नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई डोंबिवली : जिल्ह्यात भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी देताच कल्याण डोंबिवली परिसरात येत असलेल्या कृषी मालाच्या घाऊक बाजाराचे विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारांमध्ये गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल यासाठी महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यतील ठाणे, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणचे भाजी बाजार बुधवारपासून सुरू झाले. कल्याण, डोंबिवली शहरातील बाजार १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. शहरातील एका बाजारात केवळ ५० विक्रेत्यांना भाजी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पाच विक्रेत्यांमागे एका समाजसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी आणि फळे विक्री सम तारखांना होणार आहे. मार्केट यार्ड परिसरात दररोज केवळ ५० गाडय़ांना प्रवेश दिला जाणार आहे. बाजार समितीच्या आवारातील फळे आणि कांदा बटाटा मार्केट हे दुर्गाडी पूल आणि बंदरनाका येथील महापालिकेच्या ट्रक टर्मिनलच्या जागेतील गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणीही रोज केवळ २५ फळे तसेच कांदा आणि बटाटा बाजाराचे गाळे चालू ठेवले जातील. ४०० परवानाधारक किरकोळ भाजीविक्रेत्यांना दिवसाआड खरेदीसाठी येण्याची परवानगी असेल. त्यातही प्रत्येक दोन तासांसाठी १०० किरकोळ भाजी विक्रेत्यांना खरेदीसाठी ब् प्रवेश दिला जाणार आहे. ‘एपीएमसीत’ आजपासून खरेदीदारांना प्रवेश कांदा-बटाटा व भाजीपाला बाजार सुरू झाल्यानंतर एपीएमसीतील धान्य बाजारही सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी या बाजारात धान्याची आवक झाली. मात्र खरेदीदारांना शुक्रवारपासून प्रवेश दिला जाणार आहे. फळ बाजार सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांबरोबर एपीएमसी प्रशासनाच्या बैठका सुरू आहेत. व्यापाऱ्यांनी ४०० ते ५०० गाडी आवक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र त्यामुळे सामाजिक अंतर पाळले जाणार नसल्याने प्रशासनाने २०० ते २५० गाडय़ांना प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल,असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.