टोल बंद झाल्याने विनाथांबा प्रवास पश्चिम द्रुतगती मार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वार असलेला दहिसर चेकनाका पार करायचा म्हणजे एरवी एक मोठे दिव्यच पार पाडावे लागते. चेकनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या प्रचंड मोठय़ा रांगा लागत असल्याने या ठिकाणी गर्दीच्या काळात किमान अर्धा ते एक तास जातो. मात्र बुधवारी दहिसर चेकनाक्यावरून मुंबईकडे जाणारी तसेच मुंबईबाहेर येणारी वाहने सुसाट वेगाने अवघ्या काही सेकंदांत नाका पार करीत होती. राष्ट्रीय महामार्गावर टोल न घेण्याचे आदेश सध्या शासनाकडून देण्यात आल्याने वेगात बदल न करता विनाथांबा प्रवास करण्याची संधी मिळाल्याने वाहनचालक सुखावले. दहिसर चेकनाका हे मुंबईचे प्रवेशद्वार! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने आणि ही सर्व वाहने चेकनाक्याजवळ टोल भरण्यासाठी थांबत असल्याने या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठाल्या रांगा लागत असतात. सकाळ व सायंकाळी गर्दीच्या वेळेत तर एक किलोमीटपर्यंतच्या रांगा या ठिकाणी लागत असतात. नोकरीसाठी जाणारे चाकरमानी, विद्यार्थी, रुग्ण, वरिष्ठ नागरिक यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शनिवार व रविवारी तर परिस्थिती आणखीनच बिकट असते. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नानाविध उपाययोजना करण्यात आल्या, रस्तारुंदीकरणही झाले, त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली, परंतु नाका पार करण्यासाठी आजही वेळ लागतोच. चेकनाक्याजवळील टोल नाका हटविण्यात यावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. वेळोवेळी टोल नाक्याविरोधात आंदोलनेही झाली आहेत. परंतु टोल नाका अद्याप हटलेला नाही. युती शासन राज्यात स्थापन झाले त्या वेळी राज्यातील अनेक टोल नाके रद्द झाले. त्या वेळी दहिसर टोल नाकादेखील रद्द होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हा नाका त्यातून वगळण्यात आला. ५०० व १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर टोल नाक्यावर टोल न घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे दहिसर चेकनाक्यावर टोल स्वीकारणे सध्या थांबविण्यात आले असल्याने चेकनाक्यावरून गाडय़ा सुसाट धावत आहेत. टोल घेणे बंद करण्यात आल्याने सध्या रस्ता एकदम मोकळा झाला आहे. त्यामुळे दहिसर चेकनाक्यावरची वाहतूक कोंडी केवळ टोल नाक्यामुळेच होत आहे हे सिद्ध झाले आहे. टोल नाका रद्द झाल्यास वेळेबरोबर इंधनाचीदेखील मोठय़ा प्रमाणावर बचत होत आहे. - दीपक शहा, उद्योजक.