ठाणे आर्ट गिल्डचा उपक्रम ठाण्यातील ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) या संस्थेच्या ‘ग्रंथगंध’ या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी सायंकाळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील गडकरी कट्टा येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कलाकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच ठाणेकरांना प्रायोगिक नाटक आणि जागतिक दर्जाच्या दुर्मीळ चित्रपटांच्या पलीकडे जाऊन लेखन आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘ग्रंथगंध’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ठाण्यातील गडकरी कट्टा आणि ठाणे आर्ट गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये विविध साहित्य प्रकार जसे ग्रंथ, प्रवासवर्णन, लेख, निबंध, लघुकथा, कादंबरी आदी विविध साहित्यप्रकारांवर चर्चा, विचारांची देवाणघेवाण, लेखन, अभिवाचन, समीक्षण असे उपक्रम होत असतात. या उपक्रमाचे तिसरे पुष्प येत्या शनिवारी गुंफले जाणार आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत पत्रकार निखिल बल्लाळ घेणार आहेत. लेखनासाठी प्रोत्साहन देऊन नवीन लेखक निर्माण करण्याच्या दृष्टीने संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी ‘चित्तरकथा’ ही संकल्पना मांडली. यामध्ये टॅग परिवारातील मंडळींना दर महिन्याला ४ चित्रे दिली जातात आणि कोणत्याही चित्रावर २० वाक्यांची कथा लिहिली जाते. त्यापैकी ज्या तीन चित्तरकथा निवडल्या जातील त्याचे अभिवाचन त्या कथांचे लेखक करणार आहेत. नव्या पिढीला लेखन आणि वाचनाचे महत्त्व कळावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव व विजू माने यांच्या संकल्पनेतून डिसेंबर २०१२ मध्ये ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेची स्थापना झाली. प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, मंगेश देसाई, गिरीश मोहिते व अशोक नारकर यांसारख्या मान्यवरांच्या सक्रिय सहभागामुळे या संस्थेने गेल्या काही वर्षांत अनेक उपक्रम राबवले आहेत.