हरिनामात जडजीवांना तारण्याची शक्ती केवढी आहे, हे समर्थ आता ‘मनोबोधा’च्या ९८व्या श्लोकात सांगत आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

हरिनाम नेमस्त पाषाण तारी।

बहू तारिले मानवीदेहधारी।

तया रामनामीं सदा जो विकल्पी।

वदेना कदा जीव तो पापरूपी।। ९८ ।।

प्रचलित अर्थ : सेतु बांधत असताना रामनामानं पाषाणही तरले, मग मानवदेहधारी पाषाणही तरतील, यात काय नवल? असे लक्षावधी जडजीव तरले आहेत. अशा रामनामाविषयी जो सदा विकल्पग्रस्त असतो आणि त्यामुळे जो वाणीनं नामाचा उच्चारही कधी करीत नाही, तोच पापी असतो.

आता मननार्थाकडे वळू. नामानं पाषाण तरल्याची ‘रामायणा’तली कथा सर्वपरिचित आहे. तरी आध्यात्मिक गूढार्थाच्या अंगानं ती आता परत पाहू. रामानं सीतामातेचा शोध घेण्यासाठी हनुमंताला प्रथम लंकेला पाठवलं. ज्या हनुमानानं लंका जाळली, रावणाच्या पदरी असलेल्या वीर योद्धय़ांना सहज मारलं त्याला सीतामातेला एकटय़ाला आणता येणं अशक्य का होतं? पण प्रभूंनी तसं केलं नाही.. आणि यात मोठं रहस्य आहे. रामायण असं अनेक रहस्यांनी भरलेलं आहे, पण तो आपला विषय नाही. म्हणून या पाषाण तरण्याच्या घटनेपुरता रहस्यविचार किंवा गूढार्थविचार करू.

हनुमानानं लंकेहून परतल्यावर सर्व वृत्तान्त सांगितला. त्या लंकेतच त्याची रामभक्त बिभीषणाशी आत्मीय भेटही झाली होती, हे मात्र त्यानं सांगितलं नव्हतं.  हल्लीच्या काळात  गुंडांना बिभीषणाची उपमा दिली गेल्याचं वेदनादायक आणि लज्जास्पद वास्तव आपण अनुभवलं, पण बिभीषण लंकेतला निस्सीम रामभक्त होता, गुंड नव्हे! आणि अवघ्या पृथ्वीतलावरील यज्ञयाग, जपजाप्य, पूजाअर्चा ज्या रावणानं बंद पाडली आणि ऋषींची हत्याही करून दहशत माजवली त्यानं बिभीषणाच्या रामभक्तीत मात्र विघ्न आणलं नाही, यामागेही रहस्य आहेच! तर त्या लंकेत जाण्यासाठी समुद्रच हटवण्याचं रामानं ठरवलं. मात्र समुद्रानं मर्यादापुरुषोत्तमाला असा मर्यादाभंग न करण्याची विनवणी केली आणि तुमच्या सेनेतील नल आणि नील यांच्याकडून सेतू बांधून घेता येईल, असं सुचवलं. कारण हे दोघे लहानपणी ऋषीमुनी तपाला बसले की त्यांच्या पाषाणाच्या देवमूर्त्यां उचलून पाण्यात टाकून देत असत! तेव्हा ऋषींनी त्यांना ‘शाप’ दिला की ते जे काही पाषाण पाण्यात टाकतील ते कधीच बुडणार नाहीत! मग नल आणि नील यांनी पाषाण पाण्यात टाकून सेतू बांधण्याचं काम सुरू केलं. थोडा सेतू साकारताच त्या दोघांना अहंकाराचा स्पर्श झाला.

आपल्यामुळे प्रभूंना सेतू बांधता येत आहे, असा गर्व त्यांना झाला. झालं! समुद्रात लगेच वादळ आलं. लाटा उसळू लागल्या. मग असं होऊ  लागलं की सेतूसाठी पाण्यात टाकलेला एकही पाषाण बुडत नसला तरी वाहवत दूर जात होता. त्यामुळे एकसंध सेतू काही बांधता येत नव्हता. त्यांनी शरणागत भावानं प्रभूंकडे विनवणी केली. मग प्रभू म्हणाले की, एका पाषाणावर ‘रा’ हे अक्षर लिहा आणि दुसऱ्यावर ‘म’ हे अक्षर लिहा. मग ते पाषाण समुद्रत टाका. असं केल्यावर ‘रा’ आणि ‘म’ लिहिलेले पाषाण एकसंधपणे तरंगू लागले आणि सेतू तयार झाला. म्हणजेच अहंकारानं साधना केली तर ती जगाच्या झंझावातात भले वाया जात नाही, बुडत नाही; पण तिनं लंकेप्रमाणे अहंकारग्रस्त झालेल्या अंत:करणापर्यंत भक्तीचा सेतूही काही साकारत नाही! मग त्या लंकेवर विजय तरी कसा मिळवणार!