अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दीड तास ठाणे : कल्याण-शिळफाटा मार्गावर रविवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शिळफाटा ते काटई नाकापर्यंत दोन्ही मार्गिकेवर ही कोंडी झाल्याने कल्याण, बदलापूर येथून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल झाले. अर्ध्या तासाचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे दीड तास लागत होता. वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांनी वाहने विरुद्ध दिशेने चालविली. मात्र त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ही कोंडी झाली होती. कल्याण-शिळफाटा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीमार्फत सुरू आहे. या कामासाठी रविवारी सायंकाळी देसाईगाव, निळजे भागांत एमएसआरडीसीने मार्गरोधक बसविले होते. त्यामुळे मार्गिका अरुंद होऊन त्यावरून वाहतूक सुरू होती. त्याचा परिणाम काटईनाका ते शिळफाटय़ापर्यंतच्या वाहतुकीवर होऊन प्रचंड कोंडी झाली. अध्र्या तासाचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे दीड तास लागत होता. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालकांनी त्यांची वाहने विरुद्ध दिशेने चालविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. रात्री ८ वाजेनंतरही वाहतूक कोंडी कायम होती. या कोंडीचा फटका कल्याण-बदलापूरहून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांना बसला. सुट्टय़ांचे दिवस.. एमएसआरडीसीकडून रस्ता रुंदीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. सोमवार ते शुक्रवार हे वाहनांच्या रहदारीचे दिवस असल्याने या दिवसात काम करणे शक्य होत नाही. तसेच या कामामुळे कोंडी होऊन नोकरवर्गाचे हाल होऊ शकतात. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या सुट्टय़ांच्या दिवशी वाहनांची वर्दळ कमी असताना ही कामे करण्याचे एमएसआरडीसीने ठरविले आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र रविवारी अशाचप्रकारे या ठिकाणी कामे सुरू असताना कोंडी झाली आहे. त्यामुळे सुट्टय़ांचे दिवस कोंडीचे ठरण्याची शक्यता आहे.