बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री आदेशामुळे साठा पडून

खुल्या बाजारापेक्षा शिधावाटप केंद्रात शासनाकडून स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत असल्या तरी तूरडाळीच्या बाबतीत उलटे चित्र दिसून आले आहे. शासनाच्यावतीने खुल्या बाजारात केवळ ९५ रुपयाने प्रतिकिलो तूरडाळीची विक्री सुरुवात केली असताना शिधावाटप केंद्रात १०३ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळ विक्री करण्याचा अजब प्रकार राबवण्यात आला आहे. खुल्या बाजारात स्वस्त तूरडाळीची विक्री होत असल्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांनीही खुल्या बाजाराकडे धाव घेत शिधावाटप केंद्रातील तुरडाळीकडे पाठ फिरवली. त्यामुळे सप्टेंबरपासून आत्तापर्यंत १२०० किलो तुरडाळीचा साठा जिल्ह्य़ातील विविध शिधावाटप केंद्रामध्ये पडून राहिला आहे. पुढील काही दिवस हा साठा असाच पडून राहिल्यास तो सडून जाण्याची शक्यता शिधावाटप केंद्रातील अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

तूरडाळीच्या महगाईच्या पाश्र्वभूमीवर गरीब नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी शासनाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात शिधावाटप केंद्रातून अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी १०३ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळ विक्रीस सुरुवात करण्यात आली होती. खुल्या बाजारात १८० ते १०० रुपयांनी विक्री होत असलेली तूरडाळ शिधावाटप केंद्रात १०३ रुपयांना मिळत असल्याने या केंद्रात सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर शासनाने खुल्या बाजारामध्येही तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेऊन ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या खाजगी ठिकाणी तूरडाळ विक्री केंद्र सुरू केले. त्यामध्ये रिलायन्स फ्रेश, बिग बाजार अशा बडय़ा ३३ मॉल्समध्ये ही तूरडाळ विक्री केंद्र सुरू केले. या तूरडाळीची किंमत अवघी ९५ रुपये इतकी होती. त्यामुळे खुल्या बाजारामध्ये स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांनी खुल्या बाजारातून तूरडाळीची खरेदी सुरू केली. त्यामुळे शिधावाटप केंद्रातील तूरडाळ पडून राहण्यास सुरुवात झाली. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, वाशी, भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंब्रा या भागामध्ये सुमारे १२१७ किलो तूरडाळीचा साठा पडून आहे.