ठाणे शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींवर ओढवलेल्या प्रसंगावरून चौफेर टीकेचे धनी ठरल्याने खडबडून जाग आलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बेकायदा रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्यासाठी साध्या वेशातील कर्मचाऱ्यांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके अचानकपणे रिक्षा स्थानके आणि नाक्यानाक्यांवर बेकायदा रिक्षांची तपासणी करू लागली आहेत. त्यामुळे नियम पायदळी तुडविणारे आणि प्रवासी भाडे नाकारणारे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांचा रिक्षावर वचक राहिलेला नसल्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागल्याचा आरोप प्रवाशांमधून होऊ लागला आहे. ‘ठाणे लोकसत्ता’ने यासंबंधी ‘महिलांची सुरिक्षा धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत ठाणे परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी बेकायदा रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे.
ठाणे स्थानक, सिडको, लोकमान्यनगर, किसननगर, वागळे इस्टेट, नितीन कंपनी, तीन हातनाका, मानपाडा, आणि कासारवडवली आदी परिसरात विशेष पथकाने तपासणी केली आहे. यामध्ये वागळे इस्टेट परिसरात एक बेकायदा रिक्षा सापडली असून या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, १६ वर्षांची मुदत संपल्यानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या २० हून अधिक रिक्षा सापडल्या आहेत, अशी माहिती ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.