नागरिक भयभीत; प्रशासन मात्र ढिम्मच! डहाणू व तलासरी तालुक्यातील गावे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरली. तलासरी, डहाणू परिसरांत भूकंपाचे सत्र सुरूच असून सोमवारी पहाटे ५.३८ मिनिटांनी ३.२ रिष्टर स्केल इतका भूकंपाचा धक्का बसला. आणि पुन्हा एकदा परिसरातील गावे तीव्र धक्क्यांनी हादरली. मात्र यावर उपाययोजना करण्याबाबत शासन यंत्रणेची उदासीनता पाहता गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डहाणू, तलासरी तालुक्यांतील अनेक गावखेडी सध्या भूकंपाच्या दहशतीखाली आहेत. गेल्या नोव्हेंबरपासून रात्री-अपरात्री भूकंपाचे वारंवार धक्के बसत आहेत. मध्यरात्री भूकंपाची मालिका सुरू झाली असून पहाटे ५.३८ या वेळेला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरांना तडे बसून मोठे नुकसान झाले आहे.परिसरातील भूकंपाबाबत प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जागृती तसेच करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. परंतु वारंवार भूकंपाचे धक्के बसूनही त्यावर शासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचे जाणवत आहे. कारण वेळोवेळी होणाऱ्या भूकंपाच्या नोंदीही संकेतस्थळावर नोंदविण्यात येत नसल्याने सेस्मॉमीटरमधील डेटा घेण्यात येतो की नाही, असा संशयही नागरिकात व्यक्त होत आहे.