सध्या तंत्रज्ञानाचं युग असून प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत आहे. चांगल्या स्मार्टफोनबरोबर ग्राहक कायमच चांगल्या नेटवर्कसाठी आग्रही असतात. सध्या भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचे सिमकार्डधारक सर्वाधिक आहेत. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. कंपन्यांचा आकर्षक आणि स्वस्त प्लान देत ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न असतो. गेल्या आठवड्यात तिन्ही कंपन्यांनी आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक चांगली सुविधा देणाऱ्या नेटवर्ककडे धाव घेताना दिसत आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) व्होडाफोन आयडियाच्या नव्या शुल्क रचनेबद्दल तक्रार केली आहे. ट्रायला लिहिलेल्या पत्रात जिओने म्हटले आहे की, व्होडाफोन आयडियाचे नवीन दर कथितरित्या एंट्री-लेव्हल ग्राहकांना त्यांचे मोबाइल नंबर पोर्ट करण्यापासून प्रतिबंधित करत आहेत, असा आरोप केला आहे.

व्होडाफोन आयडियाने नोव्हेंबरमध्ये मोबाईल सेवा आणि डेटा दरात १८ ते २५ टक्क्यांची वाढ केली होती. नवीन रचनेअंतर्गत व्होडाफोन आयडियाने २८ दिवसांच्या वैधतेसह प्रवेश-स्तरीय योजना रु. ७५ वरून ९९ रु. पर्यंत वाढवली आहे. परंतु एसएमएस सेवा त्याच्याशी जोडलेली नाही. “जिओने ट्रायकडे तक्रार केली आहे की, व्होडाफोन आयडिया कमी शुल्क असलेल्या योजना निवडणाऱ्या लोकांना त्यांचे मोबाईल नंबर पोर्ट करण्यापासून प्रतिबंधित करते. कारण व्होडाफोन आयडियाच्या एंट्री लेव्हल प्लॅनमध्ये आउटगोइंग एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.”, असं सूत्रांनी सांगितलं.

Nothing Ear 1 चं ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; क्रिप्टो करन्सीत पेमेंट करण्याची सुविधा

मोफत एसएमएस सेवा उच्च दर पॅकमध्ये ठेवल्याने ग्राहकांना एसएमएस पाठवण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागत आहेत. तर कमी दराचे पॅक घेतलेले ग्राहक अधिक महाग योजना खरेदी करू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांना एसएमएस सुविधेचा लाभ घेता येत नाही. या कारणास्तव नंबर पोर्ट करताना अडचणी येतील. ग्राहक नवीन नेटवर्कवर शिफ्ट करू शकणार नाही. जिओच्या तक्रारीनंतर आता ट्राय याप्रकरणी तपास करत आहे.