डॉ. पंकज हासे, डॉ. मंजुषा पाटील
दरवर्षी २८ सप्टेबर हा दिवस जगभरात ‘जागतिक रेबीज दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. विषाणू कुटुंबातील प्राणघातक आजार म्हणून याकडे पहिले जाते. जिवंत प्राण्यात आजाराचे निश्चित निदान होत नाही. आजाराचे निश्चित निदान झाले तरी उपचार उपलब्ध नाही. या आजारामध्ये मृत्यू अटळ आहे. तसेच हा आजार झोनोटिक म्हणजेच माणसाकडून प्राण्यांना आणि प्राण्यांकडून माणसांना होत असल्याने मानवी आरोग्यास सुद्धा या आजाराचा धोका संभवतो. श्वान आणि प्राणी प्रेमींची सुज्ञता आणि समाजाची जागरुकता या द्वारे हा विषयावर काही अंशी मात केली जाऊ शकते. Beaware of Dogs ऐवजी Be aware of Rabies म्हणण्याची आता वेळ आली आहे. सामान्य माणसाच्या मनात रेबीज आजाराविषयी येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखामधून केला आहे.

१. प्रश्न : रेबीज म्हणजे काय ?

उत्तर : रेबीज हा भयानक रोग आहे. हा रोग मध्यवर्ती मज्जासंस्थावर परिणाम करतो. या मुळे मेंदूला सूज येऊन माणूस मरू शकतो. ऱ्हाबडो व्हायरस या कुटुंबातील विषाणू आहे. हा विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना रोगी जनावराची लाळ लागल्याने देखील होतो. रेबीज रोगाने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघुळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना या रोगाची लागण होऊ शकते. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगूससुद्धा रेबीज रोग पसरवतात.

२. प्रश्न : रेबीज कसा पसरतो ?

उत्तर : हा रोग लाळेतून अथवा जखमेद्वारे पसरतो. म्हणजे रेबीज झालेल्या कुत्र्याने चावल्यामुळे किंवा त्याने जखमेवर चाटल्याने होतो. हा रोग हवेतून पसरत नाही. माणसांमध्ये मुख्यतः कुत्र्यामुळे पसरतो. पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या नंतर मज्जातंतूंद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. या ठिकाणी वाढ होण्यासाठी त्याला साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत अधिशयन काळ असे म्हणतात. या कालावधित रोगी कुठलीच लक्षणे दाखवत नाहीत. एकदा लक्षणे दिसायला लागली, की मृत्यू अटळ समजावा. अधिशयन काळात हा विषाणू वेगाने वाढतो, मेंदूत पसरतो. रोगाच्या सुरवातीच्या काळात म्हणजे ‘प्रोड्रॉमल’ अवस्थेत काही लक्षणे दिसतात. मज्जातंतूंद्वारे विषाणू पृष्ठमज्जारज्जू व मेंदू या केंद्रीय मज्जा संस्थेच्या प्रमुख इंद्रियांपर्यंत पोहोचतात. केंद्रस्थानी पोचल्यानंतर हे विषाणू तेथील पेशींचा दाह निर्माण करतात.

३. प्रश्न : या रोगावर काही इलाज आहे का ?

उत्तर: एकदा या रोगाचे लक्षण आपल्या शरीरावर स्पष्ट दिसायला लागले तर त्यावर इलाज शक्य नाही, पण लगेच उपाय केल्यास तो पूर्णपणे सफलतापूर्वक बरा होऊ शकतो.

४. प्रश्न: हा रोग किती दिवसापर्यंत समजतो ?

उत्तर : साधारणतः १० दिवसांपासून ते २ ते ३ वर्षांपर्यंत दिसून येतो. हे अनेक कारणांवर अवलंबून असते. उदा. शरीराच्या कोणत्या भागावर श्वानदंश झाला आहे? श्वान दंशाची जागा जितकी मेंदूच्या जवळ असेल तितका लवकर रोगाचा परिणाम होतो. एकदा का या रोगाचे लक्षण स्पष्ट दिसू लागले, तर पाच ते सात दिवसांमध्ये माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

५. प्रश्न : रेबीजची लक्षणे कोणती आहेत ?

उत्तर : सुरूवातीला याची लक्षणे स्पष्ट न दिसणारी अशी असतात.

रोग्याला ताप, उलट्या आणि वेदना होतात हीच सुरूवातीची लक्षणे आहेत. या नंतर रेबीज हा एकतर ‘भयानक रेबीज’ आणि ‘शांतता रेबीज’चे रूप धारण करतो. भयानक रेबीज प्रकारामध्ये प्राणी अस्वस्थ होतात, विचित्र वागतात, तोंडातून लाळ गळते आणि मागच्या पायामध्ये लकवा होतो. तर शांतता रेबीजमध्ये शरीरावर नियंत्रण न राहणे, अंधारामध्ये लपून राहणे, रोड होणे, अशी लक्षणे दिसतात. पण दोन्ही प्रकारामध्ये रोग्याच्या आवाजामध्ये आणि गिळण्यामध्ये त्रास होणे, हा बदल येतो. शेवटच्या टप्प्यामध्ये श्वास घेण्यामध्ये अडथळा येऊन तो बंद होऊन तो मरणापर्यंत पोहचतो.

६. प्रश्न : कोणत्याही कुत्र्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसली, तर त्याला रेबीज असतो का ?

उत्तर : सर्व लक्षणे दिसत असली, तर रेबीजची शक्यता असू शकते. बऱ्याच वेळा दुसऱ्या रोगांमुळे ही लक्षणे होऊ शकतात. जसे बाहेरचा काही पदार्थ तोंडामध्ये अडकणे किंवा विष पिणे यामुळे लाळ गळते. कुत्र्याला राग येणे ही सुध्दा सामान्य गोष्ट आहे. कारण काही लोक फक्त मौजमजेसाठी कुत्र्यांना चावण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे रोगाचे निदान करण्यासाठी फक्त विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

७. प्रश्न : रेबीज कसा समजतो ?

उत्तर : रोगाचे विशेषतज्ञ आणि लॅबोरेटरीतून माहिती मिळू शकते. या मध्ये केल्या जाणाऱ्या निदानावरून पशुवैद्यक कुत्र्याचा स्वभाव, जोपासना, त्याचा मालक आणि दुसऱ्या कुत्र्यांबाबतची वागणूक (जर पाळीव कुत्रा असेल तर) या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात.

८. प्रश्न : पाळीव कुत्र्यांनाही रेबीज होऊ शकतो? त्याला रोगप्रतिबंधक

उत्तर : हो. सर्व पाळीव कुत्र्यांना रोगप्रतिबंधक लस दिली गेली नाही, तर ते धोकादायक ठरू शकतात. निष्कर्ष आणि अनुमानानुसार, माणसांना रेबीजमुळे होणाऱ्या ५० टक्के मृत्यूचे कारण पाळीव प्राणीच असतो. त्यामुळे पाळीव कुत्र्यांना प्रतिवर्षी रोगप्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक आहे.

९. प्रश्नः मांजराविषयी काय मत आहे ?

उत्तर : पाळीव मांजरांना सुध्दा प्रतिवर्षी रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. त्यांना कधीही बाहेर सोडून फिरण्यास देऊ नये.

१०. प्रश्न : जर कोणत्याही पाण्यांमध्ये रेबीजची लक्षणे दिसत असतील आणि तो मला चावला तर मी काय करायला हवे ?

उत्तर :
(अ) उशीर करू नका, शक्य तेवढ्या लवकर जखम झालेली जागा १० मिनिटांपर्यंत साबण आणि पाण्याने स्वच्छ धुतली पाहिजे, पाण्याने धुतल्यामुळे ९४.४ टक्के जंतू नष्ट होतात.
(ब) जखम असलेली जागा कार्बोलिक अॅसिड युक्त साबणाने स्वच्छ धुवावी.
(क) डॉक्टरांना भेटून ०, ३, ७, १४, २८ आणि गरज असल्यास ९० व्या दिवशी रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी. .
(ड) जर कुत्र्याचा ७ ते १० दिवसांमध्ये मृत्यू झाला, तर त्यानंतर मेंदूच्या उतीला काढून त्याचे निदान केले जाते. लक्षात ठेवा, सामान्य माणूस रेबीजची लक्षणे ओळखू शकत नाही. आणि त्याच्या मतानुसार चालणे म्हणजे मृत्यू ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे गरज पडल्यावर लगेच तज्ज्ञांकडून माहिती करून घेणे गरजेचे असते.

११. प्रश्न : रेबीज झालेला कुत्रा पाण्याला घाबरतो का ?

उत्तर : नाही. प्रत्यक्षात रेबीज झालेल्या कुत्र्याला पेशीमध्ये वेदना होत असतात आणि त्याला जबड्याचा लकवा होतो. त्यामुळे तोंड बंद होत नाही आणि त्यामुळे त्याला लाळ अथवा पाणी गिळता येत नाही. त्यामुळे पाण्यापासून असा प्राणी दूर जातो.

१२. प्रश्नः रस्त्यावरील सर्व कुत्र्यांना रेबीज होऊ शकतो का ?

उत्तर : नाही. सर्व कुत्र्यांमध्ये रेबीजची शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांना सहसा लस दिली जात नाही. जर कोणताही अनोळखी कुत्रा चावला तर कमीत कमी ५ लसी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कुत्र्यावर १४ दिवसांपर्यंत लक्ष ठेवले पाहिजे, कारण कुत्र्यांमधील व्हायरसमुळे त्यांचा १० ते १२ दिवसापर्यंत मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी जर कुत्र्यामध्ये कोणतेही लक्षण आढळले नाही, तर त्याला रेबीज हा आजार नाही, हे स्पष्ट होते.

१३. प्रश्न : ज्या प्राण्यांमध्ये रेबीजचे लक्षण दिसत नाही ते सुध्दा हा आजार पसरवू शकतात का ?

उत्तर : हे अगदी स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. कारण रेबीज आजाराचा अधिशयन काळ (इनक्युबेशन पिरीयड) हा मोठा आहे (काही दिवस ते २ ते ३ वर्ष). हा एक असा काळ आहे की ज्यामध्ये श्वान लक्षणे दाखवत नाही परंतु ज्यामुळे कुत्रा आजार संक्रमित करू शकतो. तसेच शांत प्रकारातल्या रेबीज मध्ये श्वान लक्षण दाखवत नाही परंतु आजार पसरऊ शकतो.

१४. प्रश्न : पिल्लांना जन्मजात रेबीज होतो का ? किंवा त्यांच्या आईच्या दुधातून त्याचा प्रसार होतो का ?

उत्तर : नाही. पिल्लाना जन्मजात रेबीज होत नाही. परंतु त्यांच्या आईच्या दुधामध्ये व्हायरस असू शकतो. त्यांच्या आईला रेबीज झाला असेल, तर तिच्या चाटण्यामुळे किंवा चावण्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते.

१५. प्रश्न : मला रेबीज झालेल्या प्राण्याने चावा घेतला तर मला रेबीज होईलच का ?

उत्तर : नाही. खरं म्हणजे माणसामध्ये रेबीजची शक्यता दुसऱ्या प्राण्यांच्या तुलनेत कमी असते. आकड्यांनुसार रेबीजमुळे दूषित झालेला कुत्रा चावल्याने आणि प्रथमोपचार उशिरा घेतल्या कारणाने केवळ १५ ते २०% लोकांचा मृत्यू झाला आहे परंतु कुत्रा चावल्यानंतर कधीही स्वःत वर प्रथमोपचार करण्यासाठी विसरू नका. रेबीज हा भयानक आजार आहे आणि त्यामुळे या आजाराला गंभीररीत्या घेणे आवश्यक आहे.

१६. प्रश्न : भारतामध्ये रेबीजमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या किती आहे?

उत्तर : मृत्यू पावणाऱ्यांचा दर आहे एक लाख लोकांमध्ये १.३ पासून ३.३ पर्यंत असून. मृत्यू पावणाऱ्यांची संख्या प्रतिवर्षी २५ हजार ते ३० हजार आहे. मुंबईमध्ये सन १९९२ पर्यंत प्रतिवर्षी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५० होती. सन २००१ पासून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या पुष्कळ प्रमाणात कमी झाली आहे.

१७. प्रश्न : जर मला रेबीज झालेला कुत्रा आढळला, तर मी काय करू शकतो ?

उत्तर : नगरपालिका कुत्रा स्कॉडशी संपर्क करून कुत्रा पकडून त्याचे निरीक्षण करण्यासाठी सांगितले पाहिजे. चुकूनही कुत्र्याला स्पर्श करणे किंवा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न अजिबात करू नये.

१८. प्रश्न: रेबीज झालेल्या कुत्रा कसा ओळखाल?

उत्तर :
१) हा रोग मुख्यतः दोन प्रकारांमध्ये दिसून येतो.

  • कृद्ध प्रकार (फ्युरीयस फॉर्म)
  • मूक / शांत प्रकार (डंब फॉर्म)

२) या पैकी दोन्ही प्रकारात काही लक्षणे सारखी असली तरी पहिल्या प्रकारामध्ये तो अधिक आक्रमक असतो. मन मानेल तिकडे व मन मानेल तेवढे दूरवर धावत सुटतो. अडवले नाही तर कित्येक मैल धावत सुटतो.
३) खालच्या जबड्याचा अर्धांगवायू झाल्याने सतत जीथ बाहेर व लाळ गळणे ही लक्षणे दिसतात.
४) शरीराच्या मागील भागात अर्धांगवायू झाल्याने पाय लुळे होतात.
५) चर्वण स्नायू व कंठ शिथिल झाल्याने निष्क्रिय बनतात त्यामुळे कुत्रा तहानेने व्याकूळ झाला तरी पाणी पिऊ शकत नाही. याचा मानसिक परिणाम होऊन पाणी बघीतले की कुत्रा घाबरल्यासारखा करतो व दूर पळतो.
६) डोळे लालभडक होऊन बुबुळे विस्तारलेली दिसतात. कोणत्याही एका वस्तूकडे एकटक पहाणे (Vacant look) हे महत्वाचे लक्षण आहे.
७) वारंवार मूत्रविसर्जन करणे. तसेच सततच्या शर्करायुक्त मुत्रामुळे शरीरातील पाणी व शक्ती कमी होते. क्वचित प्रंसगी लघवी पिण्याचा प्रयत्नही अनेक कुत्रे करतात.
८) मालकास न ओळखणे, उलट त्यांच्या अंगावर भुंकणे तसेच घरातील व्यक्तींच्या आवाजाला प्रतिसाद न देणे.
९) सुरूवातीस कुत्रा सतत भुंकतो परंतु नंतर जबडा लुळा झाल्याने त्याच्या भुंकण्याच्या आवाजामध्ये बदल दिसून येतो.
१०) अस्वस्थता, थरथरणे, रागीट होणे, दिसेल त्या वस्तूस / माणसास / जनावरास चावा घेणे अशी लक्षणे आढळून येतात.
११) कोणतीही वस्तू (दगड, हाडे, लाकूड, काठी, कारपेट) चाटणे, खाण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याकडे पाहून भुंकणे, डोके अथवा पाय आपटणे अशी वेडसरपणाची लक्षणे दिसून येतात.
१२) त्याला कोंडण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकच आक्रमपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो व घरापासून दूर पळतो.

१९. प्रश्न: कुत्र्याला रेबीज होवू नये यासाठी काय काळजी घ्यावी?

उत्तर :
१) कुत्र्यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेणे अधिक फायदेशीर ठरते. कुत्रा १२ आठवड्यांचा होताच त्याला पहिला एक मिलीचा डोस द्यावा. त्यानंतर बरोबर एक महिन्याने बुस्टर डोस घेणे फायद्याचे ठरते. त्यापुढील डोस दूर एक वर्षाने द्यावा.
२) लसीकरण केल्यानंतर शरीरात प्रतिकार क्षमता निर्माण होण्यासाठी २१ दिवस लागत असल्याने कुत्र्याला २१ दिवसांपर्यंत बाहेर सोडू नये.
३) आपल्या परिसरात एखादा रेबीज झालेला कुत्रा आढळून आल्यास किंवा तशी लक्षणे दिसल्यास नगरपलिकेमध्ये अथवा संबंधित विभागाला त्याची माहिती देऊन त्याचा बंदोबस्त करण्यास सांगावे.
४) शक्यतो कुत्र्यांचा रस्त्यावरील इतर कुत्र्यांबरोबरचा संपर्क टाळावा.
५) यासंदर्भात स्थानिक प्रशासनानेही लक्ष दिल्यास अधिक फायदेशीर ठरू शकेल. बेवारशी कुत्र्यांचे खच्चीकरण केल्यास प्रार्दुभाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
६) बऱ्याच देशांमध्ये रेबीज होऊ नये म्हणून सर्वच कुत्र्यांना अँटीरेबीजची लस दिली जाते. (Mass Vaccination) अशा तर्हेने यू. के. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, स्वीडन व पोर्तुगाल हे देश रेबीज मुक्त आहेत. तर ऑस्ट्रेलिया व अंटार्किटका या ठिकाणी रेबीजचे पूर्णपणे उच्चाटन झालेले आहे.
७) भारतात सध्या ही मास व्हॅक्सिनेशनची पद्धत अवलंबिली जात नसली तरी येणाऱ्या भविष्यात रेबीज रोगावर नियंत्रण करण्यासाठी त्याची गरज निश्चितपणे भासणार आहे.
८) रेबीज मृत कुत्र्यात हे विषाणू २४ तासांपेक्षा जास्त काळ जिवंत रहातात त्यामुळे अशा कुत्र्यांची योग्य विल्हेवाट लावणे अंत्यत महत्वाचे आहे.

डॉ. पंकज हासे – सहाय्यक प्राध्यापक, पशु औषध वैद्यक शास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी</strong>

डॉ. मंजुषा पाटील- प्राध्यापक, पशु प्रजनन शास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी

pankajhase@gmail.com
drmanjushapatil121@gmail.com