बिटकॉइनविषयीचे दोन लेख (लोकसत्ता रविवार विशेष, २९ डिसेंबर) वाचनात आले. एकुणात दोन्ही लेखांचा सूर असा होता की या नव्या आणि खुल्या चलनाने प्रस्थापित सार्वभौम चलनांना विचार करायला भाग पडले आहे. परंतु, कुठल्याही चलनाची किंमत ही जोपर्यंत लोकांचा त्यावर किंवा ते चलन जारी करणाऱ्या संस्थेवर विश्वास आहे तोपर्यंतच टिकून राहते. गणेश कुलकर्णीच्या लेखाप्रमाणे २१४० पर्यंत फक्त २.१ अब्ज बिटकॉइन बाजारात येऊ शकतात. म्हणजे साधारण बाजाराचा विचार, करता हे चलन २१४० सालीसुद्धा इल्लिक्विड किंवा कोठेही चटकन वटवणे अशक्य असलेले चलनच राहील (सध्या रोजच्या फोरेक्स विनिमयाची उलाढाल चार ट्रिलियन डॉलर आहे). जयराज साळगावकरांच्या लेखात म्हटले आहे की हे मुक्त चलन असल्याने (रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या) केंद्रीय बँकांची बंधने या चलनाला नसतील. त्याचप्रमाणे चलनवाढ इत्यादी प्रकार यात नसतील. पण कुलकर्णीचा लेख हे स्पष्टपणे सांगतो की बिटकॉइनचे दर एरवीच प्रचंड अस्थिर आहेत. हे दर एका वर्षांत १ : १३  वरून १: १३०० वर गेले होते, आणि आता १: ७००वर आहेत. म्हणजेच या चलनाने जवळपास अध्र्या वर्षांत १०० पट डिफ्लेशन अनुभवले आहे.
बिटकॉइनची वेबसाइटदेखील बिटकॉइन मार्केट प्रचंड अस्थिर (Volatile) असल्याचा इशारा देते. सगळ्या केंद्रीय  बँका आपापल्या चलनाचे असे चढउतार रोखण्यासाठी बांधील असतात; पण या चलनाची तशी बँक अस्तित्वात नसल्याने या प्रकाराला कोणीच वेसण घालू शकत नाही. तशी बँक काढायची म्हटली तर चलनाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे गंगाजळी (Reserves) तयार करण्यावर मर्यादा येतात. म्हणूनच हे चलन विनिमयासाठी अत्यंत वाईट ठरते. गुंतवणुकीसाठी ठीक असले तरी चलन म्हणून या प्रकाराला विशेष किंमत उरत नाही. राहिला मुद्दा फायनान्सचा; या चलनाची सेन्ट्रल बँक नाही म्हणून बँक रेट नाही; आणि म्हणून बिटकॉइनमधून स्थिर पतपुरवठा शक्य नाही. याशिवाय, या चलनाच्या अस्थिरतेमुळे कोणी फोरेक्स डीलर्स गुंतवणूक म्हणून बिटकॉइनकडे विश्वासाने पाहतील काय हीदेखील शंका वाटते. जरी काही लोकांनी त्यात गुंतवणूक केली असली तरी, सध्या या तथाकथित चलनाकडे मार्केट बबल म्हणूनच पाहायला हवे.
या मुद्दय़ांवर अधिक प्रकाश टाकणारे लेख ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले तर अधिक चांगले ठरेल कारण Monetary Economicsसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा (किंवा धडा) असू शकतो.
-श्रीनिधी घाटपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरत्या वर्षांतील जनमत..
भारतीयांसाठी सरते (२०१३) वर्ष निराशेच्या काजळीने सुरू झाले, पण आशेने संपत आहे. दिल्लीतील बलात्कार प्रकरणातील पीडितेसह अनेक निष्पाप मुलींच्या काळजीनेच या वर्षांची सुरुवात झाली, जन चळवळी या पुन्हा उग्र झाल्या. आम आदमी पक्षाची स्थापना, त्याने मिळवलेले घवघवीत यश आणि त्यांचा सत्तारंभ यांत हे वर्ष सरते आहे ही सोनेरी कडा आहे आणि अनेक आशा अपेक्षांसह नव्या वर्षांत प्रवेश करणार आहोत.
‘लोकसत्ता’च्या बाबतीत बोलावयाचे तर अनेक धाडसी आणि जनसामान्यांच्या गरजेच्या बातम्या व विश्लेषण देऊन जनमत तयार केले आणि अनेक वेळा टीकाही करून, वाचकांना आपल्या लेखणीच्या जोरावर सारासार विचार करावयास भाग पडले. ‘लोकसत्ता’ने पत्र व्यवहारही अगदी खुलेपणाने चालविला. अनेक प्रकारचे मुद्दे अनेक लोकांनी लावून धरले. लोकसत्ताशी सहमत होणारी पत्रे वाचावयास मिळालीच पण विशेष म्हणजे, टीका करणारी पत्रेही छापली गेली!    
– केतनकुमार पाटील, पुणे

‘नाताळ’चा मान राखा
राज्य सरकारचे उपसचिव पु. वि. वांगदे यांनी बार ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली; त्या आदेशात नाताळ हा शब्द आहे. नववर्ष व नाताळ यांचा काहीही संबंध नाही, बायबलमध्ये कुठेही ‘दारू पिऊन तर्र व्हा’ असे म्हटलेले नाही. शिवाय कोणत्याही ख्रिस्ती पंथाने तशी मागणी केलेली नाही.
नाताळ शब्द गाळावा म्हणून गेली कित्येक वष्रे अहमदनगरचे संजीव भास्कर पाटोळे सरकारदरबारी लढत आहेत. मात्र सरकार तसा बदल करत नाही. नाताळ या सणाशी बार, धिंगाणा, दारू हे आता रूढ झाले आहे. निदान पुढील वर्षांत अशा आदेशातून नाताळ शब्द वगळावा.    
– मार्कुस डाबरे

काँग्रेसची ‘आप’त्कालीन पळापळ!
‘आदर्श’ अहवालाचा फेरविचार करून भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेस नेतृत्वाने झटपट पावले उचलण्याचे ठरवले आहे, अशा आशयाची बातमी वाचली (२८ डिसेंबर). मनोरंजनविषयक सदरे ज्या पानावर छापतात तेथे छापायची बातमी चुकून मुखपृष्ठावर तर छापली नाही ना, असे क्षणभर वाटून गेले.
 गेली २-३ वष्रे एकापेक्षा एक मोठे भ्रष्टाचार उघडकीला येत होते तेव्हा अशी लगबग कोठे दिसली नाही. भारताच्या अब्रूची लक्तरे जगाच्या वेशीवर धुतली जात होती तेव्हा आपणहून काही कृती करावी असेसुद्धा कधी वाटले नाही. अगदी नाइलाज झाल्याशिवाय भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचे नाही हीच वृत्ती जनता पाहात आली. भ्रष्टाचारावर कित्येक वष्रे चर्चा झाल्या, गेली काही वष्रे मोठी आंदोलनेही झाली, पण त्याचा परिणाम काही झाला नाही. आंदोलनामध्ये जमणारे तथाकथित मेणबत्तीबहाद्दर लोक आणि विराट सभेमध्ये पडणाऱ्या टाळ्या यांचा निवडणुकीत मिळणाऱ्या किंवा विरोधात जाणाऱ्या मतांशी संबंध नसतो हे चाणाक्ष राजकीय नेत्यांना पक्के माहीत होते.
आता मात्र असा प्रत्यक्ष संबंध जोडला गेला आहे हे ‘आप’च्या यशामुळे त्याच चाणाक्ष नेत्यांनी हेरले असल्यास नवल नाही. देशातील परिस्थितीची धग आता आपल्या दरवाजात येऊन पोहोचली आहे याची आता जाणीव झालेली दिसते आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण इतके तापलेले असताना ‘ठंडा करके खाओ’ या रणनीतीनुसार आपणही काही करत आहोत असे भासवणे नाइलाजास्तव गरजेचे झाले आहे इतकाच या धावपळीचा अर्थ. त्या अर्थाने ही काँग्रेसची फक्त ‘आप’त्कालीन पळापळ आहे, असेच म्हणावे लागेल!
प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

ही तर इष्टापत्ती!
‘चि. बाबामहाराज’ हा अग्रलेख (३० डिसेंबर) वाचला. परंतु जे झाले ते चांगलेच झाले. राहुल गांधी बोलले त्याचा परिणाम म्हणजे ‘ब्लेसिंग इन डिसगाइस’चा प्रकार  झाला. वाइटातून चांगले घडेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी! जर भ्रष्टाचाऱ्यांवर कार्यवाही होणार असेल तर राहुल यांना प्रोटोकोल समजत नसला तरी चालेल. देशातील सगळ्यात जुन्या आणि मोठय़ा पक्षात जर साफसफाई झाली आणि चुकलेल्यांना शिक्षा झाल्यास इतरांवर जरब बसण्यास मदत होईल.
देवेन्द्र जैन, अंबरनाथ

नवा (आणि असाही) सर्वधर्मसमभाव
समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ चा शासन फेरविचार करीत आहे. अशा प्रयत्नांना विरोध करणाऱ्या समविचारी संघटनांची एक परिषद जमाते-इस्लामी िहद या संघटनेच्या नेतृत्वाखाली होणार आहे, अशी एक बातमी वृत्तपत्रात वाचली. सर्वधर्मीय एकतेचा हा नवा कालबाहय़ आविष्कार नव्हे काय?  प्रयाग पीठाचे शंकराचार्य, अकाल तख्ताचे जथेदार, अिहसा विश्व धर्म नावाच्या जैन संघटनेचे अधिकारी, फतेपूर मशिदीचे शाही इमाम यांच्यासोबत दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षही या जथ्यात सामील आहेत.
आतापर्यंत या विषयावर काहीशी दिलासा देणारी विधाने धर्मपीठांच्या प्रमुखांपकी फक्त एक- म्हणजे व्हॅटिकनचे विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी केली आहेत. समलिंगी धर्मगुरूंबद्दल विचारले असता ‘अशा प्रेरणांना आक्षेप घेणारा मी कोण’ असे विधान पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. ‘परमेश्वर आपली कृपादृष्टी एखाद्या व्यक्तीवर टाकताना त्याची अशी चौकशी करीत नाही,’ असे फ्रान्सिस यांचे म्हणणे आहे. असे असूनही, विशेष म्हणजे थॉमस नावाचे एक ख्रिस्ती धर्मगुरूही यात सामील आहेत.
 भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पािठबा दर्शवला आहे आणि अनेक मुस्लीम संघटनांनी भाजपच्या अशा ‘ठाम’ भूमिकेचे स्वागत केले आहे. भाजपच्या अनेक व्यक्ती याबद्दल खासगीत अस्वस्थ असल्याचे काही वृत्तपत्रांनी म्हटले असले तरी नेतृत्वाबद्दल उघडपणे बोलण्याची त्यांची प्राज्ञा नसावी. पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार नरेंद्र मोदी अजून तरी या जत्रेत सामील व्हायचे आहेत. मनात आणले तर अशा  सर्वधर्मसमभावाचेही आपणच खरे उद्गाते कसे आहोत हे एखादा ‘महामेळावा’ घेऊन ते सिद्ध करू शकतातच!
-अशोक राजवाडे, मालाड

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Questions remain about bitcoin value exchange
First published on: 31-12-2013 at 12:46 IST