माझ्यासकट जगातला प्रत्येक जण स्वार्थकेंद्रित आहे. त्यामुळे जो-तो स्वार्थानुसारच परस्परांशी व्यवहार करीत आहे. जोवर स्वार्थ साधला जात आहे किंवा स्वार्थात किमान बाधा येत नाही, तोवर नाती आणि मैत्री टिकून आहे. स्वार्थासाठीच रक्ताची नाती टिकविली जात आहेत आणि जगात नाती जोडली जात आहेत. स्वार्थापायीच जगातलीच नव्हे तर रक्ताचीही नाती तोडली जात आहेत. अशा जगात कायमचं सुख, कायमचा निवांतपणा, कायमची मन:शांती कशी शक्य आहे? पण जगाचं हे स्वरूप आपल्याला उकलत नाही. त्याच जगात जखडून आपण ‘सुख’ शोधत राहतो आणि अनेकदा ‘दु:ख’ भोगतो. सद्गुरूंच्या कृपेनं आणि सहवासानंच जगाचं खरं स्वरूप हळूहळू समजू लागतं आणि याच जगात कसं वागायचं-वावरायचं याचा वस्तुपाठही सद्गुरूंकडूनच मिळतो. व्यवहारात राहतानाही त्यात कसं गुंतू नये, हे ते प्रत्यक्ष आचरणातून दाखवतात. प्रपंचातली सर्व कर्तव्यं पार पाडतानाही मनानं समचित्त कसं राहता येतं, हे तेच दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सहवासातून, त्यांच्या बोधानुरूप वागण्यातूनच खरा निवांतपणा लाभतो. स्वामी स्वरूपानंद यांचा एक अभंग आहे. स्वामी म्हणतात- ‘‘आघवा संसार झाला मोक्ष-मय। होतां ज्ञानोदय अंतर्यामीं।।१।। लाधलें सकळ साधनांचे फळ। भेटला गोपाळ अखंडित।।२।। काम क्रोध लोभ निमाले संपूर्ण। झालें समाधान अनिर्वाच्य।।३।। स्वामी म्हणे आतां बैसलों निवांत। हरिपायीं चित्त लावोनियां।।४।।’’ (संजीवनी गाथा, क्र. १८३). जो पूर्ण भौतिक जीवनातच दंग आहे, त्याची गोष्ट सोडून द्या. पण या भौतिक जीवनातील चढउतारांनी अस्वस्थ होऊन जो खऱ्या मन:शांतीसाठी धडपडत आहे, त्याची स्थिती कशी असते? सद्गुरूंची भेट झालेली नाही, सद्गुरू तत्त्वाचीही जाणीव नाही, सद्गुरूची अनिवार्यताही समजलेली नाही अशा अगदी सामान्य स्थितीत तो असतो. किंबहुना देवाची भक्ती कोणीही करू शकतो, त्यासाठी सद्गुरूची काय गरज आहे, असाही भाव अनेकांच्या मनात असतो. त्यामुळे देवाच्या ‘भक्ती’साठी म्हणून जो तो जमेल ते सारं काही करीत असतो. स्तोत्र वाच, पारायणं कर, जप कर, कथाकीर्तनाला जा, मंदिरांमध्ये जा, तीर्थयात्रा कर, सद्ग्रंथ वाच, उपास-तापास कर.. अनेकानेक साधना माणूस करीत असतो. त्या साधनांनीही मनाला तात्पुरत्या शांतीचा आभास होत असतो, पण तरी जगाचा पगडा कायम असतो. आपल्याआड जगच येतं असं नाही, आपणही येतो! त्यामुळे जग जितकं बंधनात पाडत असतं तितकंच मनही बंधनात टाकत असतं. अशा स्थितीत अनेकानेक साधना तळमळीनं सुरू असतात. त्या साधनांचं खरं फळ कोणतं? लाधलें सकळ साधनांचे फळ। भेटला गोपाळ अखंडित!  जेवढय़ा म्हणून साधना केल्या त्यामुळेच त्या गोपाळाची अर्थात सद्गुरूंची अखंड भेट झाली! त्यामुळे काय झालं? अंतरंगात जगाच्या खऱ्या स्वरूपाचं आणि आत्मस्वरूपाचंही ज्ञान झालं आणि त्यामुळे जो संसार आधी बंधमय होता तोच मोक्षमय झाला. आघवा संसार झाला मोक्ष-मय। होतां ज्ञानोदय अंतर्यामीं!