जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या नवरंग महोत्सवाचा शेवटचा टप्पा जवळ येऊ लागताच यंदाच्या वर्षी मिस्टर नवरंग व मिस नवरंग कोण ठरेल अशा चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत होत्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवरंग महोत्सवाच्या अंतर्गत व्यक्तिमत्त्व स्पर्धा महाविद्यालयात नुकतीच पार पडली. काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयात विद्यार्थी या स्पर्धेची तयारी करताना दिसत होते. केवळ एकच नैपुण्य आत्मसात करून विद्यार्थ्यांनी न थांबता विद्यार्थ्यांचा संपूर्णत: विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयाच्या नवरंग महोत्सवाचे या वर्षीचे वरिष्ठ महाविद्यालयाचा मिस्टर नवरंग आशीष पांडे आणि मिस नवरंग सानिका दातार ठरले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे मिस नवरंग उत्कर्ष व ऐश्वर्या या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेसाठी खूप उत्सुकता असल्याने ९० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपले नाव नोंदवले होते. या विद्यार्थ्यांपैकी प्राथमिक फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान तपासले गेले. यापैकी प्राथमिक फेरीमधून २० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर रॅम्पवॉक केला आणि या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली व्यक्तिगत ओळख करून दिली. व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेच्या कौशल्य फेरी या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य स्पर्धेच्या माध्यमातून दाखवले. यात नृत्य, संगीत, तबलावादन,अभिनय, छायाचित्र, शिवणकाम, चित्रकला अशा अनेक कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. स्पर्धेच्या तिसऱ्या अंतिम फेरीमध्ये परीक्षकांकडून विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.