अवजड वाहनांना गोविंदवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद कल्याणमधील पत्रीपूल ते दुर्गाडी किल्लादरम्यानचा बाजारपेठ विभागातून जाणारा गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता तयार झाला आहे. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. या नव्याकोऱ्या रस्त्याखालील पूल कमकुवत असल्याने हा रस्ता अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गोविंदवाडी रस्ता खुला होऊनही या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रतिबंध असल्याने शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी कायम आहे. मागील अकरा वर्षांपासून कल्याण शहराबाहेरून जाणाऱ्या १२०० मीटर लांबीच्या गोविंदवाडी बाह्य़वळण रस्त्याचे काम ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’कडून (एमएसआरडीसी) सुरू होते. हे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. या रस्त्यावरून भिवंडी, पनवेल भागांतून येणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू होती. आता ‘एमएसआरडीसी’ने नवीन गोविंदवाडी रस्त्यावर ‘पुढे कमकुवत व अरुंद पूल आहे. अवजड वाहनांस प्रवेश निषिद्ध’ अशा प्रकारचे फलक लावले आहेत. नवीन रस्ता तयार करूनही तात्काळ पूल कमकुवत झाल्याबद्दल प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी गोविंदवाडी रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण व्हावे यासाठी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. त्यावर पाणी फिरल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसत आहेत. गोविंदवाडी रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याखालील पत्रीपूल भागात असलेला पूल कमकुवत आहे. त्याचीही डागडुजी होणे आवश्यक आहे. नवीन रस्ता पूर्ण होऊन या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली तर कमकुवत पुलामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती या भागातील जागरूक नागरिक श्रीनिवास घाणेकर यांनी एका पत्राद्वारे यापूर्वीच एमएसआरडीसी, कडोंमपा, वाहतूक विभाग, पोलिस उपायुक्त यांच्याकडे व्यक्त केली होती. या पत्राची दखल घेऊन ‘एमएसआरडीसी’ने ‘स्ट्रक्टवेल डिझायनर अॅन्ड कन्सल्टन्ट’ या सल्लागार संस्थेकडून गोविंदवाडी पुलाची तपासणी केली. दरम्यानच्या काळात गोविंदवाडी रस्त्याचा बाराशे मीटरचा पट्टा महामंडळाकडून बांधून पूर्ण झाला होता. हा रस्ता तयार करताना या रस्त्यावरील पुलाची उभारणी करणे किंवा डागडुजी करण्याची अट निविदेमध्ये नव्हती. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने रस्ता पूर्ण होईपर्यंत या पुलाकडे दुर्लक्ष केले, असे घाणेकर यांनी सांगितले. सल्लागार संस्थेचा अहवाल ‘स्ट्रक्टवेल’ संस्थेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी गोविंदवाडी रस्त्याखालील पुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी पालिकेकडे या पुलाच्या उभारणीची कागदपत्रे मागितली. पालिकेकडे या पुलाची कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. या पुलासाठी कोणते सिमेंट, किती लोखंड वापरले; या पुलाची अवजड वाहन सहन करण्याची क्षमता, या पुलाची मोजमापे अभियंत्यांना आढळली नाहीत. या पुलाखालील लोखंड तसेच पुलावरील डांबर निघाले आहे. पुलाच्या बाजूला पाणी वाहून नेण्यासाठी सुविधा नाही तसेच पदपथ नाही. पुलाच्या कामाचा आराखडा आरेखनतज्ज्ञांना आढळून आला नाही. पुलाखालून सतत गटाराचे पाणी वाहत असल्याने पुलाच्या खांबांची क्षमता तपासणे अभियंत्यांना शक्य होत नाही. पुलाची एकूण परिस्थिती पाहता हा पूल अवजड वाहनांची वाहतूक सहन करू शकत नाही, असा सविस्तर अहवाल स्ट्रक्टवेल संस्थेने ‘एमएसआरडीसी’ला दिला. त्यामुळे महामंडळाने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या पुलामुळे उद्भवणाऱ्या धोक्याचे फलक रस्त्यावर लावले आहेत. रस्तेकाम करताना निविदेमध्ये या रस्त्यामधील जुन्या पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी अट नव्हती. त्यामुळे त्या पुलाकडे लक्ष देण्यात आले नाही. रस्तेकाम पूर्ण झाल्यावर या पुलाची क्षमता तपासण्यात आली. त्या वेळी तो अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहनांना बंद ठेवला आहे. गोविंदवाडी रस्त्याने पालिकेचा रिंगरूट जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ हे काम करणार आहे. त्यांनी हे काम करावे, असे या संदर्भातच्या होणाऱ्या बैठकीत सूचित करण्यात येणार आहे. - दत्तात्रय भोंडे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी