ठाणे- शहरातील लक्ष्मी चिराग नगर भागात गुरुवारी एका २५ वर्षीय तरुणाची याच भागातील चार तरुणांनी पूर्ववैमनस्यातून धारधार चाकुने वार करुन निर्घृण हत्या केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तुषार निरूखेकर आणि आकाश शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दर्शन शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या ठाण्यातील खोपट भागात वास्तव्यास होता. दर्शन गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पूर्वी राहत असलेल्या लक्ष्मी चिरागनगर भागात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याठिकाणी राहणारे आर्यन गढीवाल(२०), तुषार निरूखेकर (२४), आकाश शिंदे(२८) आणि भाल (२०) हे चौघेजण आले.
या चौघांनी जुना वाद उकारुन दर्शनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादात दर्शनवर त्यांनी चाकूने वार केला. त्यात दर्शन गंभीररित्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात आर्यन, तुषार, आकाश आणि भाल या चौघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी तुषार आणि आकाश या दोघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.