधिकारीदेखील सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांचे शोषण करताना थोडाही संकोच बाळगत नाही.
चौथा स्तर हा वंचित मराठा बहुजन, गरीब शेतकरी, मजूर व कामगारांचा आहे. लौकिक अर्थाने हा वर्ग सामाजिकदृष्ट्या प्रगत व प्रतिष्ठित आहे असे मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे तो स्वत:ला मागासवर्गीय अथवा सामाजिक प्रतिष्ठा नसलेला मानत नाही. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या सरंजामदारी मानसिकतेचा तो बळी ठरला आहे.
एक सोपं उदाहरण देतो. आजही ग्रामीण भागात, सर्वाधिक विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत (हायवे) मोक्याच्या ठिकाणी ‘मंगल कार्यालय’ उभी राहिलेली आहेत. त्यातील बहुतांश मराठा समाजाच्या मालकीची आहेत. साखर कारखान्याच्या प्रांगणात, उभी राहिलेली ‘मंगल कार्यालय’ कुणी उभी केली आहेत? हजार – दीड हजाराच्या वऱ्हाडाला सहज सामावून घेणाऱ्या, या मंगल कार्यालयांचे एका दिवसाचे भाडे पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत असते. पूर्वी म्हणजे साधारणपणे १५-२० वर्षांपूर्वी, ग्रामीण भागांत सर्रास घरासमोरील अंगणात तसेच शेतातील मोकळ्या जागेत विवाह सोहळे पार पाडले जात होते. साध्या पत्रावळीवर, साधे घरगुती जेवण वाढले जात होते. पण पुढे हिंदी चित्रपटांचा प्रभाव (‘हम आपके है कौन’ वगैरे), आपल्याच समाजबांधवातील (प्रस्तुत लेखात वर उल्लेख केलेल्या, राजकारणी, सहकार क्षेत्रातील दिग्गज, शासकीय अधिकारी, मोठे बागायतदार, मोठ्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक वगैरे) आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या स्तरातील समाज बांधवांचे अनुकरण करण्याचा हव्यास! यात मराठा समाज पुरता गुरफटला गेला. आता तर मराठा समाजात निधनानंतर ‘वर्ष श्राद्धा’च्या निमित्ताने मंडप, कीर्तनकार, जेवण यावर लाख-दीड लाखापर्यंत खर्च केला जातो. हा सगळा आटापिटा शेवटी ‘भावकी‘ आणि पाव्हण्या-रावळ्यांत मोठेपणा दाखवण्यासाठी! याचं अनुकरण आता ‘गावगाड्या’तील इतर समाजही करू लागला आहे.
मराठा समाज यातून स्वतःहून बाहेर पडत, आधुनिक समाज जाणीवेशी जोपर्यंत जोडून घेत नाही, तोपर्यंत अशा आचारसंहिता कागदावरच राहतात!
padmakarkgs@gmail.com