१५ टक्के खासगी मलप्रक्रिया केंद्रे बंद; इतर केंद्रे सदोष

ठाण्यातील बागबगिचे, उद्याने, स्वच्छतागृहे, हॉटेल, मॉल या ठिकाणहून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्यान देखभाल तसेच अन्य कारणांसाठी वापर करण्याची ठाणे महापालिकेची योजना अपयशी ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने शहरातील ११० खासगी मजल प्रक्रिया केंद्रांचे नुकतेच सर्वेक्षण केले असून तब्बल ४० टक्के केंद्र विहित मानांकनाप्रमाणे नसल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, १५ टक्के खासगी मलप्रक्रिया केंद्र बंद अवस्थेत आढळून आल्याने सांडपाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याची मोहीम अडचणीत सापडली आहे.

ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणावर खासगी संकुले उभी राहिली असून यापैकी काही गृहसंकुलांचा विकास राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष नागरी वसाहत योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शेकडो एकर क्षेत्रफळात उभ्या राहिलेल्या या संकुलांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारली जावीत, असा आग्रह महापालिकेने अगदी सुरुवातीपासून धरला. या संकुलांमध्ये मोठय़ा स्वरूपात उद्याने तसेच बागबगिच्यांची निर्मिती केली जाते. या बगिच्यांची देखभाल राखण्यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरात आणले जावे, असे बंधन महापालिकेने घातले आहे. हे करत असताना शहरातील हॉटेल्स, मॉल, बडय़ा दुकानांच्या खासगी व्यवस्थापनांनाही अशी प्रक्रिया केंद्रे उभारण्यास प्रोत्साहन देणारी मोहीम मध्यंतरी महापालिकेने हाती घेतली. अशी केंद्र उभारणाऱ्या संस्थांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्वच्छतागृह आणि बगिच्यांसाठी पिण्याचा पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा, असा उद्देश यामागे होता.

सद्य:स्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रात रौनक पार्क, युनायटेड २१, वसंत विहार, तारांगण, रहेजा गार्डन यांसारख्या मोठय़ा संकुलांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारण्यात आली आहेत. याशिवाय हॉटेल्स, दुकाने आणि इतर व्यावसायिक केंद्र मिळून तब्बल ११० खासगी मलजल प्रक्रिया केंद्रांना महापालिकेने परवानगी दिली आहेत. या ठिकाणी प्रक्रिया होणाऱ्या पाण्याचा वापर बगिचा आणि शौचालयासाठी केला जात असल्याचा दावा एकीकडे केला जात असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. या पाहणीनुसार तब्बल ४० टक्के केंद्र विहित मानकांप्रमाणे सुरू नसल्याचे दिसून आले आहे. याशिवाय १५ टक्के प्रक्रिया केंद्र बंद अवस्थेत असल्याची माहितीही या पाहणीदरम्यान पुढे आली आहे.

दरम्यान, बंद अवस्थेत असलेल्या प्रक्रिया केंद्रांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड आकारून कार्यान्वित केले असून सद्य:स्थितीत अधिकतम पाण्याचे नमुने विहित मानकात आढळले असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. असे असले तरी ही केंद्र सुरळीत चालविण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नियंत्रण मंडळातील एका वरिष्ठ सूत्राने ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.